दिल्ली विधानसभेची वाटचाल सत्तांतराच्या दिशेने...
सकाळी साडे अकरा वाजेपर्यंतच्या कलानुसार भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठं यश मिळत असल्याचं दिसत आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी 70 जागांसाठी मतदान पार पडलं. आजच्या निकालातून दिल्लीवर राज्य कुणाचं, हे स्पष्ट होईल.
विनायक होगाडे
सकाळी साडे अकरा वाजेपर्यंतच्या कलानुसार भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठं यश मिळत असल्याचं दिसत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणूक आयोगाने प्राथमिक कल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, हे प्राथमिक कल असून अनेक फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे.
• निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, नवी दिल्ली मतदारसंघात भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये चुरशीची लढत सुरू आहे. अरविंद केजरीवाल कधी आघाडीवर, तर कधी पिछाडीवर जात आहेत.
• कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुडी आघाडीवर आहेत, आतिशी दुसऱ्या स्थानी तर अल्का लांबा तिसऱ्या स्थानावर आहेत.
• जंगपूरा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया पिछाडीवर असून, भाजपचे तरविंदर सिंह मारवाह आघाडीवर आहेत.
• बाबरपूर मतदारसंघात गोपाल राय आघाडीवर आहेत.
• पटपडगंज मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे अवध ओझा पिछाडीवर असून, भाजपचे रविंदर सिंह नेगी सुमारे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
• करावल नगर मतदारसंघातून भाजपचे कपिल मिश्रा सुमारे 13 हजार 500 मतांनी आघाडीवर आहेत.
• मुस्तफाबाद मतदारसंघात भाजपचे मोहन सिंह बिष्ट 21 हजार हुन अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
सकाळी अकरा वाजण्याच्या कलानुसार भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठं यश मिळत असल्याचं दिसत आहे. बहुमताचा 36 हा आकडा भाजपा पार करत असल्याचं दिसत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
निवडणूक आयोगानुसार, दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलामध्ये ओखला मतदारसंघातून भाजप उमेदवार मनीष चौधरी आघाडीवर आहेत.
ओखला मतदारसंघातून आम आदमी पक्षानं विद्यमान आमदार अमानतुल्लाह खान यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले मात्र, सध्या ते पिछाडीवर आहेत. काँग्रेसकडून अरीबा खान या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या शिफा-उर-रहमान यांना ओखला मतदारसंघातून उमेदवार केले आहे. एआयएमआयएमने उमेदवार दिल्यानंतर या मतदारसंघातील लढत अधिकच रंजक मानली जात होती.
तर, ओखला मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमधील चित्र पाहता आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये थेट सामना रंगताना दिसून येत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक अंदाजानुसार, उत्तर प्रदेशातील मिल्कीपूरच्या पोटनिवडणुकीचा निकालही आज लागणार आहे.
मतदारसंघात मतमोजणी सुरू असून येथे मोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या जागेवरुन सकाळी दहापर्यंत भाजप उमेदवार चंद्रभूषण पासवान 17 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते.
येथे त्यांची लढत समाजवादी पक्षाचे अजीत प्रसाद यांच्याशी आहे. अजीत प्रसाद हे समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि फैजाबाद मतदारसंघाचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र आहेत.
या मतदारसंघातून आजाद समाज पक्षाचे (कांशीराम) संतोष कुमार सध्या तिसऱ्या स्थानी आहेत.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सागर सुबोध झा पुण्यातून दिल्लीत गेले आहेत. प्रचार संपवत असतना त्यांचा पाय मोडला, त्यांना आपल्या पक्षाचा विजय निश्चित होईल अशी आशा आहे.
प्राथमिक कलानुसार, दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रमेश बिधुरी आघाडीवर आहेत, तर आम आदमी पक्षाच्या आतिशी पिछाडीवर दिसून येत आहेत. काँग्रेसनं या मतदारसंघातून अल्का लांबा यांना उमेदवारी दिली आहे.
आतिशी आणि अल्का लांबा दोघींनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे. दिल्लीतील बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं हे एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील असा दावा केलाय.
भाजपाला दिल्ली विधानसभेत यश मिळत असल्याचे कल आल्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे कान टोचले आहेत.वाचा ट्वीट-
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत.
आम आदमी पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या बहुतांश एग्झिट पोलमध्ये भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं आपले सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय.
दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी आणि काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आपापल्या विजयाची आशा व्यक्त केली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, "ही फक्त निवडणूक नाही तर एक धर्मयुद्ध आहे. चांगलं-वाईट, सत्य-असत्य, काम विरुद्ध गुंडगिरी यांच्यातील लढाई आहे. मला पूर्ण विश्वास आहे की कालकाजी आणि दिल्लीतील जनता चांगुलपणाच्या बाजूने उभे राहतील. आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी राहतील." “अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील”, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर, काँग्रेस उमेदवार अलकालांबा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “कालकाजीतील जनतेने रमेश बिधुरी यांना कुठलीही पसंती दिली असेल, असे मला तरी वाटत नाही.” पुढे बोलताना अल्का लांबा म्हणाल्या “मुख्यमंत्रीपदावर असताना आतिशी यांनी कोणतेही काम केलेले नाही.” तसेच, अरविंद केजरीवाल दिल्लीतील निवडणूक हरत असल्याचा दावाही त्यांनी केला.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाकडून आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
15 सप्टेंबर 2024 रोजी केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यावेळीही निवडणुका जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जनता आदेश देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पुन्हा बसणार नाही, असे केजरीवाल म्हणाले होते.
केजरीवाल यावेळी म्हणाले, ''मी दिल्लीच्या गल्लीबोळांत, घराघरांत जाणार आहे. केजरीवाल प्रामाणिक आहे, असा निकाल जनता जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही.”
दिल्लीतील कालकाजी येथील आमदार आतिशी यांच्याकडे सध्या शिक्षण आणि सामाजिक बांधकाम या सारखी महत्त्वाची खाती आहेत.
मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्रिपद सोडले आणि त्यानंतर आतिशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
संपूर्ण माहिती वाचा- आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं?
दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा 24 तर आम आदमी पार्टी 17 जागांवर पुढे आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी 36 जागा जिंकून य़ेणं आवश्यक आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये चुरस असल्याचे दिसते. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला 14, आम आदमी पार्टीला 10 आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळत असल्याचे दिसते.
दिल्ली विधानसभेच्या मावळत्या कार्यकाळात सर्वात मोठा आरोप झाला तो मद्य घोटाळ्याचा. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना यामुळे तुरुंगात जावं लागलं. आम आदमी पक्षाच्या आजवरच्या प्रतिमेवर या खटल्यामुळे मोठा परिणाम झाला.
त्याची सर्व माहिती वाचा- मद्य धोरण कसं ठरलं?
कार्यकर्त्यांच्या जोरावर केजरीवाल यांनी 2013मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. राजकीय पदार्पण करणाऱ्या त्यांच्या पक्षाने 28 जागा जिंकल्या. खुद्द अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून तेव्हाच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना 50,000 मतांनी हरवत जिंकून आले. पण याच शीला दीक्षितांच्या काँग्रेस पक्षासोबत मिळून त्यांनी सरकार स्थापन केलं.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी केजरीवाल दिल्ली मेट्रोने प्रवास करत रामलीला मैदानात दाखल झाले. ज्या रामलीला मैदानात ते अण्णांच्या सोबत उपोषणाला बसले होते तेच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेचं साक्षीदार झालं.
शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी भारत माता की जय, इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या आणि म्हणाले, "आज अरविंद केजरीवालने शपथ घेतलेली नाही. आज दिल्लीतल्या प्रत्येक नागरिकाने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. ही लढाई अरविंद केजरीवालला मुख्यमंत्री बनवण्यासाठीची नव्हती. ही लढाई सत्ता जनतेच्या हातात देण्यासाठीही होती."अरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या प्रवासाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दिल्लीत विधानसभा मतदारसंघातील 70 जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58 टक्के मतदान झालं होतं. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. आणि अखेर देशाच्या राजधानीत नेमकी सत्ता कुणाची? या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळेल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकला तर या पक्षासाठी दिल्लीच्या निवडणुकीतला हा सलग तिसरा विजय ठरेल. आणि भाजप जिंकला तर अनेकवर्षांनी भाजप दिल्लीच्या सत्तेवर विराजमान होईल.
मतदान आटोपल्यानंतर एकाच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष असतं आणि ते म्हणजे वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल्स. बीबीसी स्वतः अशा पद्धतीचा कुठलाही एक्झिट पोल जाहीर करत नसलं तरी देशातील इतर संस्थांच्या एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात? हे आपण पाहूया.सविस्तर वाचा- दिल्लीत सत्ता कुणाची? 'या' 8 एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?
दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर होणार आहेत. आज सकाळपासून याची मतमोजणी सुरू होईल आणि दुपारपर्यंत एकूण चित्र स्पष्ट होईल.दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही जाहीर होणार आहेत.यासर्व घटनाक्रमाची माहिती आपण येथे घेणार आहोत.