कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रातल्या नाशिकमधून स्थलांतरित मजुरांसाठी दोन ट्रेन

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेले विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, यात्रेकरू यांना परत आणण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करण्याला केंद्रीय गृहमंत्रालयानं हिरवा कंदील दाखवला आहे.

राज्यांनी रेल्वे बोर्डाशी चर्चा करून त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असं गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी स्पेशल ट्रेन्सची व्यवस्था केली जावी, अशी मागणी महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी केली होती.

त्यानुसार आता या 'श्रमिक स्पेशल' गाड्या राज्या-राज्यादरम्यान धावतील. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. राज्यांसोबत चर्चा करून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी कसं पोहोचवलं जाईल, यासाठी नोडल अधिकारी काम करेल.

1 मे रोजी कामगार दिनानिमित्त सहा 'श्रमिक स्पेशल गाड्या धावतील-

तेलंगणा ते झारखंडमधील हटिया

अलूवा, (केरळ) ते भुवनेश्वर

नाशिक ते लखनौ

नाशिक ते भोपाळ

जयपूरहून पटना आणि कोट्याहून हटिया

तेलंगणाहून झारखंडसाठी विशेष ट्रेन

दरम्यान शुक्रवारी (1 मे) पहाटे तेलंगणाच्या लिंगमपल्ली इथून झारखंडच्या हटियासाठी एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. शुक्रवारी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी निघालेल्या या ट्रेनला 24 कोचेस होते. या गाडीमधून 1200 प्रवासी लिंगमपल्ली ते हटिया प्रवास करत होते.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे डीजी अरुण कुमार यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटलं, " 24 कोचेस असलेली ट्रेन 1200 प्रवाशांना घेऊन झारखंडवरुन हटियासाठी निघाली आहे. ट्रेन सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय."

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, "प्रत्येक राज्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना आणण्यासाठी राज्य सरकार सक्षम नाहीत. आमच्याजवळ मर्यादित साधनसामुग्री आहे. आम्ही आमच्या मजुरांना आणायला बसेसची व्यवस्था केली तरी त्यासाठी 6 महिन्यांचा वेळ लागेल."

झारखंड सरकारच्या माहितीनुसार राज्यातले जवळपास 5 लाख मजूर, विद्यार्थी आणि यात्रेकरू दुसऱ्या राज्यात अडकले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि त्यासंबंधीची माहितीही ट्विटरवर दिली.

महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळ सरकारनंही अशी मागणी केली होती. दरम्यान तेलंगणा आणि झारखंडदरम्यान धावलेल्या या विशेष ट्रेनबद्दल रेल्वेकडून माहिती देण्यात आली.

"तेलंगणा सरकारनं केलेली विनंती आणि रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार लिंगमपल्लीहून रांचीतील हटियापर्यंत एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. ही ट्रेन सोडताना सर्व प्रकारचे खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत. प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्यात आलं, स्टेनशन आणि ट्रेनमध्येही सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेतली गेली. अशा प्रकारची ही पहिली ट्रेन आहे आणि रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार अशा विशेष ट्रेन्स चालवल्या जातील. ज्या राज्यातून ट्रेन सुटणार आहे आणि ज्या राज्यात पोहोचणार आहेत त्यांच्या विनंतीवरही हे अवलंबून असेल.

सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी

1200 लोकांना ट्रेनमधून आणताना सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी कशी घेतली जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तेलंगणातील लिंगमपल्लीहून झारखंडमधील हटियापर्यंतच अंतर जवळपास 1300 किलोमीटर आहे.

खरंतर ही पूर्ण ट्रेन 24 कोच असलेली स्लीपर ट्रेन आहे. प्रत्येक कोचमध्ये 72 लोकांच्या बसण्याची व्यवस्था होते, मात्र या स्पेशल ट्रेनमध्ये एका कोचमधून 50 जणांना आणण्यात येत आहे.

ANI या वृत्तसंस्थेनं विशेष ट्रेनचे काही फोटो पाठवले आहेत. त्यानुसार या गाड्यांमधील मधला बर्थ रिकामा असेल. ही ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबणार नाही.

ट्रेन केवळ ऑपरेशनल हॉल्ट घेईल. गाडीमध्येच प्रवाशांना जेवण-पाणी पुरवलं जाईल. या स्पेशल ट्रेनची वेळ सकाळची ठेवली गेली, कारण त्यामुळे बेड रोलचा वापर होणार नाही आणि संसर्गाचा धोक कमी असेल.

सेंट्रलाइज्ड एसीमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे स्लीपर कोचचा वापर करण्याच येईल.

रेल्वे भाडं कोण देणार?

गृहमंत्रालयानं आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलंय, की रेल्वे मंत्रालय तिकीट विक्रीसंदर्भात नवीन सूचना प्रसिद्ध करेल. रेल्वे भाडं अडकलेल्या मजुरांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार की राज्य सरकारकडून हे अजूनही स्पष्ट करण्यात आलं नाहीये.

मात्र गेल्यावेळेस जेव्हा बसेसमधून सर्व मजुरांना नेण्यात आलं होतं, तेव्हा प्रवाशांकडून भाडे वसुली करण्यात आली होती.

कोटाहून रांचीला आज दोन विशेष रेल्वे गाड्या

राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना वापस आणण्यासाठी शुक्रवारी दोन विशेष रेल्वे गाड्या कोटा येथून रांचीला धावणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही माहिती दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)