देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर: भाजप शिवसेनेला भावनिक आवाहन करत आहे का?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्याबरोबर माजी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे हे देखील होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप आणि त्यांच्या स्वतःच्या भाषणाच्या काही क्लिप्स असा मिळून एक व्हीडिओ तयार केला. हा व्हीडिओ त्यांनी शेअर केला आहे.

"स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला !"

असं कॅप्शन देवेंद्र फडणवीस यांनी या व्हीडिओला दिलं आहे. शिवसेना आणि भाजपची जवळपास 30 वर्षांची युती या निवडणुकीच्या निकालानंतर तुटली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत.

कॉमन मिनिमम प्रोग्रॅम किंवा किमान समान कार्यक्रमावर त्यांच्या वाटाघाटी अडल्या आहेत, असंही म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काय आहे या व्हीडिओमध्ये?

पावणे दोन मिनिटांच्या या व्हीडिओ क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक अत्यंत स्फूर्ती देणारं, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्व प्रकारचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते. छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची. त्यांना बघितलं की ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्याने प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती?

आज बाळासाहेब देहाने आमच्यासोबत नाहीत पण त्यांचे विचार आमच्यासोबत आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभत राहो, असं फडणवीस म्हणतात. त्यानंतर बाळासाहेबांच्या वाक्याने या व्हीडिओची सांगता होते. "हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमनात फडकत राहिला पाहिजे."

भाजप शिवसेनेला भावनिक आवाहन करत आहे का?

या व्हीडिओच्या माध्यमातून भाजप शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे का? या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी बीबीसीने ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्याशी बातचीत केली. ते सांगतात, "जर भाजप तसा प्रयत्न करत असेल तर त्यात गैर काहीच नाही."

"सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा मुख्यमंत्री घोषित करून नंतर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवायला काहीच हरकत नव्हती. पण अद्याप त्यांच्या चर्चा सुरूच आहेत. सत्ता स्थापनेला उशीर झाला तर शिवसेनेच्या नेत्यांचे पेशन्स कमी होऊ शकतात. भाजपला ही जाणीव आहे की शिवसेनेशिवाय आपण सत्ता स्थापन करूच शकत नाही," असं अकोलकर यांनी म्हटलं.

"त्यात या तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटीसाठी वेळ जात आहे त्यामुळे भाजपला आयता कालावधी मिळाला आहे. शिवसेना आणि भाजप हे 'नॅचरल अलाय' म्हणून ओळखले जात. अशा प्रकारचा व्हीडिओ तयार करून भाजपने एक प्रकारे 'इमोशनल ब्लॅकमेलिंग'च केलं आहे. आणि राजकीय रणनितीचा भाग म्हणून असा प्रकार का करू नये?" असं अकोलकर विचारतात.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अद्याप एकत्र आलेले नाहीत. जोपर्यंत अधिकृत घोषणा होणार नाही तोपर्यंत भाजप प्रयत्न करू शकतं असं अकोलकर यांना वाटतं.

'कटुता कमी करण्याचा प्रयत्न'

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी व्हीडिओ बनवणं आणि त्याहून अधिक त्यांच्या स्मृतिस्थळाला प्रत्यक्ष भेट देण्यामुळे भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली होती ती कमी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं.

ते सांगतात, की गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पण आज ते प्रत्यक्ष स्मृतिस्थळावर गेले. त्यांच्याबरोबर भाजपचे इतरही नेते होते. त्यामुळे जो हिंदुत्ववादी वर्गाची सहानुभूती त्यांना मिळू शकते. पण केवळ त्यांचा हाच हेतू असावा असं वाटत नाही. कारण संसदेत शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे अशी घोषणाही झाली.

तर मग शिवसेनेलाच का पाठिंबा नाही?

भाजपने हा व्हीडिओ प्रसिद्ध करून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे असं सांगितलं आहे. मग भाजपनं शिवसेनेला का पाठिंबा दिला नाही असा प्रश्न बीबीसीने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांना केला. त्यावर त्यांनी म्हटलं, "शिवसेनेनीच आमच्याबरोबरचा संवाद सोडला आहे. आमची साथ त्यांनीच सोडली. भाजपने नेहमीच सामंजस्यपणाची भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरभाव व्यक्त केला आहे."

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विटरवरून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसेनेची त्यावर काही प्रतिक्रिया आली नाही. या संदर्भात विचारण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, की आठवड्याच्या आतच शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार बनणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)