You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे मी धन्य झालो- आडवाणी

अयोध्येची मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात यावी, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला.

लाईव्ह कव्हरेज

  1. मशिदीसाठी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय योग्य - आडवाणी

    अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यामुळे आपणास आनंद झाल्याची भावना माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे मी समाधानी आणि धन्य झालो असल्याचं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

    मशिदीसाठी पाच एकर जमीन देण्यात यावी असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. या गोष्टीचं आडवाणींनी समर्थन केलं आहे.

  2. पाकिस्तानातून आक्रमक प्रतिक्रिया

    अयोध्या निकाल हा कायद्याला अनुसुरून आहे की भाजपच्या जाहीरनाम्यानुसार आहे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे.

    पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी आक्रमकपणे अयोध्येच्या निकालावर टीका केली आहे.

    ते नेमकं काय म्हणालेत, वाचा या बातमीत

  3. पंतप्रधान मोदींचं राष्ट्राला उद्देशून भाषण

    अयोध्येचा निकाल आल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राष्ट्राला उद्देशून भाषण करत आहेत. पाहा संपूर्ण भाषण इथे

    मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • लोकशाही मजबूत आहे. विविधतेत एकता, हा आपला गाभा आहे.
    • हजारो वर्षांनंतरही भारताचं हे प्राणतत्व. आजच्या ऐतिहासिक दिनी, आजच्या घटनेचा उल्लेख करेल.
    • सव्वाशे कोटी देशवासीयांनी इतिहास रचला. इतिहासात सोनेरी अध्याय आज रचला गेला. न्यायव्यवस्थेच्या कामकाजातही हा निर्णय गौरवशाली दिवस.
    • सर्वोच्च न्यायालयाने सगळ्याचं ऐकलं, धैर्याने ऐकलं. सर्वसंमतीने निर्णय झाला हे महत्वाचं.
    • हा निकाल सोपा नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने दृढ इच्छाशक्ती दाखवली. देशातील न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहेत.
    • 9 नोव्हेंबरला बर्लिनची भिंत तुटली होती. दोन विभिन्न विचारांनी एकजूट होण्याचा निर्णय घेतला होता. 9 नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाला आहे. भारत आणि पाकिस्तानचा दोन्ही देशांचा सहभाग आहे. आज अयोध्यासंदर्भात निकाल आहे. आगेकूच करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा.
    • हा एकत्र येण्याचा दिवस आहे. काही कटुता राहिली असेल तर त्याला तिलांजली देण्याचा दिवस आहे. भीती, कटुता, नकारात्मकता यांना काहीही स्थान नाही.
    • कठिणातला कठीण विषय राज्यघटनेच्या अखत्यारीत आहे. या निर्णयापासून शिकायला हवं. वेळ लागेल, संयम बाळगायला हवा.
    • आजचा निकाल नवी पहाट. अनेक पिढ्यांवर परिणाम. नवी पिढी नव्याने 'न्यू इंडिया'च्या निर्माणात सहभागी होईल. नवी सुरुवात करूया, नव्या भारताचा निर्माण करूया.
    • सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांचा विश्वास कमवून सगळ्यांना पुढे जायचं आहे.
    • देशातल्या प्रत्येक नागरिकावरची राष्ट्र निर्माणाची जबाबदारी आता वाढली आहे. न्यायप्रक्रियेचं पालन करणं हे सर्वांचं दायित्व. समाज म्हणून प्रत्येक भारतीयाला स्वत:ची कर्तव्यं निभवायला हवी. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक.
    • एकता, बंधुभाव, स्नेह, शांतता हे देशाच्या विकासात महत्त्वाचे. भविष्यातील भारतासाठी काम करायचं आहे.
  4. 24 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार - उद्धव ठाकरे

    अयोध्येच्या निकालानंतर लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

    येत्या 24 नोव्हेंबरला पुन्हा एकदा अयोध्येला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मी पुन्हा पुन्हा इथं जाईल असंही त्यांनी म्हटलंय.

    येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वांत आधी शिवनेरीला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

    हिंदू मानणाऱ्या सर्व पक्षांनी इतर स्थळांबाबत निर्णय घ्यावा, असं इतर मंदिर-मशिद वादांबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे.

  5. शांतता आणि बंधुभाव जपायला हवा - राहुल गांधी

    "अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करताना सगळ्यांनी शांतता आणि बंधुभाव जपायला हवा. सर्व भारतीयांनी एकमेकांशी प्रेम आणि विश्वासाने वागावे," असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

  6. सर्वांनी शांतता राखण्याचा प्रयत्न करावा - शरद पवार

    सर्वोच्च न्यायालयाने एकमताने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे देशासमोरील जो गंभीर प्रश्न होता तो सोडवण्यासाठी मदत होणार आहे. समाजातील सर्वांनी त्याचं स्वागत आणि सन्मान करावा. शांतता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी आवाहन करतो. या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेे.

  7. मशीद आज असती तरी हाच निर्णय घेतला असता? - असदुद्दिन ओवेसी

    "सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. पण पूर्णतः बरोबर असू शकत नाही. ज्यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली, त्यांनाच एक ट्रस्ट बनवून मंदिर बांधायला सांगितलं आहे. आज ती मशीद तिथे उभी असती तर न्यायालयाने काय निर्णय घेतला असता, हा प्रश्न मला पडला आहे," असं ऑल इंडिया मजलिस ए- इत्तेहादुल-मुसलमीन अर्थात MIM पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी म्हणाले.

    "काँग्रेसने त्यांचे खरे रंग दाखवले आहेत. काँग्रेसने त्यांचं ढोंगी आणि दांभिक धोरण स्वीकारले नसते, 1949 मध्ये मूर्तींची स्थापना झाली नसती. राजीव गांधींनी जागा खुली केली नसती तर आज मशीद असती. नरसिंह राव यांनी त्यांची जबाबदारी निभावली असती तरीही तिथे मशीद असती," अशी टीका एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

  8. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास- देवेंद्र फडणवीस

    "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय म्हणजे कुणाचा जय किंवा पराजय नाही. भारतीय अस्मितेचं जे प्रतीक आहे, त्या संदर्भातील आस्था बळकट करणारा हा निर्णय आहे.

    "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या भारतभक्तीचं हा निर्णय प्रतीक आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास असा हा निर्णय आहे. नवीन भारतासाठी एकजुटीने सर्व नागरिक या निर्णयाचा सन्मान करतील अशी आशा आहे," असं महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  9. निर्णयाचा सन्मान करावा- रजनीकांत

    "मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. खटल्याशी निगडीत सर्वांनी निकालाचा सन्मान करावा. समर्थ भारताच्या उभारणीसाठी कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न बाळगता विकासाकरता काम करायला हवे," अशी प्रतिक्रिया अभिनेते रजनीकांत यांनी दिली.

  10. आज बाळासाहेब असायला हवे होते... - राज ठाकरे

    "आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान दिलं, त्याचं आज सार्थक झालं," असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

    तसंच, "हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता," असंही राज ठाकरे म्हणाले.

  11. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक - बाबा रामदेव

    सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलाय. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जाईल. मुस्लिमांनाही जमीन देण्याच्या निर्णायचं मी स्वागत करतो. मशीद बांधण्यासाठी हिंदू बंधूंनीही हातभार लावला पाहिजे. - बाबा रामदेव

  12. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

    काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

  13. जय-पराजयाच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहू नये - मोहन भागवत

    श्रीराम जन्मभूमीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं राष्ट्रीय स्वंयसेवक संघ स्वागत करत आहे. या निर्णयाकडे जय-पराजय म्हणून पाहू नये. लोकांनी संयमानं आनंद व्यक्त करावा. भूतकाळ विसरून पुन्हा एकत्र येऊया. - सरसंघचालक मोहन भागवत

    संघ आंदोलनात सहभागी होत नाही पण राममंदिर आंदोलनात आम्ही परिस्थितीमुळे सहभागी झालो होतो असं भागवत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

  14. भारतभक्तिच्या भावनेला सशक्त करण्याची वेळ - पंतप्रधान मोदी

    सुप्रीम कोर्टानं अयोध्यावर आपला निर्णय दिला आहे. या निर्णयाकडे कुणाचा विजय किंवा कुणाचा पराभव या दृष्टीनं पाहू नये. रामभक्ती असो वा रहीमभक्ती, ही वेळ सर्वांसाठी भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची आहे. देशवासियांनी शांतता, सद्भावना आणि एकता कायम ठेवावी. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

  15. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं भारताची प्रतिष्ठा वाढलीय - श्री श्री रविशंकर

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णायचं स्वागत करतो. या निर्णयामुळं दोन्ही समूहांचा आदर राखला गेलाय. यामध्ये कुणाचा विजय किंवा कुणाचा पराभव नाहीय, तर यातून भारताची प्रतिष्ठा वाढलीय. - श्री श्री रविशंकर

  16. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो - अमित शाह

    श्रीराम जन्मभूमीवरील सर्वसहमतीनं देण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. सर्वधर्मियांनी या निर्णयाचं स्वागत करून, शांतता आणि सौहार्दपूर्ण 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या आपल्या संकल्पाशी कटिबद्ध राहावं. - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह

  17. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समाधानकारक - मा. गो. वैद्य

    सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा समाधानकारक आहे. जी विवादित जागा आहे, त्या ठिकाणी राम मंदिर होते. या निर्णयामुळे मुस्लीम बांधव सुद्धा समाधानी होतील. कारण पाच एकर जागा मशिदीला दिली आहे. - मा. गो. वैद्य, आरएसएसचे माजी प्रवक्ते

  18. अशोक सिंघल यांना 'भारतरत्न' देण्याची सुब्रह्मण्यम स्वामींची मागणी

    अयोध्या निकालाच्या विजयानंतर अशोक सिंघल यांना आठवूया. नरेंद्र मोदी सरकारनं तातडीनं अशोक सिंघल यांना 'भारतरत्न' द्यावा. - सुब्रह्मण्यम स्वामी

  19. सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक - राजनाथ सिंह

    सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक आहे. या निकालामुळं भारताची सामाजिक बांधणी आणखी मजबूत होईल - संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

  20. काँग्रेस राम मंदिर उभारणीच्या बाजूनेच - रणदीप सुरजेवाला

    राम मंदिर उभारणीच्या बाजूनेच आम्ही आहोत. या निकालामुळं केवळ मंदिर बांधण्याचा मार्गच मोकळा झाला नाहीय, तर या मुद्द्याचं राजकारण करणाऱ्या भाजपचे दरवाजे बंद झालेत - रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते