नारायण राणे: 'मी असतो तर कानाखाली वाजवली असती'; मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.'मी असतो तर कानाखाली वाजवली असती' ;मुख्यमंत्र्यांबद्दल राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त शब्दात टीका केली आहे.
"राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला", असं राणे म्हणाले. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.
"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं", असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही", अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.
एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे त्यामुळे मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
2. नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुखांची आत्महत्या
नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मेश्राम यांनी इमारतीच्या नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
बेलतरोडी इथल्या राहत्या घरी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन त्यांनी हे कृत्य केलं. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
ज्योत्सना मेश्राम या माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत्या. डॉ. सुधीर मेश्राम यांचं मार्च महिन्यात निधन झालं होतं. ज्योत्स्ना मेश्राम या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या.
3. पुण्यात अंगणवाडी सेविकांचं मोबाईल वापसी आंदोलन, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडेंच्या चौकशीची मागणी
राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना भाजपा सरकारच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी सोमवारी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन करत निषेध नोंदवला. 'लोकसत्ता'ने याबाबत बातमी दिली आहे.
यावेळी अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकार्यांना मोबाईल देऊन टाकले. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली. तसेच यावेळी भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
"1 लाख 5 हजार महिलांना मोबाईल वाटप करण्यात आले होते. तेव्हापासून आज अखेर किमान 50 टक्के महिलांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत. त्याचा येणारा खर्च संबधित महिलांना करावा लागत आहे. तसेच हे मोबाईल महिलांना देण्यापूर्वी एका गोडाऊनमध्ये २ वर्ष पडून होते अशी माहिती समोर आली आहे आणि तेच मोबाईल आम्हाला देण्यात आले आहे. या मोबाईल खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या सर्व प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांची चौकशी पाहिजे," अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे.
4. शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना जामीन पण निलंबनाची कारवाई
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांना 8 लाखांच्या लाच प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
पण दुसरीकडे, झनकर यांच्यावर निलंबनाची अखेर कारवाई करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
डॉ. वैशाली झनकर-वीर तब्बल 8 लाखांची लाच घेतल्यामुळे नाशकात एकच खळबळ उडाली होती. वैशाली झनकर यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आज न्यायालयातून जामीन मिळाल्यामुळे दिलासा मिळाला होता. परंतु, दर सोमवारी झनकर यांना ACB कार्यालयात हजेरी बंधनकारक असणार आहे.
वैशाली झनकर यांना जिल्हा सत्रन्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन वेळा निलंबनाचा प्रस्ताव पाठवून ही निलंबन होत नसल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
लाचखोर प्रकरणात पोलीस आणि न्यायालयीन कोठडी सुनवल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता झनकर यांना निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव असणार आहे.
5. मुंबई महापौरपदासाठी सोनू सूद? काँग्रेसचा अनोखा प्लॅन
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने आतापासून रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिका स्वतंत्र लढवण्याबाबत याआधीच मुंबई काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

मुंबई काँग्रेसकडून महापौरपदासाठी अभिनेत्यांची नावं जाहीर झाली तर निवडणुकीत फायदा होईल असा रणनिती समितीचा अंदाज आहे.
त्या दृष्टीने महापौरपदासाठी काँग्रेसकडून सोनू सूद, मिलींद सोमण अथवा इतर प्रसिद्ध अभिनेत्यांची नाव जाहीर करण्याबाबत रणनिती समितीच्या प्रस्तावात शिफारस करण्यात आली आहे. 'झी24तास'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मात्र या प्रस्तावावर अद्याप चर्चा झाली नसून मुंबई काँग्रेस या प्रस्तावावर चर्चा करण्याची शक्यता आहे. गणेश यादव या रणनीती समितीचे समन्वयक म्हणून आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























