You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
"विमानात सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही"- हरदीप सिंह पुरी
राज्य, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
कोरोनावर मात करण्यासाठी मुंबईकरांमध्ये तयार झालेली 'हर्ड इम्युनिटी' आहे काय?
आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा
नमस्कार मंडळी,
आजचं बीबीसी न्यूज मराठीचं लाईव्ह कव्हरेज इथेच थांबवत आहोत.
जाता जाता एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर -
- विमानात सोशल डिस्टन्सिंग नाही, सर्व सीट भरणार - हरदीप सिंह पुरी
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने
- राज्यात आज 2345 नव्या रुग्णांची नोंद, एकूण संख्या 41 हजार 642 वर
- रेड झोन, कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात जिल्हांतर्गत एसटी बस उद्यापासून सुरू - परिवहन मंत्री अनिल परब
- एकट्या उत्तर प्रदेशात 15 लाखांहून अधिक स्थलांतरित दाखल
- ऑलिंपिक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता
- जगभरातल्या रुग्णसंख्येत एका दिवसात उच्चांकी वाढ - WHO
कोरोना व्हायरससंदर्भात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला उद्या पुन्हा भेट द्या.
धन्यवाद, शुभरात्री.
'उपाशी मुलीसाठी तांदूळ मागायला घराबाहेर पडले, पण तेवढ्यातच ती गेली'
लॉकडाऊनदरम्यान सायबर पोलिसांत 404 गुन्हे दाखल, 213 जणांना अटक
लॉकडाऊन काळात समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी 404 गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 213 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
सध्या Mont Blanc नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत, त्यापासून नागरिकांनी सावध राहावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
रेल्वे आणि विमान प्रवासासाठी या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना
100 कोरोनाग्रस्त मातांचं बाळंतपण या रुग्णालयानं कसं केलं?
रेड झोन, कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात जिल्हांतर्गत एसटी बस उद्यापासून सुरू - परिवहन मंत्री अनिल परब
रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटी-शर्थींसह उद्यापासून (22 मे) जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे.
जिल्हांतर्गत म्हणजे फक्त जिल्ह्यांच्या सीमेपर्यंतच एसटी बस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं परब यांनी सांगितलं आहे.
एसटी बसप्रवासासाठीचे नियम खालीलप्रमाणे -
- जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही बस सेवा सुरु राहील.
- प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
- सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50% प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
- जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून)
- प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
- प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
राज्यात आज 2345 नव्या रुग्णांची नोंद, एकूण संख्या 41 हजार 642 वर
महाराष्ट्रात आज(गुरुवारी) कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 2345 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 41 हजार 642 वर पोहोचली आहे.
सध्या राज्यातील 28 हजार 454 कोरोनाबाधितांवर विविद रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
आज राज्यात 64 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 1454 वर पोहोचली आहे.
राज्यात आज 1408 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत 11 हजार726 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबईत आतापर्यंत 25 हजार 500 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर पुण्यामध्ये 4207 कोरोनाग्रस्त आतापर्यंत आढळून आले आहेत. तर इथं 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशात ग्रीन झोनमध्ये सलून दुकानांसाठी नवीन नियमावली
मध्य प्रदेशात ग्रीन झोनमध्ये सलून दुकान सुरू करण्यासाठी सात नियमांसह नवी नियमावली देण्यात आली आहे.
मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर, ग्लोव्ह्ज आणि अप्रन तसंच निर्जंतुकांचा वापर यांच्यासारख्या नियमांचा या नियमावलीमध्ये समावेश आहे.
#CoronaPodcast : कोरोना व्हायरससंदर्भात आज काय-काय घडलं?
#CoronaPodcast :आजपासून रेल्वेचं बुकिंग सुरु पण काय आहेत नवे नियम? 25 मेपासून सुरु होणाऱ्या विमान प्रवासात सोशल डिस्टन्सिंग नाही, विमान प्रवासातल्या काय आहेत नव्या अटी? पुण्यात साध्या पद्धतीनं साजरा होणार सार्वजनिक गणेशोत्सव, अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बॅगालला झोडपलं, काय आहे ताजी परिस्थिती? सांगतायत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि विनायक विनायक गायकवाड
पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय - अजित पवार
पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले आहेत.
राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही या निर्णयाचं अनुकरण करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुणे शहरानं नेहमीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व केलं असून समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे.
पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा या मानाच्या गणपती मंडळांनी, तसंच भाऊ रंगारी मंडळ, श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व अन्य गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि सार्वजनिक हिताच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय आहे.
विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी झालेली बैठक देखील ‘ऑनलाईन’ झाली. सार्वजनिक उत्सव साधेपणानं साजरा करत असताना महापालिका व पोलिस यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद आहे. पुण्यातील सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींनी दाखवलेलं हे समाजभान कौतुकास्पद आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचा हा निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. राज्यातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1425 वर
मुंबईतील झोपडपट्टीचा परिसर असलेल्या धारावी भागातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे.
आज धारावीमध्ये 47 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे या परिसरात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 1425 वर पोहोचली आहे.आज धारावीमध्ये कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी डोनाल्ड ट्रंप घेतायत ‘या’ गोळ्या
विमानात सोशल डिस्टन्सिंग नाही, सर्व सीट भरणार - हरदीप सिंह पुरी
येत्या 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पण विमानात सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही, त्यामुळे सर्व सीट भरण्यात येतील, असं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय मंत्रालयाकडून विमान प्रवासाचं भाडं निश्चित करण्यात आल्याची माहिती यावेळी पुरी यांनी दिली. विमानप्रवासासाठी लागणाऱ्या वेळेनुसार त्यांची सात मार्गांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यासाठीचा किमान आणि कमाल दर मंत्रालयाने ठरवून दिला आहे.
तसंच विमान प्रवासासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने अनेक अटी व शर्थी घातल्याची माहिती मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.
देशांतर्गत विमान वाहतुकीचा अनुभव पाहून मगच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असंही पुरी यांनी सांगितलं.
विमानप्रवासासाठी आवश्यक अटी व शर्थी खालीलप्रमाणे –
- प्रत्येक प्रवाशाने मास्क घातलेला असावा. सॅनिटायझर सोबत बाळगणं अनिवार्य.
- विमानात सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही, सर्व सीट भरण्यात येतील.
- प्रवासात जेवण मिळणार नाही. पाण्याच्या बाटल्या सीटबाजूला ठेवलेल्या असतील.
- प्रवाशांनी आरोग्य सेतू अपवर डाऊनलोड केलेलं असणं बंधनकारक आहे. त्यामध्ये कोव्हिड-19ची लक्षणं दिसत नसल्याबाबत स्वयंघोषित केलेलं असावं. आरोग्य सेतू अपवर रेड स्टेटस असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही.
- केबिन क्रूने सुरक्षात्मक उपाययोजना केलेल्या असाव्यात.
- फक्त एका चेक इन बॅगला परवानगी.
- प्रवाशांनी वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे.
- विमान भाडं नियंत्रणात आणण्यासाठी एका विशिष्ट मॉडेलचा वापर करावा.
- सध्याच्या नियोजित वेळापत्रकापैकी फक्त एक तृतीयांश (33.33 टक्के) विमानांचं उड्डाण होईल.
- उदाहरणार्थ, दिल्ली-मुंबई प्रवासासाठी 90 ते 120 मिनिट लागतात. या प्रवासाचं भाडं कमीत-कमी 3500 रुपये ते जास्तीत जास्त 10 हजार असू शकेल. विमानातली चाळीस टक्के तिकीटं या किमान आणि कमाल भाड्याच्या रकमेचा मध्यबिंदू म्हणजेच 6700 रुपयांपेक्षा कमी दराने विकली जावीत. यामुळे भाडं नियंत्रणात राहू शकेल.
- देशातील हवाई मार्गांची प्रवासास लागणाऱ्या वेळेनुसार सात भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यानुसार त्यांचा दर ठरवण्यात येईल.
- हे नियम तीन महिने म्हणजेच 24 ऑगस्टपर्यंत लागू असतील.
राज्यस्तरीय बैठकीत खरीप हंगामपूर्व नियोजनाचा आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत खरीप हंगामपूर्व तयारी व नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार पिकं घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणे, खतांची उपलब्धता. शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे. पीक विमा योजनेबाबत केंद्र शासनाबरोबर चर्चा सुरू आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
तर कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक संकट. त्यामुळे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा यासारख्या विभागांना प्राधान्याने निधी. त्यामध्ये कृषी विभागाचाही समावेश केला जाईल. कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन. आतापर्यंत 18 हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून 60 हजार मेट्रिक टन खते, 20 हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत 15 लाखांहून जास्त स्थलांतरित दाखल
देशात कोणत्याही राज्यातून उत्तर प्रदेशमध्ये जात असलेल्या स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेशमध्ये 15 लाख 27 हजार स्थलांतरित दाखल झाले आहेत, अशी माहिती राज्याचे अपर मुख्य गृह सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी दिली आहे.
देशात 50 टक्क्यांपैक्षा जास्त रेल्वे उत्तर प्रदेशातच दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 1154 रेल्वे राज्यात दाखल झाल्या आहेत. तर अजून 381 रेल्वेगाड्यांनी विविध राज्यांतून प्रस्थान केलं असून येत्या दोन दिवसात ते राज्यात पोहोचतील, असं अवस्थी म्हणाले.
कोव्हिड-19 टास्क फोर्सच्या देखरेखीखाली होणार खेळाडूंचा सराव
स्पोर्ट्स ऑथरिटी ऑफ इंडियाने (SAI) क्रीडाप्रकार सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देत असताना क्रीडा संकुलांमध्ये कोव्हिड-19 टास्क फोर्स तैनात करण्यात येणार आहे. हे पथक खेळाडूंवर विशेष लक्ष ठेवून त्यांना आवश्यक ते सहकार्य करणार आहे.
कोरोनानंतर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी किती काळ लागेल?