टी-20 विश्वचषकात भारताची विजयी सलामी, आयर्लंडला 8 विकेट राखून हरवलं
पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतीय संघानं विजयी सलामी दिली, पण कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे काही काळ चाहत्यांना चिंतेत टाकलं.
अमेरिकेत न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं आयर्लंडला 8 विकेट्स आणि 46 चेंडू राखून हरवलं आणि गुणतालिकेत खातं उघडलं.
ग्रुप एच्या या सामन्यात आयर्लंडनं भारतासमोर विजयासाठी 97 रन्सचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय फलंदाजांनी अगदी आरामात त्याचा पाठलाग केला. अवघ्या सहा रन्समध्ये दोन विकेट्स काढणारा जसप्रीत बुमरा सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.
न्यूयॉर्कचं पिच चर्चेत
टॉस झाला, तेव्हाच रोहितनं न्यूयॉर्कच्या पिचविषयी टिप्पणी केली होती, की हे नवं मैदान आणि तात्पुरतं पिच असल्यानं इथे अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. सामना संपल्यावरही रोहितनं याचा उल्लेख केला.
"जेमतेम पाच महिने जुनं असलेल्या पिचवर खेळणं कसं असेल याची आम्हाला खात्री नव्हती. या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो, म्हणूनच प्रथम क्षेत्ररक्षण केलं. पण आम्ही दुसऱ्या डावात बॅटिंग केली तोवर देखील पिच सुधारल्यासारखं मला वाटलं नाही. बोलर्सना मात्र पिचपासून मदत मिळाली. आम्हाला दोन गुण मिळाले याचा आनंद आहे. ते सर्वात महत्त्वाचं होतं," असं रोहितनं सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरिमनीदरम्यान सांगितलं.
या पिचवर टीका का होत आहे, हे तुम्ही सविस्तर इथे वाचू शकता.