You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरः कट्टरवाद्यांचा काश्मीरमध्ये गोळीबार, तीन घटनांमध्ये 6 ठार
- Author, रियाज मसरूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पाकिस्तान समर्थित कट्टरवादी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात एक स्थानिक दुकानदारही जखमी झाला.
युरोपीय मुत्सद्द्यांचा गट काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्या आहेत.
दरम्यान एका हिंदू रेस्टॉरंटवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी शुक्रवारी केला. मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला होता. यात रेस्टॉरंटचे मालक आकाश मेहरा जखमी झाले होते.
15 युरोपीय देशांच्या मुत्सद्द्यांचा गट श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही वेळातच हा हल्ला करण्यात आला होता.
तर श्रीनगरपासून दक्षिणेकडे 60 किमी अंतरावर असलेल्या शोपियामध्ये शुक्रवारी सकाळी एक मोठी चकमक झडली. यात तीन स्थानिक शस्त्रास्त्रधारी कट्टरवाद्यांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी या अतिरेक्यांना शस्त्रास्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं.
मात्र, अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर तिन्ही अतिरेकी लपून बसलेल्या घराला जवानांनी घेराव घातला.
प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत ठार झालेला एक अतिरेकी काही दिवसांपूर्वीच या संघटनेत सामिल झाला होता.
दुसरीकडे बडगाम जिल्ह्यातही एक चकमक झडली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोस्ट वाँटेड कट्टरवादी कमांडर युसुफ कंटरू सुरक्षा जवानांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, तो जखमी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आयजी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही रक्ताच्या डागांचा माग करत दुसऱ्या गावाला वेढा घातला."
पोलीस अधिकारी प्रसार माध्यमांशी बोलत असताना श्रीनगरच्या बाहेरच्या भागात संशयित कट्टरतावाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
उन्हाळा सुरू होण्याआधी खोऱ्यात दहशतवादी घटना वाढल्या आहेत. याविषयी बोलताना आयजी प्रवीण कुमार म्हणाले, "उन्हाळ्यात हिंसाचार रोखण्यासाठीचा काउंटर प्लान तयार आहे. अतिरेक्यांनी आपल्या कारवायांची पद्धत बदलली आहे आणि आम्हीसुद्धा त्याचप्रमाणे काम करतोय."
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यघटनेतील कलम 370 रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याचं विभाजन केलं होतं.
दिर्घकाळ लादण्यात आलेली संचारबंदी, ठप्प असलेली संपर्काची साधनं आणि शटडाऊननंतर 2019 सालच्या अखेरीस थोडी सूट देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह खोऱ्यातल्या मोठ्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं.
अनेक महिन्यांनंतर त्यांना सोडण्यात आलं.
तेव्हापासूनच केंद्र सरकार परदेशी मुत्सद्द्यांना काश्मीर दौऱ्यासाठी निमंत्रण देत होतं. मात्र, हे मुत्सद्दी काही निवडक ठिकाणांनाच भेटी देणार आहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या नेत्यांनी, "सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती आणि वाहतुकीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादल्यामुळे" अशा निवडक भेटीवर टीका केली होती.
5 ऑगस्ट 2019 नंतर परदेशी मुत्सद्द्यांचा हा चौथा काश्मीर दौरा आहे. यात जवळपास 15 देशांच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 6 मुस्लीम देशांचे प्रतिनिधीही आहेत.
2019 च्या तुलनेत खोऱ्यात हिंसाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचं अधिकाऱ्यांनी या मुत्सद्दी अधिकाऱ्यांना सांगितलं.
एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं, "सुरक्षेचे कठोर उपाय योजल्यामुळे 2019 च्या तुलनेत हिंसाचाराच्या घटनांमध्ये 60 टक्के घट झाल्याचं आणि सुरक्षा दलांना पूर्वीच्या तुलनेत 25 टक्के कमी नुकसान झाल्याची माहिती या मुत्सद्द्यांना देण्यात आली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)