You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भरधाव ट्रक रस्ता सोडून हॉटेलमध्ये घुसला, 9 जणांचा चिरडून मृत्यू
धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे.
भरधाव ट्रक रस्ता सोडून हॉटेलमध्ये घुसल्यानं हा अपघात झाला. अपघाताचं घटनास्थळ मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे.
या अपघातात एकूण 9 जणांचा जीव गेला. मृतांमध्ये ट्रक चालकाचाही समावेश आहे. तसंच, मृतांमध्ये 13 ते 14 वयोगटातील 3 मुलंही आहेत.
या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून, धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भरधाव ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला असून ट्रक थेट एका हॉटेलमध्ये घुसला. त्यावेळी पाच जणांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या 12 जणांना शिरपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले.”
स्थानिकांनी मिळेल त्या वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघात नेमका कसा झाला?
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मोठे दगड दगड वाहणाऱ्या ट्रकचा ब्रेक झाल्यानं ड्रायव्हरचं नियंत्रण गेलं आणि पळासनेर फाट्याजवळच्या वळणावर अनियंत्रित झालेल्या ट्रक 8 ते 10 वाहनांना धडक देत हायवेच्या बाजूला असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये घुसला.
यावेळी घटनास्थळावर 5 जण ट्रकखाली चिरडले गेले, तर बाजूला उभे असलेले मजूरही ट्रकखाली आले.