You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: कोरोनाविरोधी लढ्यासाठी 23 हजार कोटींचं पॅकेज, नवीन आरोग्यमंत्र्यांची घोषणा, #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. कोरोनाच्या विरोधात 23 हजार कोटींचं पॅकेज, मांडविया यांची घोषणा
कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करत येत असताना केंद्राने आपत्कालीन पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवीन आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी 23 हजार 123 कोटी मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 15 हजार कोटी केंद्र सरकार, तर 8 हजार कोटींचं वाटप राज्यांना करण्यात येणार असल्याचं मांडविया यांनी सांगितलं.
736 जिल्ह्यांमध्ये बालरोग विभाग स्थापन करण्यात येणार असून 20 हजार आयसीयू बेड्स तयार करण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं सशक्तीकरण करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच 1 लाख कोटी रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
बाजार समित्या आणखी मजबूत करण्यात येतील. त्यांना अधिक संसाधनं दिली जातील. मंडया संपवल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे.
2. माध्यमांमध्ये शेरेबाजी करण्यापासून दूर रहा - पंतप्रधान मोदी
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपानंतर पंतप्रधानांनी नवीन मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. काही मंत्र्यांना का हटवण्यात आलं, याविषयीही यावेळी त्यांनी सांगितलं.
हटवण्यात आल्याचा संबंध त्यांच्या क्षमतेशी न लावता त्यांच्या अनुभवाचा नवीन मंत्र्यांनी फायदा घ्यावा असं पंतप्रधानांनी सांगितलं.
महाराष्ट्र आणि केरळमधल्या परिस्थितीविषयी पंतप्रधानांनी काळजी व्यक्त केली.
नवीन मंत्र्यांनी माध्यमांमध्ये शेरेबाजी करण्यापासून दूर रहावं, आपला चेहरा चमकवण्याऐवजी कामगिरी चमकवण्याकडे लक्ष द्यावं असा सल्ला पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांना दिलाय. महाराष्ट्र टाईम्समध्ये याविषयीची बातमी छापून आली आहे.
3. केंद्रातील फक्त मंत्रीच नाही, पंतप्रधानच बदलण्याची गरज - नाना पटोले
सरकारचं अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातले चेहरे बदलून चालणार नसून पंतप्रधानच बदलण्याची गरज असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय.
इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने राज्यातल्या महसुली आयुक्त मुख्यालयांच्या इथे आंदोलन केलं.
पेट्रोलचे वाढलेले दर, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती या सगळ्यांविषयी बोलताना नाना पटोलेंनी पंतप्रधानांवर टीका केली. लोकमतमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
4. 'पुणे महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी तयारीला लागा'
पुणे महापालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकावण्यासाठी तयारीला लागाल, अशा सूचना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडी आहे मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असं राऊत म्हणाले.
म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या उद्धाटनावेळी संजय राऊत बोलत होते, TV9 मराठीने ही बातमी दिली आहे.
5. महाराष्ट्रात पुढचे काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढचे काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जिथे 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल, तिथेच पेरण्या कराव्यात आणि जिथे यापेक्षा कमी पाऊस होईल, जमिनीत ओलावा नसेल तिथे पेरणी करू नये, असं ABP माझाच्या बातमीत म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)