You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

देशात 24 तासांत आढळले 7,466 कोरोनाग्रस्त, आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक वाढ

राज्यात आज 2,598 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 59,546 अशी झाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. होम क्वारंटाईनच्या नियमाचं उल्लंघन केल्यास 2 हजारांचा दंड

    मध्य प्रदेशात होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बुधवारी मध्य प्रदेश सरकारने याबाबतचा आदेश लागू केला आहे.

    राज्याच्या आरोग्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या या आदेशानुसार, एखाद्या व्यक्तीने होम क्वारंटाईनचा नियम मोडल्यास 2 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याने दुसऱ्यांदा या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याची रवानगी संस्थांत्मक क्वारंटाईन केंद्रात केली जाईल.

    केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीनुसार कोरोना व्हायरसबाबतची सौम्य किंवा सुरुवातीची लक्षणं आढळून आल्यानंतर संबंधितांनी तातडीने होम क्वारंटाईन झालं पाहिजे. या व्यक्तीवर निगराणी ठेवण्यात येईल. त्याने सर्व नियम पाळणं अपेक्षित आहे.

    मध्य प्रदेशात आतापर्यंत 7261 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे 313 मृत्यूंची नोंद आहे. तर 3927 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  2. स्थलांतरित मजुरांच्या स्थितीबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी

    लाखो स्थलांतरित मजुरांची लॉकडाऊनमुळे प्रचंड गैरसोय झाल्याच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

    न्यायमूर्ती अशोक भूषण, न्या. संजय किशन कौल आणि न्या. एम. आर. शाह या तीन न्यायाधीशांसमोर ही सुनावणी होईल.

    मंगळवारी सुप्रिम कोर्टाने स्थलांतरित मजुरांच्या स्थितीबाबतची सुनावणी सो मोटो पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. मजुरांच्या स्थितीची दखल घेताना कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला त्यांच्या कामाबाबत त्रुटी दर्शवल्या होत्या.

    केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मजुरांच्या प्रवासाची सोय करावी, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात यावी. यासाठीची सर्व उपाययोजना तातडीने करण्यात यावी, असं कोर्टाने म्हटलं होतं.

    तसंच केंद्र आणि राज्यात योग्य समन्वय राखून ही संपूर्ण कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना कोर्टाने केली होती. याबाबत केंद्र सरकार आज एक अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

  3. लॉकडाऊन खरंच यशस्वी झाला आहे का?

  4. उद्धव ठाकरे सरकार: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या महाविकास आघाडीत सगळं आलबेल आहे का?

    28 नोव्हेंबर 2019 राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना घेरण्याचं भाजप प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र येऊन काल संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. हे सरकार स्थापन करण्यासाठी भिन्न विचारधारेचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आले. विरोधकांकडून तीन चाकांचं हे सरकार लवकरच घसरणार अशी टीका केली गेली. पण महाविकास सरकारला आता 6 महिने पूर्ण होतायेत. याचवेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही निर्णय प्रक्रियेत कुठेही नसल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजी असल्याचं समोर आलंय.

  5. श्रमिक एक्सप्रेसमधून जाणाऱ्या महिलेने दिला बाळाला जन्म

    श्रमिक एक्सप्रेसमधून जात असलेल्या महिलेने बाळाला जन्म दिला आहे. आशा कुमारी असं या महिलेचं नाव आहे.

    आशा कुमारी या काल(बुधवारी) श्रमिक एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या. केऊल-गया रेल्वे मार्गावर संध्याकाळी 7 वाजता गाडी सिरारी रेल्वे स्थानकावर आली असताना त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्या.

    त्यानंतर त्यांना गाडीतून उतरवून सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी एका मुलीला जन्म दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  6. उद्धव ठाकरे भाजपच्या जाळ्यात अडकतील का?

  7. बांगलादेशात रुग्णालयाला आग लागून 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका रुग्णालयाला आग लागण्याची घटना घडली. या आगीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

    मृतांमध्ये चार पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

  8. ब्रेकिंग, देशात गेल्या 24 तासांत 6566 कोरोनाग्रस्त आढळले, 194 जणांचा मृ्त्यू

    देशात गेल्या 24 तासात 6566 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 1 लाख 58 हजार 333 वर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    तर मागील एका दिवसात कोरोनामुळे 194 मृत्यूंची नोंद झाली. देशात आतापर्यंत 4531 जणांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला आहे.

    देशातील 67 हजार 692 कोरोनाग्रस्त आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 86 हजार 110 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  9. केनियातला 'हा' शिक्षक लॉकडाऊनमध्ये असं देतोय मुलांना शिक्षण

  10. ब्रेकिंग, कोरोना व्हायरसग्रस्तांचा जगभरातील आकडा 57 लाखांवर, आतापर्यंत 3 लाख 55 हजार मृत्यू

    जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 56 लाख 90 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत जगभरात कोव्हिड-19 मुळे 3 लाख 55 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    अमेरिकेत जगात सर्वाधिक मृत्यू झाले असून इथं आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इथं 17 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

  11. तबलिगी जमात प्रकरणी 12 नवी आरोपपत्रं दाखल होणार

    तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 536 परदेशी नागरिकांवर गुन्हे शाखा आज साकेत कोर्टामध्ये 12 नवी आरोपपत्रं दाखल करणार आहे. आतापर्यंत 374 परदेशी नागरिकांवर 35 आरोपपत्रं दाखल केली आहेत.

  12. जॉगिंग, वॉकिंगसाठी लोक रस्त्यावर येण्यास सुरुवात

    जॉगिंग, वॉकिंग आणि सायकलिंग यांसारखे व्यायामप्रकार करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवर लोक येण्यास सुरुवात झाली आहे.

    सरकारने काल एक परिपत्रक काढून लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून एकट्याने व्यायाम करण्यासाठी पार्कमध्ये जाता येऊ शकेल. तसंच वॉकिंग आणि सायकलिंगही करता येऊ शकेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आज सकाळच्या सुमारास रस्ते आणि पार्कांमध्ये लोक हळूहळू येत असल्याचं दिसून आलं.

  13. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना लॉकडाऊन उठवणे योग्य आहे? #सोपीगोष्ट

    24 मार्च रोजी देशात कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या 564 होती आणि राज्यातल्या रुग्णांची संख्या 101 होती. 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारतातल्या रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार आहे. त्यापैकी एक तृतियांश रुग्ण हे महाराष्ट्राचे आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 54,758 इतकी आहे. तेव्हा लॉकडाऊनचा उद्देश सफल झाला नाही का? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. संख्या वाढत असताना लॉकडाऊन उठवला जाणार आहे असं दिसत आहे तेव्हा सरकारची पुढची योजना नेमकी काय आहे असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. लॉकडाऊन ज्या उद्दिष्टासाठी लावण्यात आला होता ते उद्दिष्ट आपण गाठलं आहे का? असा सवाल आता सर्व स्तरातून येत आहे. आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भारतात लॉकडाऊन यशस्वी झाला की नाही?

  14. भारतात मृतांची संख्या जुलै महिन्यात 18 हजारापर्यंत जाण्याची शक्यता

  15. महाविकास आघाडीच्या तीन पक्षातला समन्वय तुटत चाललाय का?

  16. ब्रेकिंग, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख लोकांचा मृत्यू

    अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू संख्येने 1 लाखाचा आकडा ओलांडला आहे. अमेरिकेत जवळपास 17 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

    जगात कोरोनाची लागण झालेल्या एकूण संख्येच्या 30 टक्के रुग्णांची संख्या एकट्य़ा अमेरिकेत आहे.

    जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेलेया माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 1,00,276 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  17. कोव्हिड-19 च्या साथीची दुसरी लाट जगभरात येऊ शकते का?

  18. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी

    नमस्कारगेले काही दिवस आपण दररोज लाइव्ह पेजच्या माध्यमातून विविध घडामोडी जाणून घेत आहोत. काल घडलेल्या ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे

    1) महाराष्ट्रात बुधवारी (27 मे) कोरोनाची लागण झालेले 2190 नवीन रुग्ण आढळले.2) राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 56,948 झाली आहे. बुधवारी एकूण 105 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

    3) कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 1897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 17918 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

    4) काल महाविकासआघाडीच्या घटक पक्षांनी भाजपवर तर भाजपने सरकारवर टीका केली आहे.