अजित पवारांनी'देवगिरी'या सरकारी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली. प्रफुल्ल पटेल,सुप्रिया सुळे,छगन भुजबळांसह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतरच महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील मात्र नव्हते.
या बैठकीनंतर पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यात अजित पवारांच्या या बैठकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना आमदारांची बैठक घेण्याचा अधिकार आहे.
पवारांची पत्रकार परिषद संपताच इकडे मुंबईत राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. अजित पवारांच्या निवासस्थानातून नेत्यांसह गाड्यांचा ताफा राजभवनाच्या दिशेला निघाला. या ताफ्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसह वरिष्ठ नेते होते. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे राजभवनात गेल्या नाहीत.
एव्हाना अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार, याची माहिती महाराष्ट्रासह देशभर पोहोचली होती. राजभवनाचा दरबार हॉलही शपथविधीसाठी सजवण्यात आला होता.
अजित पवारांचा ताफा राजभवनाकडे जात असताना, दुसरीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनाकडे निघाले. यातून अजित पवारांच्या बंडावर शिक्कामोर्तबच झालं.
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचल्यानंतर तिथं राज्यपाल रमेश बैसही आले आणि शपथविधीला सुरुवात झाली.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले प्रफुल्ल पटेल हेही राजभवनात उपस्थित होते. तसंच, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे, आमदार अमोल मिटकरी हे नेतेही उपस्थित होते.
या शपथविधीनं महाराष्ट्रासह देशभरात राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला की अजित पवार यांनी बंड केलं, याबाबत गोंधळाचं वातावरण तयार झालं असतानाच, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्हीडिओ जारी करत स्पष्ट केलं की, अजित पवारांच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाहीय.
शपथविधीनंतर शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा नसल्याचंच स्पष्ट केलं. तसंच पवार म्हणाले की, माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षातील विशेषतः विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली,याचं चित्र पुढील दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
मात्र, शपथविधीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत”असा दावा केला.
तसंच, अजित पवार म्हणाले की,“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही याच नावाखाली आणि चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला न्याय देणं गरजेचं आहे. आम्हाला अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग सरकारला होईल. सोबतच पक्ष अधिक मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.”
अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यात जयंत पाटील म्हणाले की,“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे सरकार आणि भाजपला आमचा कोणताही पाठिंबा नाहीये. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन शपथ घेतली आहे,त्यांनाही आमचा विरोध आहे.”
तसंच, जयंत पाटील म्हणाले की,“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहील आणि शरद पवार यांच्या सोबत राहील. काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या संमतीशिवाय विरोधी पक्षात जाऊन शपथविधीचा कार्यक्रम झाला आहे. विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते व्यथित होऊन झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत.”
तसंच, जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिली की, जितेंद्र आव्हाड हे नवे विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे प्रतोद असतील. तसंच, 5 जुलै रोजी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि संघटनांची मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठक आयोजित केल्याचीही माहिती दिली.
यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी“आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत,”असं म्हणत यू-टर्न घेतला. त्यांनी ट्विटरवरून तशी माहिती दिली.
2 जुलै रोजीच रात्री उशिरा सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यांनी पक्षातील घडामोडींवर ठोस अशी कोणतीच भूमिका जाहीर केली नाही.