आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या फायनलमध्ये आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा सामना रंगणार आहे.
सनरायझर्स हैदराबादनं शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
त्यामुळं आता कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ त्यांचं तिसरं विजेतेपद मिळवण्यासाठी रविवारी मैदानात उतरतील.
राजस्थान रॉयल्सनं या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या एसआरएचच्या संघानं प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं.
तर प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सच्या संघाला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. त्यांना 20 ओव्हरमध्ये 139 धावाच करता आल्या.
या कामगिरीच्या जोरावर पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघानं स्पर्धेत चौथ्या वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या SRH च्या संघाला पहिल्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर फटका बसला. तडाखेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या 12 धावांवर बाद झाला.
पण स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचलेल्या ट्रॅविस हेडनं पुन्हा एकदा संघाला सावरलं. त्यानं राहुल त्रिपाठीच्या साथीनं चांगली भागिदारी केली.
हेडनं 28 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. तर त्रिपाठीनं 15 चेंडूंमध्ये 37 धावांची फटकेबाजी करत गोलंदाजांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर झालेल्या पडझडीनंतर हेनरिक क्लासेननं 34 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी करत हैदराबादला मजबूत स्थितीपर्यंत पोहोचवलं. त्या जोरावर हैदराबादनं 9 विकेट गमावत 175 धावा केल्या.
राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर संदीप शर्मानं दोघांना बाद केलं. गेल्या सामन्यात अत्यंत किफायती ठरलेल्या अश्विनच्या 4 ओव्हरमध्ये हैजराबादनं 43 धावा केल्या आणि त्याला विकेटही मिळाली नाही.
राजस्थानच्या फलंदाजांचे अपयश
हैदराबादच्या संघानं विजयासाठी दिलेलं 176 धावांचं आव्हान यंदाच्या स्पर्धेतील धावांचा पाऊस पाहता फार मोठं नव्हतं. पण मोठ्या सामन्यांच्या दबावात पाठलाग करताना कोणतीही धावसंख्या मोठी ठरू शकते. राजस्थानच्या बाबतीत तसंच झाल्याचं पाहायला मिळालं.
यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरैल वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजांचा हैदराबच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही.
सलामीला आलेल्या जैस्वालनं 21 चेंडूंमध्ये 42 धावांची फटकेबाजी करत संघाला एक चांगली सुरुवात करून दिली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांना धावसंख्या तशी ठेवता आली नाही. कोहलर, सॅमसन आणि रियान पराग लवकरत बाद झाले.
त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरैलनं फकटेबाजी करत सामन्यावर परत पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानं 35 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. पण त्याची झुंज एकाकी ठरली. त्याला दुसऱ्या बाजुनं एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही.
अखेर राजस्थानच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 139 धावाच करण्यात यश आलं.
हैदराबादच्या गोलंदाजीचा विचार करता, फलंदाजीमध्ये अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मानं गोलंदाजीमध्ये उणीव भरून काढली. त्यानं सॅमसन आणि हेटमायर या दोन प्रमुख फलंदाजांना बाद केलं.
तर इॅम्पॅट्क प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या शाहबाज अहमदनं जैस्वाल, पराग आणि अश्विन या तिघांचे बळी घेत सामना हैदराबादच्या बाजुनं झुकवला.
स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी सायंकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर या हंगामाचा विजेता मिळणार आहे.