मराठा आरक्षण : स्थगिती देणाऱ्या बेंचपेक्षा घटनापीठासमोर सुनावणी घ्या – अशोक चव्हाण

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला पाहिजे, ज्या बेंचनं स्थगिती दिली त्या बेंचसमोर पुन्हा जाण्याची आमची भूमिका नाही, असं वक्तव्य मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

मराठा आरक्षणावर मंगळवारी (27 ऑक्टोबर) क्सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

याविषयी अशोक चव्हाण यांनी म्हटलं, "मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला पाहिजे, ज्या बेंचनं स्थगिती दिली त्या बेंचसमोर पुन्हा जाण्याची आमची भूमिका नाही. ही फक्त सरकाची नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे."

"मराठा आरक्षणावरून आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मंजुरी मिळावी ही आमची ठाम भूमिका आहे. हा प्रश्नी लवकर मार्गी लागला पाहिजे," असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारनं आम्हाला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी काय तयारी केली, ते सांगायला हवं, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

"आज आरक्षणसाठीच्या उपसमितीची मीटिंग झाली काय, हासुद्धा प्रश्न आहे. आम्हाला याविषयी सांगा तर, नाहीतर कसा विश्वास पटणार? कोण मुख्यमंत्री, कोण माजी मुख्यमंत्री याच्याशी आम्हाला काही देणंघेणं आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे."

"मराठा आरक्षणासाठी 42 मुलांनी आत्महत्या केल्यात. 58 मोर्चे केले. यावर कुणीच चर्चा करत नाहीये. मी अधिकाऱ्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही मराठा समाजाचा संयम बघू नका," असंही त्यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)