युक्रेन- रशिया वाद : नरेंद्र मोदींनीही रशियाचं अनुकरण करावं- सोशल मीडियावर मागणी

    • Author, मेधावी अरोरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर भारतातील समाजमाध्यमांवरच्या एका घटकाने (यात एक माजी खासदारही आहेत) 'अखंड भारता'ची हाक दिली आहे आणि भारताने 'पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन परत घ्यावेत' असं म्हटलं आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे पडसाद भारतातील समाजमाध्यमांवरही उमटताना दिसत आहेत. या घटनेसंदर्भात भारतीय समाजमाध्यमींमध्ये दोन गट पडले आहेत.

काही समाजमाध्यमींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे व हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे, तर काहींनी पुतीन यांची प्रशंसा केली असून पंतप्रधान मोदींनीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं असं आवाहन केलं आहे.

भारताने पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीन हे वादग्रस्त प्रदेश अनुक्रमे पाकिस्तान व चीन यांच्याकडून 'परत घ्यावेत' असं आवाहन करणाऱ्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवरून प्रकाशित होत होत्या.

रशियाने केलेलं आक्रमण 'अखंड रशिया'च्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे, असं काही समाजमाध्यमींनी म्हटलं आहे. तसंच, 'अखंड भारता'साठीसुद्धा अशी पावलं उचलावीत असं म्हणत काहींनी तसे नकाशेही प्रसिद्ध केले.

'अखंड भारता'च्या कल्पनाचित्रात पाकिस्तान व चीन या देशांमधील वादग्रस्त भागांसोबतच भारताच्या इतरही अनेक शेजाऱ्यांकडील प्रदेशांचा समावेश आहे. या पूर्वी भारतीय जनता पत्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी अशी आवाहनं केलेली आहेत.

ट्विटरवरील अनेक 'व्हेरिफाइड' खात्यांसह अनेकांनी या मताची पुष्टी केली. सुमारे दहा लाखांपर्यंत सदस्य असलेल्या एका मोठ्या फेसबुक ग्रुपमध्येसुद्धा असंच आवाहन करण्यात आलं.

भाजपचे राजकीय नेते व उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरचे माजी खासदार हरीओम पांडे यांनीसुद्धा अशी एक पोस्ट केली आहे. ऐंशी हजारांहून अधिक फॉलोअर असलेल्या स्वतःच्या 'व्हेरिफाइड' ट्विटरखात्यावरून पांडे लिहितात: "रशियाला जसा सोव्हिएत संघ पाहिजे. चीनला वन चायना हवाय, तर मग आम्हालासुद्धा अखंड भारत पाहिजे आहे."

शिवराज सिंग दाबी हे मध्य प्रदेशातील भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाशी संबंधित असल्याचं अनेक माध्यमांमध्ये व खुद्द दाबी यांनीही म्हटलं आहे; या दाबींनीसुद्धा अशाच आशयाची पोस्ट केली आहे.

30 हजारांहून अधिक फॉलोअर असणारे दाबी म्हणतात: "राष्ट्रपती पुतिन यांनी सांगितलं की कशा प्रकारे पुन्हा एकदा अखंड रशिया बनू शकतो. आपणही अखंड भारताची इच्छा सोडू नये."

स्वतःचं वर्णन 'सैनिकाच्या घरातली मुलगी' असं करणाऱ्या एका लेखिकेनेही अशीच पोस्ट केली आहे.

1 लाख 69 हजार फॉलोअर असणाऱ्या या लेखिकेने ट्विटरवर म्हटलं, "नाटो आणि संयुक्त राष्ट्र काय करू शकतात हे आपल्याला आता कळलंय, त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची हीच वेळ आहे."

तामिळनाडूस्थित एका पत्रकाराने ट्वीटमध्ये म्हटलंय की- "आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी अनुसरता येईल असा एक दाखला आपल्यासमोर आहे."

दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे- "लोहा गरम है, मार दो हथोडा." सध्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान मॉस्को दौऱ्यावर गेलेले आहेत, त्यामुळे ही वेळ साधून पाकव्याप्त काश्मीर 'परत घ्यावं' असं सुचवणारी ही पोस्ट आहे.

अशा अनेक प्रतिक्रिया आणि मीम्सही समाजमाध्यमावरून प्रसिद्ध होताना दिसत आहेत.

काही उदाहरणं-

या दोन परिस्थितींची तुलना करता येईल का?

रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि भारताचे चीन व पाकिस्तान यांच्याशी असणारे सीमावाद, यांमध्ये तुलना करणं रास्त होणार नाही, असं तज्ज्ञ म्हणतात.

"या दोन प्रदेशांमध्ये काही तुलना करता येणार नाही. रशिया युक्रेनमध्ये गेला त्याचं प्रमुख कारण सुरक्षाविषयक होतं, तर भारताला सद्यस्थितीत कोणतीही सुरक्षेविषयक चिंता सतावत नाहीये. शिवाय, अण्वास्त्रं, सैनिकी सामर्थ्य आणि भूप्रदेशाचा प्रकार, अशा इतर पैलूंमध्येही फरक आहेत. पाकव्याप्त काश्मीर किंवा अक्साई चीन इथून रणगाडे पुढे रेटण्याची अपेक्षा करता येत नाही," असं संरक्षणविषयक विश्लेषक आणि भारतीय सैन्यातील माजी मेजर जनरल हर्षा काकड म्हणाले.

"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारचं धोरण आक्रमकतेपेक्षा विकासावर भर देणारं राहिलं आहे."

काल पुतीन यांच्याशी फोनवरून संभाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधील हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आणि संवाद व मुत्सद्देगिरी यांवर भर दिला. युक्रेनमधील परिस्थितीबाबत भारताने खेद व्यक्त केला आहे पण या हल्ल्याबद्दल रशियावर टीका मात्र केलेली नाही.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे: "विद्यमान सरकारची सामरिक चूक खूप महागात पडणार आहे."

याबाबत त्यांनी आणखी काही स्पष्टीकरण केलं नाही, पण पाकिस्तान, चीन व रशिया यांच्यातील बदलत्या संबंधांविषयीच्या काही बातम्या शेअर केल्या.

भारत व पाकिस्तान या दोघांनीही काश्मीरच्या संपूर्ण प्रदेशावर हक्क सांगितलेला आहे, पण दोघांकडेही काश्मीरचा ठराविक भाग आहे- या भागांना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतशासित काश्मीर आणि पाकिस्तानशासित काश्मीर म्हणून मान्य करण्यात आलेलं आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तान यांच्यात दोन युद्ध झाली असून मर्यादित संघर्षाच्या पातळीवरील एक लढाई झालेली आहे.

अक्साई चीन हा लडाखच्या पूर्वेकडील एक प्रदेश आहे, त्यावर चीनचं नियंत्रण असलं तरी हा भाग आपला असल्याचा भारताचा दावा आहे. चीनचा झिनजिआंग प्रांत तिबेटच्या पश्चिम भागाशी जोडला ठेवण्याच्या दृष्टीने अक्साई चीनवरील नियंत्रण चीनच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

पूर्वी भारतीय नेत्यांनी- यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व गृह मंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे- पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीन हे 'भारताचा अविभाज्य भाग' असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)