You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, देशातली संख्या 50 हजारहून अधिक

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी 10 हजार एसटी बसेस धावणार

    महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना मिळणार घरी जाता येणार आहे. राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना राज्य शासन एसटीद्वारे स्वगावी मोफत सोडणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

    "येत्या चार- पाच दिवसात 10 हजार एसटी बस फेऱ्याद्वारे ही प्रक्रिया होणार पूर्ण होणार आहे. विद्यार्थी, यात्रेकरू या सर्वांनाच याचा लाभ मिळणार आहे. हा संपूर्ण खर्च आपत्ती व्यवस्थापन-मदत पुनर्वसन विभाग उचलणार आहे."

    "येत्या 4-5 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी राज्य परिवहन विभागाच्या सुमारे 10 हजार एस. टी. फे-यांचे नियोजन करण्यात आले आहे," असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेला होकार दिला आहे. कोरोना नियमांचे पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग याचा खर्च उचलणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

  2. मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत प्रवेश बंदी करणाऱ्या आदेशाला स्थगिती

    मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत प्रतिबंध करण्याच्या आदेशाला कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.

    अनेक आस्थापनांना कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबईत करण्यासाठी वेळ लागत असल्याने तोडगा निघेपर्यंत प्रवेश बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

  3. 'घरी जाण्यासाठी तिकिटाचे 875 रुपये रेल्वेने माझ्याकडूनच घेतले'

  4. दारू दुकानं बंद करण्याबाबत दिल्ली हायकोर्टात याचिका

    दिल्लीतील दारू दुकानं बंद करण्यात यावीत, या मागणीसाठी सिव्हील सेफ्टी काऊन्सिल ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

    दारू दुकानं उघडल्यामुळे लॉकडाऊन करण्यामागचा उद्देश सफल होत नाही, असं या संस्थेने म्हटलं आहे.

  5. 17 मेनंतर काय? लॉकडाऊन किती दिवस चालेल? – सोनिया गांधी

    केंद्र सरकारने लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे 17 मेनंतर काय होईल, लॉकडाऊन आणखी किती दिवस चालेल, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विचारला आहे.

    आज सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यामध्ये केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्यासाठी कोणते निकष वापरणार आहे, असा सवाल सोनिया गांधी यांनी विचारला आहे.

  6. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – डॉ. हर्षवर्धन

    महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसशी संबंधित परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील 36 पैकी 34 जिल्हे कोव्हिड-19ने बाधित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली असून कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

  7. दारू पिण्याचं व्यसन का, कसं आणि कुणाला लागतं?

  8. खासगी डॉक्टरांना कोव्हिड-19 साठी किमान 15 दिवस सेवा अनिवार्य

    कोव्हिड-19 च्या उपचारासाठी महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांना किमान 15 दिवस सेवा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यांना याचा मोबदला तसंच संरक्षणात्मक उपकरणंही देण्यात येतील, असं महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांनी म्हटलं आहे.

    55 वर्षांच्या खाली असलेल्या सर्व खासगी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असा उल्लेख विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात आहे.

  9. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्थलांतरित मजुरांच्या रांगा

    ठाण्यातील कल्याण डोंबिवली शहरात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्थलांतरित मजुरांनी खासगी दवाखान्यांच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं दिसून आलं.

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर मुंबई, ठाणे पुणे भागात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी शासनाकडून परवानगी दिली जात आहे. पण त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  10. राज्यातील अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडणार - विजय वडेट्टीवार

    राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना पुढील चार दिवसांत त्यांच्या गावी सोडण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. शासनाकडून १० हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा देण्यात येईल. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला आवश्यक निधी देणार आहे, अशी घोषण मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

  11. लॉकडाऊनमध्ये शिथिलतेचा आदेश मागे, केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू

    मुंबईत वाढलेली गर्दी लक्षात घेता शिथील केलेले नियम मागे घेण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे आदेश दिलेत.

    लॉकडाऊन शिथील करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 4 मे पासून काही अटी शिथिल करून काही महत्त्वाच्या सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथिलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.

    त्यामुळे मुंबईत किराणा आणि औषधांची सोडून सर्व दुकानं पुन्हा बंद होणार आहेत.सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

  12. कोरोना संकटकाळात बिहारमध्ये 362 वैद्यकीय अधिकारी गायब

    कोरोना संकटकाळातही बिहारमध्ये तब्बल 362 वैद्यकीय अधिकारी रुग्णालयांमध्ये अनुपस्थित असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाने नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बिहारच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

  13. ब्रिटन : सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन स्वतःच केल्यामुळे प्रोफेसर लॉकडाऊन यांचा राजीनामा

    ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची शिफारस करणारे प्रोफेसर नील फर्ग्यूसन यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन स्वतःच केल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    ते कोरोना व्हायरसशी संबंधित प्रकरणांत ब्रिटन सरकारचे मुख्य सल्लागार आहेत.

    आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना त्यांनी लिहिलं, मी चुकीचं केलं, हे मी स्वीकारतो. त्यामुळे मी आपल्या पदावरून दूर होत आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखण्याची गरज आहे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं, याचा मला खेद आहे.

    प्रोफेसर नील फर्ग्यूसन यांनी एका महिलेला स्वतःच्या जवळ येऊ दिल्याबाबत लंडनच्या डेली टेलिग्राफ वृत्तपत्राने एक बातमी छापली होती.

    प्रोफेसर फ्रर्ग्यूसन सेंटर फॉर ग्लोबल इन्फेक्शस डिसिज अनालिसीसचे संचालक आहेत. ही संस्था विविध देश आणि जागतिक आरोग्य संघटनेला महामारीबाबत सल्ला देते. या संस्थेनेच जगाला जानेवारी महिन्यात कोरोनाच्या संकटाचा इशारा दिला होता.

    प्रोफेसर नील यांच्या पथकाने एक सर्वेक्षणाच्या आधारे ब्रिटनमध्ये कोणतीही उपाययोजना न केल्यास सुमारे 5 लाख लोक मृत्यूमुखी पडतील, असा अंदाज व्यक्त केला होता.

    त्यांच्याच सल्लानुसार ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी 23 मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित केला. तेव्हापासूनच ते प्रोफेसर लॉकडाऊन म्हणून प्रसिद्ध आहेत.

  14. देशभरात आतापर्यंत 46,711 जणांना कोरोना व्हायरसची लागण, महाराष्ट्रात 14,541 रुग्ण

    देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत 46,711 पर्यंत पोहोचली आहे.

    आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत 1583 रुग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला असून 13,160 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 31,967 रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

    महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक 14,541 रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून इथं 5804 रुग्ण आहेत. तर खालोखाल राजधानी दिल्लीतील रुग्णसंख्या 4898 इतकी आहे.

  15. अमेरिकेतील व्हाईट हाऊस कोरोना टास्क फोर्सचं काम थांबवण्याचा निर्णय

    अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रसारावर आळा घालण्यासाठी बनवण्यात आलेल्या व्हाईट हाऊस कोरोना टास्क फोर्सचं काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी याबाबत माहिती दिली.

    टास्क फोर्सने आपलं काम योग्य प्रकारे बजावलं. येत्या काही दिवसांसाठी टास्क फोर्सचं काम थांबवण्यात येईल, असं ट्रंप म्हणाले.

    पण टास्क फोर्सचं काम थांबवलंय याचा अर्थ कोरोना व्हायरसविरोधातला लढा संपला, असं नाही. कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय त्यांचा उद्देश पूर्ण होणार नाही, असं ट्रंप यांनी स्पष्ट केलं.

    अमेरिकेत सध्या रोज सुमारे 20 हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे.

    यावेळी तिथं 12 लाख जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असून त्यापैकी 70 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

  16. बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजमध्ये तुमचं स्वागत

    सुप्रभात मंडळी!!!

    बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत.

    कोरोना व्हायरससंदर्भातील राज्य, देश आणि जगभरातील सर्व अपडेट तुम्हाला इथं वाचायला मिळतील.

    नवीन अपडेटपूर्वी काल दिवसभरात काय घडलं, हे एकदा पाहूया :

    • लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 4 मे पासून नियम शिथिल होऊन काही सेवांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. दारुविक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन फक्त जीवनावश्यक सेवाच सुरू राहतील असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.
    • 8 मे नंतर मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत एंट्री नसेल. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. मुंबईत काम करणाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे त्यांच्या ऑफिसजवळच करण्यात येणार आहे.
    • लॉकडाऊन काळात अनेकांच्या लायसन्सची मुदत संपते आहे. परंतु केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही मुदत 30 जूनपर्यंत ग्राह्य धरली जाईल असं म्हटलं आहे.
    • स्थलांतरित कामगारांसाठी देशभरात 67 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.
    • जगभरात विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ६४ विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. 7 ते 13 मे या कालावधीत विविध देशांमधून भारतीय मायदेशी परततील. आरोग्य तपासणीनंतर त्यांना 14 दिवस क्वारंटीन फॉलो करावं लागणार आहे.

    काल दिवसभरातील सर्व अपडेट विस्तृतपणे तुम्हाला इथे वाचता येतील.