G-20 शिखर परिषदेत युक्रेन-रशियावर काय बोलले पंतप्रधान मोदी?

Published

आजपासून इंडोनेशियातील बाली या ठिकाणी G-20 राष्ट्रांची शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर आहेत.

त्यांनी या ठिकाणी झालेल्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबतच्या सत्रात सहभाग घेतला. त्यांनी यावेळी भाषण केले.

त्यात ते म्हणाले, "कोव्हिड नंतर संपूर्ण जगाची नवीन व्यवस्था बनवण्याची एक जबाबदारी आपल्यावर आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धविरामाबाबतही ते बोलले. दोन्ही देशातील संघर्ष थांबून राजकीय वाटाघाटी सुरू झाल्या पाहिजे. त्यासाठी आपण पावलं उचलणं आवश्यक आहे."

परिषदेचे हे सत्र सुरू होण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन करत चर्चा केली.  याशिवाय मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांचीही भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान या दौऱ्यात 20 भेटी घेणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. सुनक पंतप्रधानपदी आल्यापासून दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. 

G20 राष्ट्रगट म्हणजे काय?

G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.

पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला.

अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.

सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे.

2008 च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख दरवर्षातून एकदा G20 लीडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.

G20 राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 19 देशांचा समावेश आहे.

युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावी सदस्य आहे.

त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंततराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात.

G-20 राष्ट्रगट महत्त्वाचा का आहे?

जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते. जागाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे. साहजिकच या राष्ट्रगटाचं काम अतिशय महत्त्वाचं ठरतं. G20 हे जी-7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप मानलं जातं. विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.

G20 अध्यक्षपद म्हणजे काय?

संयुक्त राष्ट्रांचं जसं न्यूयॉर्कमध्ये एक कार्यालय आहे, तसं G20 देशांचं कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही.

अजेंडा आणि समन्वय साधण्याचं काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात ज्यांना शेरपा म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी एका देशाकडे G20चं अध्यक्षपद येतं. यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात.

प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो. G20 चे विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीनं कारभार चालवातात. भारत इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं G20चा कारभार पाहील. मग 2023 सालची G20 शिखर परिषद भारतात होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)