You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मामल्लपुरममध्ये नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन
- Author, मुरलीधरन कासीविश्वनाथन
- Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मामल्लपूरममध्ये (महाबलीपूरम्) भेट सुरू झाली आहे.
या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पारंपरिक दक्षिण भारतीय पेहरावात दिसून येत आहेत.
मामल्लपूरम् (महाबलीपूरम) मधल्या ऐतिहासिक वास्तूंची नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांना सफर घडवली. तिथल्या ऐतिहासिक वारशाची माहितीसुद्धा यावेळी मोदींनी शी यांना दिली.
भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईऐवजी मामल्लपूरम येथे ही भेट का आयोजित करण्यात आली असेल?
मामल्लपुरम हे ठिकाण चेन्नईपासून 62 किमी अंतरावर ईस्ट कोस्ट रोडवर स्थित आहे. मामल्लपुरम हे पल्लव काळापासून असलेलं एका दगडात कोरलले रथ, गुहांमधल्या मंदिरांचं बनलेलं आहे, तसंच इथे अर्जुनानं तपस्याही केली होती, असाही विश्वास आहे, युनेस्कोच्या ऐतिहासिक ठिकाणाचा दर्जा मामल्लपुरमला प्राप्त झाला आहे. मामल्लपुरम हे तमिळनाडूमधलं पर्यटकांसाठीचं महत्त्वाचं ठिकाण आहे.
वरिष्ठ नेते आणि त्यांचं शिष्टाचार मंडळ मामल्लपुरममध्ये कुठे भेटी देतील ते जाहीर करण्यात आलेलं नाही. समुद्रकिनाऱ्यावरचं मंदिर, अर्जुनानं तपस्या केली ते ठिकाण, इथलं कृष्णाचा वान इरई काल (इंग्रजी नाव - कृष्णाज् बटर बॉल) आदी काही ठिकाणांचा कार्यक्रम पत्रिकेत समावेश आहे. या भेटीमुळे इथलं दुरुस्तीचं काम थांबवण्यात आलं आहे.
याशिवाय या भागातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात येत आहे. 16.5 स्क्वेअर किलोमीटरवर विस्तारलेल्या या छोट्याशा ठिकाणावरचे रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत.
सर्व प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. हॉटेल, लॉज आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांचे तपशील स्थानिक पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहेत.
तसंच समुद्रावरील भटकंतीसाठीही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. 4 ऑक्टोबरपासून मच्छिमारांनाही समुद्रात जायला बंदी घालण्यात आली होती. 500 पेक्षा जास्त पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले आहेत. चीनच्या दूतावासाकडून 20 अधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबरच्या आसपास मामल्लपुरम पाहणीसाठी भेट दिली होती, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम् यांनी मामल्लपुरमला बुधवारी भेट दिली आणि इथल्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली.
मामल्लपुरम
मामल्लपुरममध्ये पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.
वराह गुहा मंदीर
गुहेतलं वराहाचं शिल्प प्रसिद्ध आहे, या शिल्पावरूनच वराह गुहा मंदीर हे नाव पडलेलं आहे. नृसिंहासाठी हे मंदीर बांधलेलं आहे, अशीही दंतकथा आहे. इथे दोन स्तंभ असून ते भिंतीशी जोडलेले आहेत. मंदिराचं गर्भगृह आतल्या बाजूचं बंदिस्त स्वरूपातील नाही, तर ते बाहेरील बाजूस उघडणारं आहे. भिंतीतही वराह शिल्प कोरलेलं आहे.
अर्जुनाच्या तपस्येचं ठिकाण
इथल्या स्थलस्यना पेरुमल मंदिरात अर्जुनानं तपस्या केली होती अशी लोकांची आस्था आहे. मंदीर एका भल्यामोठ्या दगडात कोरलेलं आहे. 30 मीटर उंच आणि 60 मीटर रुंद असा या दगडातील मंदिराचा विस्तार आहे, अर्जुनाचे तपस्यास्थळ किंवा भागीरथाचे तपस्यास्थळ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
रथावरील मंदिरे
ही जागा खासकरून पांडव गुहा म्हणून प्रसिद्ध आहेत. जमिनीला जोडल्या गेलेल्या दगडात ही मंदिरं कोरलेली आहेत. ही मंदिरं पांडवांसाठी बांधली असल्याची दंतकथा आहे, परंतु इथे शिल्प सापडलेली नाहीत. ही मंदिरं शिव, विष्णू आणि कोत्रावाई आदी देवांसाठी बांधलेली होती, असे सांगितले जाते. प्रत्येक मंदीर वेगवेगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं बांधण्यात आलं आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील मंदिरं
मामल्लपुरम नाव किनाऱ्यावरील दोन्ही मंदिरांची प्रतिमा उभी करते. नारसिम्मवरमा II ऊर्फ राजसिंह यांनी उभारली आहेत. तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 2004 साली त्सुनामी आली त्यावेळी मंदिरांमध्ये पाणी शिरलं होतं, परंतु मंदिरांचं फारसं नुकसान झालेलं नाही. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापन केलेले आहे. तमिळनाडूतील युनेस्कोचा दर्जा लाभलेल्या तीन ठिकाणांमधील मामल्लपुरम हे एक ठिकाण आहे.
``मामल्लपुरम हे तमिळनाडूमधील सांस्कृतिक वारसा जपणारं महत्त्वाचं ठिकाण आहे. महाबलीपुरमनंतर विटा आणि लाकडाऐवजी संपूर्ण दगडात कोरलेली मंदिरं उभारण्यात आली आहेत,'' असं तमिळ मारबू ट्रस्टचे आर गोपू म्हणाले.
पांडव गुहा, अर्जुनाचे तपस्या स्थळ, किनाऱ्यावरील मंदीर, कृष्णाचा बटर बॉल आणि लेण्यांमधली मंदिरं ही मामल्लपुरममधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळं आहेत.
"भारतात लेण्यांमधली अनेक मंदिरं आहेत. यापैकी काही एकसंध आहेत तर काही रचण्यात आलेली आहेत. परंतु केवळ मामल्लपुरम या ठिकाणी अशा सर्व प्रकारची मंदिरं एकाच ठिकाणी दिसतात.'' असंही गोपू यांनी सांगितलं.
मामल्लपुरम हे महाबलीपुरम या नावानं प्रसिद्ध आहे, हे ठिकाण नृसिंहवरमा I च्या काळात बांधायला सुरुवात झाली. परंतु त्याच्या काळात हे काम पूर्ण झालं नाही. यानंतर महेंद्रवर्मन II आणि परमेश्वरमवर्मन यांच्या कारकिर्दीत ते पूर्ण झालं.
दोन नेत्यांमधली ही भेट मामल्लपुरममध्ये का घडत आहे?
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तामिळनाडूला इतकं महत्त्व का देत आहे? याबाबत मंत्रालयाकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही, पण या जागेचं स्ट्रॅटेजिक महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
यापूर्वी 27, 28 एप्रिल 2018 रोजी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची वुहान येथे भेट झाली होती. 2017 साली डोकलामच्या प्रश्नामुळे निर्माण झालेला तणाव आता निवळत आहे. यानंतर ही भेट घडते आहे.
"सार्क राष्ट्रांपेक्षा बंगालच्या उपसागराजवळच्या देशांवर भारताला लक्ष केंद्रित करायचं आहे. तसंच बंगालच्या उपसागरावरचा वरचष्माही दाखवायचा आहे. यामुळेच बंगालच्या उपसागराजवळचं ठिकाण निवडण्यात आलं आहे. डिफेन्स एक्स्पोमध्ये डिफेन्स कॉरिडोअरची तामिळनाडूमधली योजना हेच अधोरेखित करते,'' असे थन्नाची थामीझागमचे समन्वयक आणि `पुठिया वल्लारसु चीन'चे लेखक आझी सेन्थिलनाथ यांनी सांगितले आहे.
परंतु ज्येष्ठ पत्रकार आर. के. राधाकृष्णन यांचं मत या विरुद्ध आहे. ते म्हणतात, "हे राजकारण आहे. भाजपाला तामिळनाडूवासियांना आकर्षित करायचं आहे. पंतप्रधान जिथे जातात तिथे तामिळमध्ये बोलतात आणि तामिळचं उदाहरण देत असतात. याव्यतिरिक्त ही भेट तामिळनाडूमध्ये होण्याचं दुसरं काहीही कारण नाही.''
"भारताला जर बंगालच्या उपसागरात वर्चस्व दाखवायचं असतं तर त्यांनी विशाखापट्टणमची निवड केली असती, इथे नौदलाचं मुख्यालयही आहे. तसंच पाकिस्तानशी संघटित बैठकीसाठी उत्तर राज्यांचा विरोध असेल तर दक्षिण भारताची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे फक्त तामिळनाडू महत्त्वाचं आहे एवढंच केंद्र सरकारला दाखवायचं आहे.'' असंही ते पुढे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)