कुर्ल्यात चाळीवर कोसळली दरड; 7 जणांचा मृत्यू, 7 जखमींवर उपचार सुरू

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मुंबईतील कुर्ला भागामध्ये मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास एका चाळीवर दरड कोसळल्यानं सातजणांचा मृत्यू झाला आहे.

कुर्ल्यातील चिरागनगरमधील गौसिया चाळीवर हा ढिगारा कोसळला असून सध्या मदतकार्य सुरू आहे.

सध्या पालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी आहेत. जखमींवर भाभा आणि राजावाडी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

भाभा रुग्णालयातील जखमी:

सोहेल अन्सारी (18) – डोक्याला दुखापत

मोहम्मद अन्सारी (14)

नईमुद्दीन इक्बाल खान (28)

साजिद अन्सारी (16)

वरील चौघेही उपचारासाठी दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राजावाडी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलेले:

मोहम्मद समीर अन्सारी (14)

साहिल हुसेन अब्दुल काझी (19)

अज्ञात व्यक्ती (45)

अबान आरिफ शेख (2)

मनत आरिफ शेख (4)

मर्जिना आरिफ शेख (27)

विकेत रमेश यादव (27)

या सातही जणांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

राजावाडी रुग्णालयातील जखमी:

फराना दिलबर खान (28)

दिलबर अमनुल्ला खान (38)

शमीन मुस्लिम खान (26)

या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

नेमकं काय घडलं?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कुर्ल्यातील चिरागनगरमधील राठोड मेडिकलजवळ असलेल्या गौसिया चाळीत पहाटे 3 वाजून 48 च्या सुमारास ही दरड कोसळली.

डीसीपी गणेश शिंदे यांनी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, "पाऊस सुरू असल्यानं दरड कोसळली असून आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून पोलीसही तैनात करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी अनेक पथकं तैनात आहेत. चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे", असंही त्यांनी सांगितलंय.

मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

या दुर्घटनेत डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग 2 ते 3 घरांवर कोसळल्याने जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

त्यांनी सर्व यंत्रणांना मदत कार्य अधिक वेगाने व योग्य समन्वय राखून पार पाडण्याचे निर्देश दिले.

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला 4 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली आहे.

दुर्घटना घडली ती जागा आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त एक व्यक्ती जावू शकेल, इतका अरुंद आहे. घटनास्थळी उपस्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF), मुंबई पोलिस, 108 रुग्णवाहिका आणि इतर सर्व यंत्रणा ह्या घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

बचावकार्य आणि संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)