लॉकडाऊन असतानाही दिल्लीतल्या रस्त्यावर वाहतूककोंडी
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असतानाही दिल्लीत मोठ्या प्रमाणात गाड्या रस्त्यावर धावताना दिसल्या. दिल्लीतल्या आयटीओ आणि यमुना ब्रिज भागात वाहतूककोंडीही पाहायला मिळाली.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्य सरकारने चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असतानाही दिल्लीत मोठ्या प्रमाणात गाड्या रस्त्यावर धावताना दिसल्या. दिल्लीतल्या आयटीओ आणि यमुना ब्रिज भागात वाहतूककोंडीही पाहायला मिळाली.
पदवीची म्हणजेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा यावर्षी रद्द करण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट सरकारनं विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच UGC ला केलीय.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे UGC ला पत्र पाठवून याबाबत विनंती केली आहे.
जुलै महिन्यात 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे सुरक्षित नसल्याचं उच्च शिक्षण विभागाचे म्हणणं असून, गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल लावता येईल का? याबाबत विचारणा या पत्रातून केलीय.
मुंबईतील धारावी झोपडपट्टीत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढताना दिसत आहे. धारावीत आज 26 नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्ण संख्या 1,353 वर पोहोचली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून, राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत.
"महाराष्ट्रातील नव्या बेरोजगार पिढीला, मराठी माणसाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांना उद्योग क्षेत्रात कसे सामावून घेण्यात येईल याचा कृती कार्यक्रम आखावा लागेल," असं शरद पवार यांनी सूचवलंय.
उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे प्रोत्साहनपर धोरण आणण्याची आवश्यकता पवारांनी व्यक्त केलीय.
"राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. मंत्री व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना निर्गमित व्हाव्यात," असंही पवार म्हणालेत.
मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर आजही अनेक स्थलांतरित मजूर गोळा झाले होते.बिहारमधून पूर्णियासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन वांद्र्यातून सुटणार होती.
मात्र, पोलिसांनी तातडीन घटनास्थळी पोहोचत, गर्दी कमी करण्यास सांगितलं. ज्या लोकांनी रेल्वेप्रवासासाठी नोंदणी केलीय, त्यांनाच तिथं थांबण्याची परवानगी पोलिसांनी दिली. त्यामुळे काही वेळानं गर्दी कमी झाली.
दरम्यान, दुपारी 12 वाजता 1700 मजुरांना घेऊन ट्रेन बिहारच्या दिशेनं रवाना झाली. तसंच, रेल्वे स्थानकाबाहेर जमलेली गर्दी कमी झालीय.
केरळहून जयपूरच्या दिशेनं निघालेली श्रमिक स्पेशल ट्रेन कर्नाटकातील मंगळुरू इथं रुळावरून घसरली. आज दुपारी ही घटना घडली.
सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. रूळ दुरुस्तीचं काम सुरू आहे.
बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका यांचे मानधन पूर्ववत करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेकजण रिक्ष चालवतात. मात्र, लॉकडाऊनमुळे रिक्षा बंद आहेत. त्यामुळे हे रिक्षाचालक आता पुन्हा आपल्या गावाकडे परतू लागलेत.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे आज दुपारी 4.30 वाजता राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 500 रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 10554 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 166 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली.
रेल्वे मंत्रालयाशी योग्य सुसंवाद साधून स्थलांतरित कामगारांसाठी आणखी ट्रेन सोडा असं गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना म्हटलं आहे.
स्थलांतरित कामगारांसाठी बसेस तसेच ट्रेन्स नक्की कधी, कुठून सुटणार याबाबत स्पष्टता नसल्याने तसंच अफवांमुळे कामगारांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना सांगितलं आहे. गृह मंत्रालयाने स्थलांतरित कामगारांच्या घरी जाण्याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे.
स्थलांतरित कामगारांना घरी परतता यावं यासाठी आणखी ट्रेन्सची व्यवस्था करा. या ट्रेन कुठे जाणार, कधी सुटणार, क्षमता किती यासंदर्भात माहिती कामगारांना द्या, जेणेकरून कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही असं गृह मंत्रालयाने राज्यांना सूचित केलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 55 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 1328 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिल्याचं ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केलं आहे.
मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) भागात क्वारंटीन सेंटर सुरू व्हावं या मागणीसाठी स्थानिक एकत्र आले होते.
कामा लेन भागात क्वारंटीन सेंटर सुरू व्हावं अशी त्यांची मागणी होती.
पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर गर्दी पांगली.
कोरोना विषाणूच्या प्रसारावरून अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध विविध पातळ्यांवर दुरावत चालले आहेत. चीनमधील कंपनी मायदेशी आणण्याकरता अमेरिकेतील एका नेत्याने संसदेत प्रस्ताव सादर केला आहे.
ज्या कंपन्या चीनमधील उत्पादन युनिट बंद करून अमेरिकेत येऊ इच्छितात त्यांना विशेष आर्थिक मदत केली जाईल असं या प्रस्तावात म्हटलं आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 90 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 15.08 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
चीनने कोरोना विषाणूच्या प्रसारासंदर्भात योग्य माहिती दिलेली नाही असा आरोप अमेरिकेने केला आहे. याबाबत अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवरही टीकेची झोड उठवली आहे.
अमेरिकेतील संसदपटू मार्क ग्रीन यांनी द ब्रिंग अमेरिकन कंपनीज होम अॅक्ट नावाचा प्रस्ताव सादर केला आहे. चीनहून मायदेशी येणाऱ्या कंपन्यांचा सगळा खर्च उचलण्याची तयारी या प्रस्तावात देण्यात आली आहे.
ग्रीन म्हणाले, "अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी देशात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. मात्र अन्य देशातील कंपन्या अमेरिकेत परतण्यात होणारा खर्च हा मुद्दा अडचणीचा ठरतो. आता सगळं जग आर्थिक संकटातून जात आहे, अशावेळी अमेरिकन कंपन्यांकरता हा खर्चाचा भार पेलणं डोईजड होऊ शकतं".
"विश्वासार्ह मित्र नसल्याचं चीनने सिद्ध केलं आहे. अमेरिकेला सकारात्मक वाटचाल करायची असेल तर चीनवरील अवलंबत्व कमी करायला हवं. नवे मार्ग धुंडाळायला हवेत. कंपन्यांना आर्थिक मदत देऊन गुंतवणुकीला चालना मिळू शकते", असं ग्रीन यांनी स्पष्ट केलं.
चीन कोरोना संकटात अमेरिकेत कोणतीही गुंतवणूक करू नये यासाठी सेक्युअर अवर सिस्टम्स अगेन्स्ट चायनाज टॅक्टिक्स अक्टही सादर करण्यात आला आहे.
चीनकडून सायबर हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेऊन तो रोखण्यासाठीही स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात, देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा लाखाच्या पुढे गेला आहे. 24 तासात तब्बल 4970 नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णांच्या संख्येसंदर्भातात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. याच कालावधीत 134 जणांचा मृत्यू झाला.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 101139 एवढी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.