NCRB : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या तर UPमध्ये महिला अत्याचार आणि अपहरणाच्या सर्वाधिक घटना

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

National Crime Records Bureau अर्थात NCRBने नुकत्याच जारी केलेल्या 2021मधल्या गुन्हेगारीच्या अहवालात महाराष्ट्राविषयी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. आत्महत्या, महिलांविरूद्धचे गुन्हे आणि एकूण गुन्ह्यांच्या नोंदणीच्या बाबतीत महाराष्ट्रात देशातील राज्यांच्या यादीत सर्वांत वर आहे.

महाराष्ट्रात एकूण भारतीय दंड संहिताअंतर्गत 3 लाख 67 हजार गुन्हे नोंदवले गेले जे देशात सर्वांत जास्त होते. यानंतर उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूचा नंबर लागतो, जे दहा हजार आण 45 हजारांनीच मागे आहेत.

तर विशेष आणि स्थानिक कायद्यांअंतर्गत SLL अंतर्गत नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्रा 1.73 लाख गुन्हे नोंदवले गेले. यापेक्षा जास्त गुन्हे तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि उत्तर प्रदेशात नोंदवले गेले.

2021 या वर्षात सर्वांत जास्त आत्महत्यांच्या केसेस महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या. या वर्षभरात 1 लाख 64 हजार 33 आत्महत्या नोंदवण्यात आल्या होत्या, हा आकडा 2020पेक्षा 7.2 टक्क्यांनी वाढलेला होता.

यापैकी सर्वाधिक म्हणजे 22,207 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या, त्यापाठोपाठ 14,965 आत्महत्या मध्य प्रदेशात तर 13,500 आत्महत्या पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आल्या होत्या.

पण एकूण महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचं नाव सुरुवातीच्या तीन राज्यांमध्ये येतं. NCRBच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात महिलांवरील अत्याचारांचे एकूण 4 लाख 28 हजार 278 गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात (56,083), त्यानंतर राजस्थान (40,738) आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक (39,526) लागतो.

तर महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांच्या घटना सर्वाधिक उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आल्या - 10,574. त्यापाठोपाठ 8,661 अपहरणाच्या घटनांसह बिहार आणि 7,559 केसेससह महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

तर महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाच्या गुन्ह्यांची नोंद पाहता, महाराष्ट्रात सर्वाधिक 927 घटना नोंदवण्यात आल्या, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.

तसंच महिलांवरील हल्ले आणि त्यांच्या विनयभंगाचे गुन्हे सर्वाधिक ओडिशामध्ये (14,853) आणि त्यानंतर महाराष्ट्रात (10,658) नोंदवण्यात आले होते.

तर बलात्कारांच्या घटनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा (2496) देशात चौथा क्रमांक लागतो. या यादीत राजस्थान (6337), मध्य प्रदेश (2947) आणि उत्तर प्रदेश (2845) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

तर बाललैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही महाराष्ट्रात (6116) उत्तर प्रदेशानंतर (6,970) सर्वांत जास्त गुन्हे नोंदवण्यात आले.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना लॉकडाऊन आणि त्यामुळे लोकांच्या रोजगारावर झालेला परिणाम देशातील आत्महत्यांच्या प्रमुख कारणांपैकी एक पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच की काय, आत्महत्येच्या एकूण केसेसमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)