भारतातील बेरोजगारीनं एका पूर्ण पिढीला 'नैराश्यात' ढकललंय का?

    • Author, क्रेग जेफरी आणि जेन डायसन
    • Role, मेलबर्न युनिव्हर्सिटी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

बजेट-2022 च्या घोषणांवरून भारताचं पुढचं लक्ष्य आगामी 5 वर्षांमध्ये 60 लाखांच्या रोजगार निर्मितीचं आहे, हे दिसत आहे.

अशा परिस्थितीत भारतात बेरोजगारीचा दर गेल्या काही वर्षांमध्ये विकसनशील अर्थव्यवस्थांच्या दरापेक्षा अधिक झालेला आहे. त्यामुळं रोजगाराचं लक्ष्य साध्य करणं सोपं ठरणार नाही.

2000 च्या दशकातील मध्याच्या काळात मेरठमध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक गट स्वतःचा उल्लेख गमतीनं 'निराशावादी पिढी' असा करत होतं.

सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या या समूहातील विद्यार्थी म्हणायचे की, ते ग्रामीण भागातील कुटुंब आणि शहरांमधील स्वप्नं यांच्यातच अडकलेले आहेत. "आमचं जीवन तर जणू टाईमपास बनलं आहे," असं हे विद्यार्थी म्हणतात.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात रोजगाराचं संकट स्पष्टपणे दिसत आहे. मीडिया आणि लोकांचं लक्षही पुन्हा एकदा बेरोजगार तरुणांकडे वेधलं गेलं आहे. लाखो तरुण जे त्यांच्या शिक्षणाच्या तुलनेत खालच्या पातळीवर काम करत आहेत, ते भारताच्या विकासाच्या कहाणीलाच आव्हान देताना दिसत आहेत.

2000 च्या दशकाच्या काळातही जी बेरोजगारीची समस्या दिसून येत होती, ती त्या काळापासून आतापर्यंत प्रचंड वाढली आहे.

एकीकडं बेरोजगारीची समस्या वेगानं पुढं सरकत असल्याचं पाहायला मिळत आहे, तर माध्यमातील मथळे हे आंदोलनं आणि नेत्यांच्या भाषणात कुठंतरी अडकल्याचं पाहायला मिळत आहे.

पण काळजीपूर्वक आणि बेरोजगार तरुणांबाबत सर्व स्टिरिओटाइप गोष्टींना बाजूला सारुन विचार केला असता अखेर भारतात तरुण दैनंदिन पातळीवर काय करत आहेत, असं आम्ही विचारू शकतो का?

ते त्यांचा वेळ कसा घालवतात? त्यांचा समाजाशी कसा संबंध आहे? आणि ते भारताला कसं बदलत आहेत?

बेरोजगार तरुणांच्या हाती निराशा

गेल्या 25 वर्षांमध्ये आम्ही बेरोजगार तरुणांचा अनुभव आणि कामाबाबत संशोधन केलं आहे.

हे संशोधन 18 ते 35 वर्षांच्या तरुणांमध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठ आणि उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात राहून काम करून तयार केलेलं आहे.

त्याच्या परिणामांचा विचार करता आम्हाला सामाजिक पीडा किती खोलवर रुतलेली आहे, ते पाहायला मिळतं. बेरोजगार तरुणांना अनेक प्रकारची निराशा हाती लागत असते. त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे. त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यांच्याबरोबर होणाऱ्या वर्तनात शक्यतो त्यांना आदर मिळत नसल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या लग्नामध्येही अडचणी आलेल्या पाहायला मिळतात.

पुरुषांकडे जर कायमस्वरुपी नोकरी नसेल, तर त्यांना कमी लेखलं जातं. त्यांनी शिक्षण आणि नोकरी शोधण्यात जेवढा वेळ घालवला आहे, त्याबाबत त्यांना अत्यंत वाईट वाटत आहे.

सोबतच नोकरी, नागरिकतेशीही संबंधित मुद्दे आहेत. अनेक जणांना किशोरावस्थेत असं वाटत असतं की, सरकारी नोकरी मिळवून ते देशाची सेवा करतील. पण ती नोकरी मिळवणं अत्यंत कठिण बनलं आहे.

अनेक बेरोजगार आणि विशेषतः पुरुष हे एकटेपणाचे शिकार बनले असून त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होतो. स्वतःबाबत माहिती देताना ते 'काही करत नाही' किंवा टाइमपास करतो, असं सांगतात. स्वतःला निराशावादी समजणाऱ्या या पिढीतील लोक सगळीकडे आहेत, असं वाटत आहे.

पण काहीही करत नाही, असं म्हणणाऱ्या बेरोजगार तरुणांकडे केवळ ते काहीही करत नाहीत, अशा नजरेनं पाहता येणार नाही.

भारताच्या नागरी समाजाचा आधार

रोजच्या कामकाजात तरुण हे अत्यंत मनापासून सहभागी होत आहेत. ते काही तरी काम शोधतातच. ते काम फारच उच्च दर्जाचं असेल किंवा त्यात या तरुणांकडे असलेली सर्व कौशल्य वापरली जातीलच असं नाही. पण त्यानं त्यांचं काम किमान सुरू राहतं, हे नक्की आहे.

बेरोजगार तरुण हे त्यांच्या समुदायासाठी किंवा समाजासाठी खूप काही करत आहेत, हीदेखील खास बात आहे. समाजातील हा वर्ग भारताच्या सिव्हिल सोसायटीचा मुख्य आधार बनला आहे.

असे तरुण नेहमी सामाजिक बदलाच्या माध्यमातून काम करतात. ते त्यांची गावं, खेडी याठिकाणी इतरांना मदत करण्याचं किंवा सहायकाप्रमाणं काम करतात.

सरकारी सेवांचा वापर कसा करायला हवा याबाबत हे तरुण इतरांना माहिती देतात. टेक्नॉलॉजी, मायक्रोक्रेडिट, धार्मिक बाबींशी संबंधित कामं, पर्यावरणाचं संवर्धन आणि विकास याच्याशी संबंधित नल्या कल्पना हे तरुण एकमेकांबरोबर शेअर करत असतात.

कधी-कधी आंदोलनांमध्येही हे तरुण असतात. पण बहुतांश काळ राजकारणापासून दूर राहत त्यांचा ओढा हा सेवा आणि सोयीसुविधा याच्याकडे असतो. त्यांच्या परिसरात शाळा, शिक्षक असावे अशा त्यांच्या इच्छा असतात.

अनेक बेरोजगार तरुणांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की, ते स्वतःची मदत करू शकत नसले तरी, ते त्यांच्या आगामी पिढ्यांची मदत करू शकतात.

सध्या लहान मुलं असलेली जी पिढी आहे, जे किशोरवयीन आहेत आणि त्यांच्या शिक्षण किंवा करिअरसाठी जे पर्याय तयार करत आहेत आणि त्यांचं कुटुंब त्यांना समजण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलेलं नाही. अशा पिढीसाठी हे 18 ते 35 वर्षांच्या बेरोजगार तरुणांमधली पिढी बनत चालले आहेत.

याठिकाणी तरुणांची जी स्थिती सांगितली जात आहे त्याचा हा अर्थ नाही की, बेरोजगारी ही चांगल्या पद्धतीनं मांडली जाऊ सकते.

याचा अर्थ म्हणजे देशाच्या वेग-वेगळ्या कोपऱ्यात राहणाऱ्या बेरोजगार तरुणांची ऊर्जा सर्वांसमोर मांडणं. जे भारताच्या लोकसंख्येत ऊर्जेचं केंद्र समजले जाऊ शकतात. ते बेरोजगार तरुण भारत आणि जगाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

धोरणं आखणाऱ्यांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की, तरुणांच्या या समुदायाला इतर बाह्य संघटनांद्वारे कशाप्राकारे मदत केली जाऊ शकते?

कदाचित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना (मनरेगा) चा विसातर करुन म्हणजे तरुण ज्या प्रकारची सामुदायिक सेवा सध्या करत आहे, त्यांनाही यात सहभागी करता येतं आणि एक संघटित संरचना तयार करून त्यांना संधी दिली जाऊ शकते.

अशी पद्धतही शोधली जाऊ शकते की, बेरोजगार तरुणांना त्यांच्या कौशल्यासह मान्यता देता येऊ शकेल आणि त्यांना काम मिळू शकेल.

एक बाब तर स्पष्ट आहे. ती म्हणजे तरुण संधी मिळवण्यासाठी सज्ज आहेत.

(क्रेग जेफरी आणि जेन डायसन मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये मानवी भूगोल शिकवतात. जेफरी भारतातील अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. त्यात "टाइमपास: यूथ, क्लास अँड द पॉलिटिक्स ऑफ वेटिंग इन इंडिया"चा सहभाग आहे. डायसन "वर्किंग चाइल्डहूड: यूथ, एजन्सी अँड द एनव्हायर्नमेंट इन इंडिया"चे लेखक आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)