प्रेरणा, बीबीसी प्रतिनिधी
आसाममध्ये 126 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतांची मोजणी पूर्ण झाली असून आता ईव्हीएम उघडण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस आपली निसटलेली राजकीय पकड पुन्हा घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीतील 6 जागा सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या जागा ‘हाय-प्रोफाईल’ मानल्या जात आहेत.
जालुकबारी – हा राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा मतदारसंघ आहे. 2001 पासून ते सातत्याने इथे विजयी होत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसच्या विदिशा नियोग यांचे आव्हान आहे.
जोरहाट – हा काँग्रेसचे लोकसभा खासदार गौरव गोगोई यांचा मतदारसंघ आहे. ते आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत. लोकसभा खासदार असूनही त्यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी निवडणूक लढवत आहेत. ते या मतदारसंघातून याआधीही निवडून आले आहेत.
बीनाकांडी – एआययूडीएफ पक्षाचे संस्थापक बदरुद्दीन अजमल यांचा हा मतदारसंघ. यावेळी त्यांची लढत आसाम गण परिषदचे शहाबुद्दीन मजूमदार आणि आसाम जातीय परिषदचे रेजाउल करीम चौधरी यांच्यासोबत आहे. आसाम गण परिषद एनडीएचा, तर आसाम जातीय परिषद महाजोट आघाडीचा भाग आहे. मागील निवडणुकीत बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष काँग्रेससोबत आघाडीत होता, मात्र यावेळी पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत 27 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मागील वेळी पक्षाने 16 जागा जिंकल्या होत्या. या पक्षाचा प्रभाव लोअर आसाम आणि बराक व्हॅली भागात आहे.
नजीरा– नजीरा ही अप्पर आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील जागा आहे. इथं काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देबाब्रत सैकिया यांची लढत भाजपचे मयूर बोरोघैन यांच्याशी आहे. मागील निवडणुकीतही याच दोघांमध्ये चुरशीची लढत झाली होती आणि विजयाचा फरक खूपच कमी होता.
शिवसागर – हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण रायजोर दलचे संस्थापक अखिल गोगोई इथून निवडणूक लढवत आहेत. ते सध्या इथले आमदारही आहेत. त्यांचा सामना एनडीएतील आसाम गण परिषदचे प्रदीप हजारिका आणि भाजपचे कुशाल दोवारी यांच्याशी आहे.
ही जागा आणखी एका कारणासाठी महत्त्वाची आहे. कारण एकाच आघाडीचा भाग असूनही भाजप आणि एजेपीने इथं स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. अखिल गोगोई 2019-2020 दरम्यान सीएएविरोधातील आंदोलनांचे प्रमुख चेहरा होते. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि ते जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते.
दिसपूर – हीदेखील एक हाय-प्रोफाइल सीट आहे. भाजपचे उमेदवार प्रद्युत बोरदोलोई, जे पूर्वी काँग्रेसचे खासदार होते, त्यांनी निवडणुकीआधीच पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपचे वरिष्ठ नेते जयंत कुमार दास यांनी पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
काँग्रेसने या जागेवर मीरा बोरठाकुर गोस्वामी यांना उमेदवारी दिली आहे.