उद्धव ठाकरे : 'कोव्हिड पुन्हा वाढतोय, येणारे दिवस आव्हानात्मक'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोव्हिड पुन्हा वाढतोय, येणारे दिवस आव्हानात्मक असतील, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. तसंच, परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असंही मुख्यमंत्री म्हणतात.

दुसरीकडे, गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे, अशी भीती नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला, तर डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरातल्या स्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांची राजकीय पक्षांना विनंती

"कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता," अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "हे उघडा ते उघडा' या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे."

"सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, सरकारनं वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल," असं मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर, कडक निर्बंध लावणार - डॉ. नितीन राऊत

"गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे," अशी माहिती डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

तसंच, ते पुढे म्हणाले, "पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत आहेत."

डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कोरोनासंदर्भात आढावा घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या बैठकीमध्ये नागपुरातील नागरिक मोठ्या संख्येने आवश्यकता नसताना घराबाहेर पडत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसंच, सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)