You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

कोरोना अपडेट: राज्यात 2250 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण, एकूण संख्या 39 हजार 297 वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांच्या जवळ पोहोचला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. 385 रेल्वेगाड्यांतून पाच लाख परप्रांतीय रवाना - अनिल देशमुख

    राज्यात अडकलेल्या पाच लाखांहून अधिक परप्रांतीय 385 रेल्वेगाड्यांतून आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

    परप्रांतियांच्या याद्या तयार करताना पोलिसांवर येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मुंबईतील 93 पोलीस ठाण्यांमध्ये मंत्रालयातील दीड हजार कर्मचारी मदत करणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

  2. लॉकडाऊनमध्ये 1150 किमीचं अंतर सायकलवर कापून मुलीने आजारी वडिलांना घरी आणलं

  3. धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1378 वर

    मुंबईतील झोपडपट्टीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार सुरूच आहे. आज(बुधवारी) धारावीत कोरोना व्हायरसची लागण झालेले 25 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या भागातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1378 वर पोहोचली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

  4. 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू

    येत्या 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करून दिली आहे.

    सोमवार दिनांक 25 मेपासून देशातील विमानसेवा काही अटी व शर्थी पाळून सुरू केली जाऊ शकते, सगळी विमानतळं आणि विमान कंपन्यांनी यासाठी सज्ज राहावं. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक नियमावली शासनाकडून देण्यात येईल, असं पुरी म्हणाले आहेत.

  5. कोव्हिड-19 मधून बरे होण्याचं प्रमाण 39.62 टक्क्यांवर

    कोव्हिड-19 ची बाधा झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांचं देशातलं प्रमाण 39.62 टक्क्यांवर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.

    पहिलं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा कोव्हिड-19 मधून बरे होण्याचं प्रमाण 7.1 टक्के होतं. दुसऱ्या लॉकडाऊनदरम्यान हे प्रमाण 11.42 टक्क्यांवर गेलं. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण 26.59 टक्के होतं तर सध्या रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 39.62 टक्के आहे, अशी माहिती अगरवाल यांनी दिली आहे.

  6. बसची सोय तुम्ही केली असं सांगा, पण त्या चालवण्याची परवानगी द्या - प्रियांका गांधी

    काँग्रेस पक्षाने बस उपलब्ध करून 24 तास झाले. या बसची सोय तुम्ही केली असं सांगा, पण त्या चालवण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने द्यावी, अशी विनंती काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.

    बस उपलब्ध आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. तुम्ही त्या बसवर भाजपचे झेंडे लावले तरी चालेल, तुम्ही स्वतः त्या बसची सोय केली असं पण तुम्ही सांगू शकता. पण हे बस चालवू द्या, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

  7. महाराष्ट्रात आतापर्यंत 1388 पोलिसांची कोरोनाची लागण

    महाराष्ट्रात आतापर्यंत 1388 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. राज्यातील कोव्हिड-19 ग्रस्त पोलिसांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 428 पोलीस उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 948 पोलिसांवर अद्याप उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

  8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या 9 सूचना

  9. केंद्रीय आरोग्य मंत्रालयात आढळला कोरोनाग्रस्त रुग्ण

    देशात विविध ठिकाणी कोरोनाचा प्रसार होत असताना आता थेट देशातील आरोग्यविषयक नियोजन करणाऱ्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयातच कोरोनाग्रस्त आढळला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालनालयामध्ये एक व्यक्ती कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज(बुधवारी) प्राप्त झाला.

    यामुळे संबंधित विभागां निर्जंतुकीकरण करण्यात येत असून संपर्कातील व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  10. इटलीत अडकलेल्यांना घेऊन विमान गोव्यात दाखल

    लॉकडाऊनमुळे इटली देशात अडकलेल्या नागरिकांना घेऊन एक विमान गोव्यामध्ये दाखल झालं. या विमानात 168 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती गोवा विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली आहे.

  11. लॉकडाऊनमुळे देशातील 'या' सर्वात श्रीमंत देवस्थानाची आर्थिक परिस्थितीही बिघडली

  12. चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरू, काय बंद राहणार?

  13. शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

    राज्यातील कोरोना व्हायरसचं संकट हाताळताना प्रशासकीय स्तरावर काय अडचणी येत आहेत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. विविध क्षेत्रांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना काही सल्ले दिले आहेत. त्यांनीच काही ट्वीट्स करून याबाबत माहिती दिली –

    पवार म्हणाले...

    1. पुढचं शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होईल, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या कमी होईल. याचा विपरीत परिणाम शैक्षणिक आणि तांत्रिक संस्थानांच्या उत्पन्नावर होण्याची भीती आहे. काही संस्थानं तर कोलमडण्याची, बंद होण्याची भीती आहे.

    एक अभ्यास गट स्थापन करून या शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संपूर्ण संस्थांना काय धोका उद्भवू शकतो, याचं अवलोकन करून शिक्षणात कुठेही अडसर असल्यास तो दूर करावा.

    2. सध्या सरकारने राज्यातील उद्योगांना कामं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण मला वाटतं त्यासाठीच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वं पुरेशी स्पष्ट नाहीत.

    अनेक फॅक्टरींमध्ये काम करणारे मजूर आता गाव सोडून गेले आहेत, त्यामुळे इथे कामं सुरू करायची असतील तर त्यांना परत आणण्यासाठी नीट व्यवस्थापन करावं लागेल.

    यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. त्यांना आपल्या यंत्रणेत कसं सामावून घेता येईल, याचं नीट नियोजन केलं जाईल.

    3. पूर्वी काही मागास आणि अविकसीत भागांमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अनेक सरकारी योजना सुरू होत्या. आताही राज्यात नव्याने गुंतवणूक आणायची असेल तर नवीन काही धोरणं आखावी लागतील.

    4. राज्यात लॉकडाऊन शिथील करून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हळुहळू पावलं उचलावी लागतील. या शिथिलतेबाबत सर्वांना नियमितपणे माहिती असावी, यासाठी दररोज लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची वेळ आणि आवश्यक त्या गोष्टींचं नियोजन करावं.

    5. पूर्ण काळजी घेऊनच राज्यातील दुकानं, कार्यालय आणि इतर आस्थापनांमध्ये कामकाज सुरू करावं. ते टप्प्याटप्प्याने व्हायला हवं.

    6. सध्या राज्यात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कामकाज मंदगतीने सुरू आहे. आयात-निर्यातीला चालना देण्यासाठी तसंच अंतर्गत सामान वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी सरकारने उद्योजक आणि विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी.

    7.राज्य पूर्वपदावर नेण्याच्या दिशेने आवश्यक आहे की सरकारमधले मंत्री आणि कर्मचारी पूर्वीप्रमाणेच काम करताना दिसायला हवेत. त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या जाव्यात.

    8.लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आपल्याला राज्यातील रस्ते वाहतूक तसंच हवाई आणि रेल वाहतूक पूर्ववत करण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी लागतील.

    9. कोरोना कधीच पूर्णपणे संपणार नाही. तो आता आपल्या आयुष्याचा भाग बनून राहणार आहे, हे आता आपण स्वीकारून, त्याच्यापासून बचाव कसा करायचा आणि लोकांमध्ये आरोग्य व्यवस्थेबाबत जागरुकता कशी पसरवायची, याचा विचार करायला हवा.

    जपानमध्ये लोक आता वैयक्तिक स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतात, मास्क घालतात. माझं जनतेला आवाहन आहे की त्यांनीही आता ही जीवनशैली अंगीकारायला हवी. माहिती विभागाला मी आवाहन करतो की लोकांमध्ये याबाबत आवश्यक ती जनजागृती करावी.

  14. लॉकडाऊनचा पेंच व्याघ्र प्रकल्पाला फटका

    देशात लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. मध्य प्रदेशच्या शिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन महिन्यांत एकही पर्यटक फिरकला नाहीय. त्याचा फटका तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना बसला आहे.

    या प्रकल्पात सफारीसाठी जिप्सी चालवणारे हेमराज धुरवे सांगतायत, “मी महिन्याला 8000 रुपये कमवायचो, पण आता माझ्याकडे एकही नवीन पैसा नाही.”

    याच प्रकल्पात टुरिस्ट गाईडचं काम करणारे राम प्रसाद यांचीही लॉकडाऊनमुळे कमाई बंद झाली आहे. “आधी महिन्याला 10,000 रुपये तरी यायचे.आता तेही नाहीत. आम्ही नुसतं घरी बसून आहोत.”

  15. ब्रेकिंग, कोरोनाग्रस्तांमध्ये गेल्या 24 तासांत आजवरची सर्वांत मोठी वाढ

    केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 5,611 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही एका दिवसात आजवर झालेली सर्वाधिक वाढ आहे.

    भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर गेली आहे.

    गेल्या 24 तासात 140 लोकांचा मृत्यूही झाला आहे. आजवर एकूण 3,303 जण कोरोनामुळे दगावले आहेत.

    सध्या देशात कोव्हिड-19चे 61,149 सक्रिय रुग्ण आहेत आणि जवळजवळ 42 हजार लोक पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

    गेल्या 24 तासात एकूण एक लाख आठ हजार 121 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आजवरचा देशात 25 लाख 12 हजार 388 लोकांची कोरोनासाठीची चाचणी घेण्यात आली आहे.

  16. 'प्रतिकारशक्ती वाढवणारी लस'

    कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लोकांच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी एक लस सापडल्याचा दावा एका अमेरिकन कंपनीने केलाय. मॉडर्ना असं या कंपनीचं नाव आहे.

  17. ‘अमेरिका कोरोनाग्रस्तांमध्ये अव्वल हे एकप्रकारचं मानचिन्हच’, राष्ट्राध्यक्ष ट्रंप

    कोरोनाचे जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असणं, हे अमेरिकेसाठी एकप्रकारचं मानचिन्हच असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले आहेत.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, अमेरिकेत सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा सुमारे 92 हजार आहे. सोमवारी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर, ते पत्रकारांशी बोलत होते.

    गेल्या काही दिवसांत लॅटिन अमेरिका, विशेषतः ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचा मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळे एका पत्रकाराने विचारलं की अमेरिका मध्य अमेरिकेतील लोकांसाठी प्रवेश बंद करण्याचा विचार करत आहे का.

    तेव्हा ते म्हणाले, “तुम्हाला माहितीय, ते सांगतायत की आपल्याकडे जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे चाचण्याही तेवढ्याच जास्त होत आहेत.

    “मी याकडे असं बघतो की, एकप्रकारे जास्त रुग्ण असणं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असाच की आपलं टेस्टिंग इतरांपेक्षा बरंच चांगलं आहे,” असं ट्रंप म्हणाले.

    “माझ्यासाठी तर हे एक बॅज ऑफ हॉनरच आहे. हो खरंच, हे एकप्रकारचं मानचिन्हच आहे, एक मानाचा मुजरा आहे त्या टेस्टिंगसाठी आणि त्या सर्व लोकांसाठी जे या प्रक्रियेत अतिशय चांगलं काम करत आहेत.”

    अमेरिकेच्या Centre For Disease Controlनुसार देशात आतापर्यंत 1 कोटी 26 लाख लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

    अमेरिकेतला विरोधी पक्षाने मात्र ट्रंप यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. “हा मोठा आकडा ट्रंप यांचं सपशेल अपयश दाखवतो,” असं डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीने म्हटलंय.

  18. कोरोनावर 'ही' लस गुणकारी ठरेल?

    कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लोकांच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी एक लस सापडल्याचा दावा एका अमेरिकन कंपनीने केलाय. 'मॉडर्ना' असं या कंपनीचं नाव आहे. ज्या पहिल्या आठ लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज आढळल्याचं कंपनीने म्हटलंय.

    ज्या लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे, त्यांच्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीप्रमाणेच या लोकांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेने प्रतिसाद दिल्याचं कंपनीने म्हटलंय.

    खरंच ही लस कोरोनावर गुणकारी ठरेल? पाहा व्हीडिओ.

  19. ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक

    भाजप महाराष्ट्रातउद्धव सरकारविरोधात आता ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन सुरू करणार आहे.

    गेल्या काही काळापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करत आहे.

    या सरकारला कोरोनाचं संकट हाताळण्यात अपयश येत असल्याचं ते काल म्हणाले. त्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली.

    भाजपच्या या आक्रमकतेविषयी तुम्हाला काय वाटतं? खालील फेसबुक पोस्ट किंवा त्याच्याखालील ट्वीटवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा...

  20. ‘मुलांना वेगळ्या ऑटोत पाठवायचं का?’

    दिल्लीमध्ये लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ऑटोंना परवानगी देण्यात आली आहे. मात्र एका ऑटोमध्ये एकच सवारी बसणार, अशी अट.

    त्यामुळे एका महिलेला हा प्रश्न पडलाय - “मी वेगळा ऑटो घ्यायचा आणि मुलांना वेगळ्या ऑटोत पाठवायचं का? हे कसं शक्य आहे?”