You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई, नागपूर, नाशिक ते संभाजीनगर, सीजेपीच्या आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद; पाहा 10 फोटोतून
दिल्लीतील जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (20 जुलै) महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या.
महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे झालेल्या या आंदोलनांचे फोटो तुम्ही या बातमीत पाहू शकता.
मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पीएसयूचे साम्या कोरडे, भाकपचे मिलिंद रानडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना 'हाऊस अरेस्ट' करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे चैत्यभूमी परिसरात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण होते.
नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. या आंदोलनाची घोषणा संघटनांनी 1 दिवस आधी केली होती.
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत असल्याचे या आंदोलनातून दिसून आले.
राज्यातील विविध शहरांत विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक संघटनांनी एकजूट दर्शवली.
या आंदोलनांमध्येही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करणारे फलक हातात घेतले होते.
सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. या आंदोलनात सीजेपीच्या मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नागपुरातील संविधान चौकात विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला.
नागपुरातील आंदोलनात नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
संविधान चौकात जमलेल्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने नीट पेपरफुटीप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
संविधान चौक परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात आली होती. मात्र आंदोलन शांततेत पार पडले.
देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा आवाज महाराष्ट्रातही पोहोचल्याचे या निदर्शनांतून दिसून आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)