You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंदुकीचा धाक दाखवून 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, पाच जणांना अटक #5मोठ्याबातम्या
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. बंदुकीचा धाक दाखवून मुलीवर सामूहिक बलात्कार, पाचजणांना अटक
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून एका 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी (10 ऑक्टोबर) दिली.
मंगळवारी पीडिता तिच्या प्रियकरासोबत बागबेडा परिसरात गेली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना पकडलं आणि बंदुकीचा धाक दाखवून कालियाडीह गौशाला परिसरात घेऊन गेले.
तिथं त्यांनी मुलीच्या प्रियकराला बांधून ठेवलं आणि त्याच्यासमोरच मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यापेकी एक अल्पवयीन असून त्याला बालसुधारगृहात पाठवून देण्यात आलं आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक तमील वानन यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला. मुलीने सुरुवातीला डान्स स्कूलवरून परतताना अपहरण झाल्याचं सांगितलं पण ती माहिती चुकीची असल्याचं पोलिसांना आढळून आलं. ही बातमी फर्स्टपोस्टने दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
2. 'तुम्हाला कळत नाही हे मोंदींना सांगण्याची हिंमत नसणं अधिक धोक्याचं' - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पवनचक्क्यांविषयी पंतप्रधान मोंदींनी डेन्मार्कमधल्या एका अधिकाऱ्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. या संभाषणाचा व्हीडिओ राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केला होता.
'पवनचक्क्यांच्या मार्फत हवेतलं बाष्प गोळा करून पाण्याची निर्मिती करता आली, तसंच हवेतला ऑक्सिजन वेगळा करून तो वापरता आला तर ते फायद्याचं ठरेल. त्यादृष्टिनं काही प्रयत्न करता येतील का?' असं मोदींनी म्हटलं होतं.
त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यानं म्हटलं, "तुमचा प्रश्न ऐकताना मी हसत होतो, तुमचा आनंद आणि उत्साह ऐकून मला आनंद वाटला असं त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं."
याच संभाषणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
"तुम्हाला समजत नाही, हे मोदींना सांगण्याची हिंमत त्यांच्या आजूबाजूचे लोक करत नाहीत, हे देशासाठी अधिक धोक्याचं असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.
3. कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल करण्याचा कर्नाटकमधल्या न्यायालयाचा आदेश
केंद्राच्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कर्नाटकमधल्या तुमकुर न्यायलयाने दिला आहे. TV9 मराठीने याविषयीची बातमी दिली आहे.
रमेश नाईल एल. यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती. कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान कंगनाने केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
पुरावा म्हणून याचिकाकर्त्यांनी कंगनाची ट्वीट्स कोर्टासमोर सादर केली. यावरच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
4. IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोव्हिडमुळे निधन
2015 सालच्या IAS बॅचचे अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोव्हिड 19मुळे पुण्यात निधन झालं. मूळ परभणीचे असणारे शिंदे त्रिपुराच्या अर्थमंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.
दोन आठवड्यांपूर्वीच शिंदे सुटीसाठी कुटुंबासह गावी आले होते. इथेच त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना सुरुवातीला नांदेडमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथून औरंगाबादला हलवण्यात आलं. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं.
तिथे उपचारांदरम्यान सुधाकर शिंदे यांचा मृत्यू झाल्याची बातमी ABP माझा ने दिली आहे. त्यांच्या मागे त्यांची तीन वर्षांची मुलगी, पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.
5. हाथरस प्रकरण : मेधा पाटकरांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी हाथरसमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतली.
या भेटीनंतर मेधा पाटकरांनी योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत. या मुलीच्या कुटुंबाला अद्याप शव-विच्छेदन अहवाल का देण्यात आलेला नाही, तिला AIIMS मध्ये दाखल करण्याऐवजी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये का दाखल करण्यात आलं, असा सवाल पाटकर यांनी केलाय.
महाराष्ट्र टाईम्सने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वैद्यकीय तपासणी, जिल्हा प्रशासनाची कारवाई यावरही मेधा पाटकर यांनी टीका केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)