You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नसरापूर प्रकरणातील आरोपीवरील दोष सिद्ध; सुनावणीत कोर्टानं काय म्हटलं?
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज (25 जून ) न्यायालयाने निकाल सुनावताना आरोपी हा दोषी आढळला असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे आणि त्यात आरोपीने बलात्कार व हत्या केल्याचे म्हटले आहे.
65 वर्षीय दोषी व्यक्तीला 29 जून रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
राज्यात जलदगतीने सुनावणी होऊन लागलेल्या निकालांपैकी हा एक निकाल ठरला आहे.
निकाल देताना न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने म्हटलं की, या प्रकरणातून स्पष्ट होतं की आरोपीने केलेले वर्तन हे गंभीर स्वरूपाचे आहे.
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात 'शेवटचं एकत्र दिसणं' (लास्ट सीन) आणि परिस्थितीजन्य पुरावे हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे किंवा घटक आहेत. सरकारी पक्षाने हे दोन्ही पुरावे यशस्वीपणे सिद्ध केले असून, त्यावरून आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होतो.
आरोपीने आपल्या पूर्वीच्या वर्तनातून किंवा गुन्हेगारी इतिहासातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन न्यायालयाने आता सर्व प्रतिकूल गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.
"आरोपी याआधी दोन प्रकरणांतून सुटला आहे. पण त्याने त्यातून काहीच धडा घेतल्याचे दिसत नाही. तो समाजासाठी अजूनही धोकादायक ठरू शकतो. त्याच्यात पश्चात्ताप किंवा सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही, तो सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे," असे न्यायालयाने म्हटले.
आपला युक्तिवाद मजबूत करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी 12 महत्त्वाच्या न्यायालयीन निकालांचा संदर्भ दिला आहे. सरकारी वकिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती.
आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
आरोपीच्या वतीने वकील हिम्मतराव सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, आरोपी आणि पीडितेला शेवटचं एकत्र पाहिल्याचा ठोस पुरावा नाही. तसेच, आरोपीने बीएनएसएसच्या कलम 351 अंतर्गत दिलेल्या जबाबात जे स्पष्टीकरण दिलं आहे, तेच स्पष्टीकरण त्याने न्यायालयासमोर प्रत्यक्ष सुनावणीदरम्यानही दिले. त्या स्पष्टीकरणावर अविश्वास दाखवण्याचं कोणतंही कारण नाही.
या समर्थनार्थ त्यांनी पुढील बाबी नमूद केल्या. आरोपी हा 65 वर्षांचा वृद्ध असून त्याला कुटुंबीय आणि गावकऱ्यांनीही दूर केलेलं आहे. त्याने केलेल्या गुन्ह्याच्या क्रूरतेबाबतही काही प्रमाणात शंका असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मीळ' या श्रेणीत येत नाही आणि त्यासाठी फाशीची शिक्षा देणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणातील सर्व परिस्थिती आणि तथ्यं लक्षात घेता, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देणंच योग्य ठरेल, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.
सदर आरोपी या प्रकरणात दोषी आढळला असून 29 जून रोजी या प्रकरणात शिक्षा सुनावली जाणार आहे.
प्रकरण काय?
नसरापूर मध्ये 1 मे 2026 ला साडेतीन वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आजोळी राहायला आलेल्या या मुलीला या व्यक्तीने जवळच्या गोठ्यात नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला होता.
ही मुलगी सापडत नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तेव्हा जवळच्या एका गोठ्यात तिचा मृत देह आढळला होता.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थांनी आंदोलन करत रस्ता रोको देखील केला होता. त्या पाठोपाठ पुण्यात देखील नवले पुलाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं.
या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या. परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी या मुलीला घेऊन जात असल्याचं दिसलं. त्यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी दीड तासांच्या आत आरोपीला अटक केली होती.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करतानाच यापूर्वी देखील या आरोपीवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती असं निष्पन्न झालं होतं.
आरोपीच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया माध्यमांमध्ये आली होती. आम्हाला त्याचे तोंड देखील पाहायचे नाही अशी प्रतिक्रिया आरोपीच्या कुटुंबीयांनी दिली होती.
वेगाने तपास
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी विशेष पथक स्थापन केले होते. यात तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्यासह सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि न्यायवैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांनी तपास केला.
या दरम्यान आरोपीला घटनास्थळावर घेऊन जात तपासणी केली. तसंच आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. डीएनए नमुने, तसंच घटनास्थळावरील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटज याची तपासणी करण्यात आली.
16 दिवसात चार्जशीट
झालेली आंदोलने आणि लोकांचा रोष या पार्श्वभूमीवर तपास तर वेगाने झालाच. शिवाय या प्रकरणात कोर्टात सुनावणीची प्रक्रिया देखील जलदगतीने झाली. पोलिसांनी 16 दिवसात सुमारे 1200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
यानंतर एस आर साळुंके या विशेष न्यायधीशांकडून विशेष न्यायालयात या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. इन कॅमेरा पद्धतीने ही सुनावणी सुरू होती.
मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ तसेच डीएनए विश्लेषक, प्रत्यक्षदर्शी मुलं अशी एकूण 55 साक्षीदारांची साक्ष या प्रकरणात नोंदवण्यात आली.
तसेच न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट या सारखे तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे देखील सादर करण्यात आले.
बचाव पक्षाने काय सांगितले?
आरोपीने सुरुवातीला आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. बचाव पक्षाकडून पुराव्यांबाबत आक्षेप नोंदवत आरोपीला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र वैद्यकीय अहवाल आणि डीएनए प्रोफाईलिंगच्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात आला.
तसेच या घटनेनंतर आरोपीचे संशयास्पद वर्तन आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेल्या कायद्याचा ज्ञानाचा वापर करुन त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला ही बाब ही सरकारी वकिलांनी अधोरेखित केली.
1 मे रोजी ही घटना घडल्यानंतर त्याच दिवशी आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 7 मे ला पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. 14 मे रोजी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पाठोपाठ 16 मे रोजी पोलिसांनी चार्जशीट दाखल केले.
28 मे रोजी विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले. त्यानंतर साक्षी पुराव्यांना सुरात झाली. 3 जून रोजी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.
17 जून ला पुरावे सादर करण्यात आले. तर 20 जून ला या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला.
सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीच्या वतीने अॅड हिंमतराव सूर्यवंशी यांनी बाजू मांडली.
20 दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला.
जलदगतीने निकाल
जलदगतीने सुनावणी होऊन निकाल लागलेल्या देशातील प्रकरणांपैकी हे एक ठरणार आहे. यापूर्वी बिहार मधील 2021 च्या एका प्रकरणात एकाच दिवसात कोर्टाने सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत निकाल दिला होता.
जुलै 2021 मध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. घटनेनंतरच्या दुसर्या दिवशी या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने एकाच दिवसात सुनावणी पूर्ण करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र गुन्हा नोंद होण्यापासून ते निकालापर्यंत साधारण 3 महिन्याचा कालावधी लागला.
त्याचबरोबर वाशी मधील पॉक्सोच्या प्रकरणात 45 दिवसात सुनावणी पूर्ण होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
नसरापूर प्रकरणात साधारण 50 दिवसांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.