सुषमा स्वराज पंतप्रधान व्हाव्यात असं बाळासाहेब ठाकरेंना मृत्यूआधी का वाटलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
'भाजपमध्ये आज तरी हुशार, ब्रिलियन्ट अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे सुषमा स्वराज.' हे विधान कोणा भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं नसून दुसऱ्याच एका नेत्याचं आहे. हे नेते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. २०१२ साली त्यांच्या मृत्यूच्या अवघे दोन महिने आधी त्यांनी हे विधान केलं होतं.
भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्टला रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्यानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर, भाजपचं मोठं नुकसान झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून व्यक्त केली.
सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नेतृत्व गुणांबद्ल आणि व्यक्तिमत्त्वांबद्दल अनेक जण बोलत आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल एक फार मोठं विधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. या विधानामुळे अनेकांनी भुवया ऊंचावल्या होत्या, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या विधानाचा धक्का बसल्याचं तेव्हा उघड झालं होतं.
सुषमा स्वराज पंतप्रधान व्हाव्यात - बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांनी सप्टेंबर २०१२मध्ये सामनाला विविध विषयांवर मुलाखती दिल्या होत्या. त्यात त्यांनी सुषमा स्वराज यांच्याबाबत ८ सप्टेंबर २०१२च्या सामनातल्या मुलाखतीत हे विधान केलं होतं.
यावेळी ठाकरे म्हणाले होते की, "आज तरी हुशार, ब्रिलियन्ट अशीच एकच व्यक्ती भाजपकडे आहे, ती म्हणजे सुषमा स्वराज. पंतप्रधानदासाठी ती अप्रतिम पसंती होईल. लायक आहे. हुशार बाई आहे. ती अप्रतिमरित्या दणदणीत काम करील असं माझं स्पष्ट मत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केल्यानंतर ती शिवसेनेची अधिकृत भूमिकाही असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे एरव्ही नरेंद्र मोदींना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि त्यांनी देशाचे सर्वोच्च नेते व्हावं या मुद्द्यावर त्यांना पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी मूळ भूमिकेवरून घूमजाव केल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं.
ही भूमिका खरी ठरावी याला पुरावा देणारं मत काही दिवसांत पुन्हा शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राऊत ३ डिसेंबर २०१२ला ते असं म्हणाले की, "निवडणुका होऊ द्या, संख्याबळ समोर येऊ द्या. त्यानंतर ठोस अशी भूमिका घेता येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी भाजपात सुषमा स्वराज या पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. मला वाटतं शिवसेनेच्या या भूमिकेत आताही बदल होणार नाही."
राऊतांनी ही भूमिका मांडल्यानंतर सुषमा स्वराज यांना पंतप्रधान पदासाठी शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं तेव्हा स्पष्टही झालं होतं. आज सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर संजय राऊत यांना या भूमिकेबद्दल विचारण्यासाठी फोन आणि एसएमएसवरून संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

फोटो स्रोत, Twitter
मात्र, १७ नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, तर डिसेंबर २०१२मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आणि शिवसेनेची पंतप्रधानपदाबद्दलची नवी भूमिका पुढे आली. ही भूमिका महाराष्ट्र टाइम्स पेपरनं त्यांच्या २८ डिसेंबरच्या बातमीतही मांडली होती.
सामनाच्या २७ डिसेंबरच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांची ही भूमिका प्रसिद्ध झाली होती. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "मोदी यांचे नेतृत्व गुजरातच्या सीमा पार करून दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलं आहे. त्यांचा अश्वमेध रोखण्याची हिंमत आज तरी कुणात दिसत नाही. त्यांचा रथ खूपच पुढे गेला आहे आणि दिल्लीही आता त्यांना रोखू शकणार नाही. मोदी यांना शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचे आशिर्वाद सदैव राहिले आहेत. या धोरणात बदल होणार नाही."
बाळासाहेबांची आऊट ऑफ द बॉक्स भूमिका
सुषमा स्वराज यांच्या पंतप्रधान होण्याबद्दलच्या विधानाबद्दल आम्ही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्याशीही बातचीत केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
अकोलकर सांगतात, "बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. त्यांनी वेळोवेळी मोदींच्या समर्थनार्थ विधानं केली होती. २०१२मध्ये मोदींच्या नावाची चर्चा होती. बाळासाहेबांना नेहमी 'आऊट ऑफ द बॉक्स' जाऊन बोलण्याची सवय होती. प्रवाहाच्या विरोधात जाऊन विधानं करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच तेव्हा ठाकरेंनी सुषमा स्वराज पंतप्रधान व्हावं अशी चर्चा केल्याची शक्यता आहे."
अकोलकर पुढे सांगतात, "तसंच, सुषमा यांना चांगल्या संधी वेळोवेळी मिळाल्या. त्या हरयाणात जेव्हा मंत्री झाल्या तेव्हा त्या सगळ्यांत तरूण मंत्री होत्या. तसंच, वाजपेयी सरकारच्या काळात त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या आणि मोदींच्या मंत्रिमंडळात त्या परराष्ट्र मंत्री होत्या. त्यापूर्वी त्या लोकसभेत विरोधी पक्षनेत्याही झाल्या होत्या. त्यांच्यातली कुशलता याला कारणीभूत होती. तसंच, त्यांनी वाजपेयींकडून सुंस्कृतता, आडवाणींकडून आक्रमता तर जॉर्ज फर्नांडिसांकडून सामान्यांप्रती आस्था हे गुण स्वीकारले होते. हे बाळासाहेब ठाकरेंनीही हेरलं होतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























