You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
20 वर्षांच्या लढाईनंतर आम्ही परदेशी सैन्याला पळवून लावलं - तालिबान
अफगाणिस्तानची सत्ता आता तालिबानच्या हाती गेली आहे. त्या ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींचा लेखाजोखा.
लाईव्ह कव्हरेज
काबूलहून आलेलं विमान जामनगरमध्ये उतरलं
भारतीय हवाई सेनेचं C17हे काबूलहून आलेलं विमान गुजरातमधील जामनगर येथे उतरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काबूलमधील भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन हे विमान आलं आहे.
काबूल विमानतळ झाले सुरू
देशाबाहेर जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने सोमवारी काबूल विमानतळ बंद करण्यात आला होता.
तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. देशाबाहेर जाणाऱ्या विमानात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही करण्यात आला.
प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत पाचजणांचा मृत्यू झाला होता.
राजदूत, दूतावासांचे कर्मचारी यांना अफगाणिस्तानच्या बाहेर जाण्यादृष्टीने तसंच सर्वसामान्य नागरिकांना बाहेर जाता यावं यासाठी काबूल विमानतळ सुरू करण्यात आला आहे.
सोमवारी आलेली बहुतांश माणसं आपापल्या घरी परतल्या आहेत. मात्र आजही विमानतळावर गोळीबाराचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
मराठ्यांना पानिपतमध्ये हरवणाऱ्या अब्दालीला अफगाणिस्तानात हिरो का मानतात?
अफगाणिस्तानमधील भारतीय राजदूत, दूतावास कर्मचारी मायदेशी परतणार
अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, भारतीय राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना तात्काळ भारतात आणलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं.
अफगाणिस्तानमधली बदलती परिस्थिती लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने व्हिसासंदर्भात नियमावलीमध्ये बदल करायचं ठरवलं आहे.
भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना त्वरित व्हिसा मिळावा यासाठी स्वतंत्र इ-इमर्जन्सी एक्स व्हिसा अशी श्रेणी तयार करण्यात येणार आहे.
काबूलमधील हिंदू तसंच शीख समाजाच्या नेत्यांशी सातत्याने संपर्कात आहोत असं परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं होतं. त्यांची सुरक्षितता हे भारतासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अफगाणिस्तानसंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. काबूल विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदत अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित करू असंही त्यांनी सांगितलं.
अफगाणिस्तानचे 750 सैनिक आमच्याकडे पळून आले- उझबेकिस्तान
गेल्या 48 तासात 750 अफगाणिस्तानचे सैनिक आमच्या देशात पळून आल्याचं उझबेकिस्तानने म्हटलं आहे.
600 अफगाणिस्तान सैनिक हवाई मार्गाने पोहोचले. उर्वरित 158 जण सीमा पार करून आमच्या देशात आल्याचं म्हटलं आहे.
अफगाणिस्तानची उत्तर सीमा उझबेकिस्तानला लागून आहे.
तेरमेज शहरात 46 लढाऊ विमानं उतरल्याचं उझबेकिस्तान प्रशासनाने सांगितलं.
'अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल होतं पण नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता'- बबिता फोगट
तालिबान असल्याचं भासवून लूटमार, सौतिक बिश्वास, बीबीसी प्रतिनिधी
रविवारी अज्ञात माणसांचा समूह गाडीतून काबूलच्या मध्य प्रांतातल्या आदिल अहमद साफी यांच्या घरी थडकले. तुमच्या घरी कुणी सरकारी नोकरीत आहे का अशी त्यांनी विचारणा केली.
सरकारी नोकरीतलं कोणी नाही हे कळल्यावर गाडी निघून गेली.
"आज सकाळी आम्ही फेसबुक पोस्ट पाहिली. विग घातलेले आणि तालिबान असल्याचं भासवणारे लोक लूटमार करत आहेत", असं 26वर्षीय साफी यांनी सांगितलं.
"ही माणसं कोण होती मला ठाऊक नाही पण ते लूटमार करण्यासाठीच आले होते असा मला संशय आहे", असं साफीने सांगितलं.
काबूलमधल्या एका खाजगी शाळेसाठी ह्यूमन रिसोर्स मॅनेजर म्हणून काम करतात. 2300 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. भारतातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतल्यानंतर साफी काबूलला परतले आहेत.
"चांगल्या भवितव्यासाठी मी काबूलला परतलो मात्र आता सगळं अंधारमय दिसतं आहे. जी माणसं अशा परिस्थितीत कधीच राहिली नाहीत त्यांच्यासाठी हे कठीण आहे," असं साफी सांगतात.
एकच चांगली गोष्ट म्हणजे काबूलमध्ये अद्यापतरी हिंसाचार झालेला नाही. नवं सरकार शांतता प्रस्थापित करेल आणि समान संधी देणारं असेल अशी आशा करतो. आधीच्या सरकारमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार होता. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी लाच द्यावी लागत असे.
काबूलमधील बहुतांश दुकानं उघडी आहेत. शाळा आणि खाजगी कार्यालयं बंद आहेत.
तालिबान असल्याचं भासवून होणारी लूटमार आमच्यासाठी काळजीचा विषय आहे असं साफी यांनी सांगितलं.
देशांनी आपल्या सीमा अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी खुल्या कराव्यात-मलाला
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानसाठी भरीव योगदान द्यायला हवं, त्यांना अजून खूप काही करायचं आहे. त्यांनी धाडसी पाऊल उचलायलं हवं", असं शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने म्हटलं आहे. बीबीसीच्या टूज न्यूजनाईट या कार्यक्रमात ती बोलत होती.
2012 मध्ये तालिबान्यांनी तेव्हा पंधरावर्षीय मलालावर डोक्यात गोळीबार केला होता. त्यानंतर मलाला युकेत आहे.
"अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या रक्षणासाठी जागतिक नेत्यांनी विशेषत:अमेरिका आणि युकेच्या नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. अन्य देशांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी सीमा खुल्या कराव्यात", असं मलालाने म्हटलं आहे.
"तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं यासंदर्भात अमेरिका बेजबाबदार विधानं करत आहेत. अमेरिकेने ज्या पद्धतीने याला युद्ध संबोधलं आणि या युद्धात विजयी झालो असं जाहीर केलं त्यामुळे चुकीची प्रतिमा तयार झाली", असं मलालाने सांगितलं.
तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा, याचा भारतावर काय परिणाम होणार?
अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतणार
अफगाणिस्तानातून भारतात परत येऊ इच्छिणारे नागरिक सुरक्षित ठिकाणी आहेत आणि त्यांना एक ते दोन दिवसात मायदेशी आणलं जाईल असं एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
ब्रिटन अफगाणिस्तानला 200 सैनिक पाठवणार
काबूल विमानतळावर लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ब्रिटन अतिरिक्त 200 सैनिक पाठवणार आहे.
नव्या सैनिकांची तुकडी दाखल झाल्यावर अफगाणिस्तानमधील ब्रिटिश सैनिकांची संख्या 900 एवढी होणार आहे.
रॉयल एअरफोर्सच्या विमानांचा जथ्थाही अफगाणिस्तानला पाठवण्यात येणार आहे.
अमेरिकेनेही सैनिकांची कुमक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या सैनिकांची संख्या 1,000वरून 7,000 होणार आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी बायडन यांनी अफगाण नेत्यांवर फोडलं खापर
अफगाणिस्तानच्या अवस्थेसाठी देश सोडून जाणारे नेतेच जबाबदार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेने अफगाण सैन्याला चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं तसंच शस्त्रास्त्रं पुरवली. पण ते लढू शकले नाहीत. काही ठिकाणी त्यांनी संघर्ष केला पण त्यांना यश मिळू शकलं नाही.
देशाच्या भल्यासाठी अफगाणिस्तानचे नेते एकत्र येऊ शकले नाहीत. अफगाण लोकांच्या मदतीचं काम सुरूच राहील असं बायडन यांनी म्हटलं आहे.
काल दिवसभरात अफगाणिस्तानमध्ये काय घडलं?
आज 17 ऑगस्ट, मंगळवार. भारताचा शेजारी असलेल्या अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. या पानावर तुम्हाला अफगाणिस्तानासंदर्भातील ताज्या घडमोडी, विश्लेषण, व्हीडिओ सर्व काही मिळत राहील.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काल प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर काबूलमधील लोक सैरभैर झाल्याचं पहायला मिळालं.
मिळेल त्या वाटेने लोक विमानतळावर जायला निघाले. अगदी उड्डाण घेत असलेल्या विमानावरही काही लोकांनी चढण्याचा प्रयत्न केला.
विमानतळावर झालेल्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही गोंधळाची स्थिती दिवसभर होती. अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांनी परत आणण्याचे प्रयत्न चालू ठेवलेत.
भारतानेही तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कटीबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. दुसरीकडे सौदी अरेबियाने आपले राजदूत माघारी बोलावले आहे.
1996 मध्ये अफगाणात तालिबानप्रणित प्रशासनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये सौदी अरेबियाचा समावेश होता हे उल्लेखनीय.
अफगाणिस्तानातील या घडामोडींवर भाष्य करताना तालिबान बरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास इच्छुक असल्याचं चीनने सांगितलं.
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर काबुलमधील लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुढे काय होईल कोणालाचा माहिती नाही. त्यामुळे अनिश्चितता, असुरक्षितता आणि मायदेशी जाण्याची आस या अवस्थेत अफगाण नागरिक जगत आहेत.
अफगाणिस्तानच्या स्थितीचे पडसाद संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतही उमटले. काल दिवसभरातील घडमोडी पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या 16 ऑगस्ट 2021 च्या पेज ला भेट द्या.