पाकिस्तानचा भारताला सल्लाः आधी आपल्या देशातली परिस्थिती नीट करा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पाकिस्तानच्या नागरिकांबरोबर झालेल्या काही घटनांचा संबंध भारत अल्पसंख्यांकांच्या अधिकाराशी जोडत आहे असा आरोप पाकिस्तानने लावला आहे.

त्याचबरोबर इतर देशांतील अल्पसंख्यांकांची काळजी करण्यापेक्षा आपल्या देशातली परिस्थिती नीट करा असा सल्लाही पाकिस्तानने भारताला दिला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. तसंच शनिवारी भारतातील एका ज्येष्ठ मुत्सद्दी अधिकाऱ्याला या प्रकरणी बोलावण्यात आलं आणि अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावरुन खोडसाळपणा केल्याचा ठपका ठेवत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

एक विशिष्ट संकुचित राजकीय अजेंडा घेऊन दुसऱ्या देशातील अल्पसंख्यांकांची चिंता करणं सोडावं असं या निवेदनात म्हटलं आहे. भारतात राहाणाऱ्या अल्पसंख्यांकांचं होणारं मॉब लिंचिंग आणि द्वेषमूलक अपराध आधी कमी करण्याचं बघावं असंही या निवेदनात पुढे म्हटलं आहे.

भारत सरकार अल्पसंख्यांकांप्रति भेदभावपूर्ण धोरणं आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकारच्या पाठिंब्याने होणाऱ्या कट्टरवादापासून लक्ष विचलित करु शकत नाही.

पाकिस्तानने सांगितलं, "आमच्या घटनेनुसार अल्पसंख्यंकांना पूर्ण संरक्षण आणि अधिकार मिळाले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची न्यायव्यवस्था सगळ्या नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करतं."

एकमेकांवर आरोप

भारतातील मुत्सद्दी अधिकाऱ्यांना कोणत्या कारणासाठी बोलावलं होतं त्याविषयी पाकिस्तानने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील पेशावरमध्ये परविंदर सिंह नावाच्या युवकाची हत्या झाली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली होती.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची निंदा केली होती. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या विरोधात अशा घटनांच्या विरोधात प्रभावी पावलं उचलावी असं भारताने म्हटलं होतं.

भारत या राजकीय हत्येला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेच्या अनुषंगानेच या घटनेला जोडून पाहिले जात आहे अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे.

भारत आणि पाकिस्तान अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावरून एक दुसऱ्यांवर आरोप लावत आहेत. दोन्ही देश आपापल्या देशात अल्पसंख्यांकांची स्थिती चांगली असल्याचा दावा करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)