You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई पाऊस: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पाऊस, वादळी वाऱ्याचा इशारा
मुंबई शहरासह उपनगरांमध्येही पावसाची संततधार सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढलाय. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. साचलेलं पाणी ओसरलं असून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाल्याचं मुंबई महानगर पालिकेनं म्हटलं आहे.
मुंबईत पुढच्या 3 तासात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील, असंही सांगण्यात आलं आहे. कमी अधिक प्रवासात आज दिवसभरही पाऊस कायम असणार आहे. मुसळधार पावसाने काल मुंबई आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. रात्रभरही पावसाची रिपरिप सुरूच होती.
पालघर, कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. कोकण आणि गोव्यातही आज मुसळधार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केली पंतप्रधानांशी चर्चा
मुंबई आणि परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
मुंबई आणि परिसरात कोसळणाऱ्या पावसाचा त्यांनी आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी मदत करू, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलं. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. मुंबईसाठी देऊ केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत.
लोकलमधून 290 प्रवासी बाहेर काढले
मुंबईत मशीद आणि भायखळा या लोकल स्टेशन्सदरम्यान अडकलेल्या 2 लोकल्समधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या दोन्ही लोकलमध्ये तब्बल 290 प्रवासी अडकले होते. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने काल मश्जिद आणि भायखळा दरम्यान रेल्वेट्रॅकवर पाणी साचलं होतं.त्यामुळे सीएसटीहून कर्जतकडे जाणारी आणि टिटवाळ्याहून सीएसटीकडे येणारी अशा दोन लोकल या स्टेशन्सदरम्यान अडकून पडल्या होत्या.
कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमध्ये 251 तर सीएसटीएमकडे जाणाऱ्या लोकलमध्ये 39 प्रवासी अडकले होते. रेल्वे सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) जवानांनी या सर्व प्रवाशांना सुखरूप काढलं. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी सध्या मुंबईत लोकल सुरू आहेत. दरम्यान, कालच्या पावसामुळे भायखळा स्टेशनबाहेरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.
मुंबई आणि परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव रात्री 11 वाजत भरून वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन सर्वात लहान तलावांपैकी हा एक तलाव आहे. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी हा तलाव भरला होता.
मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये काल पावसाचं पाणी साजलं होतं. मात्र, हे पाणी काढण्यात आलं असून आता जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाणी साचलं नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक थांबवली
मुंबई-गोवा महामार्गावरची जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तर लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे-निजामपूर-बोरवाडी-डालघर या मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र, ही वाहतूक केवळ दिवसावेळी सुरू आसेल.
माणगाव तालुक्यात घोडनदीवरच्या कळमजे पुलावरून पाणी वाहत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी धोक्याच्या पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त होतेय. त्यामुळे पंचगंगा नदी किनारी राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पंचगंगा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीकडे जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून किनाऱ्यावरील नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आलं आहे.
पंचगंगेचे पाणी 41 फुटांवर
पंचगंगेच्या पाण्याने 41 फुटांची पातळी गाठली आहे. राधानगरी धरणाचे दरवाजेसुद्धा कुठल्याही क्षणी उघडले जाण्याची शक्यता आहे. जिलह्यातले एकूण 102 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सांगलीमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. इथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 20 फुटांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा या नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे.
सततच्या पावसाने ठाणे, पालघर आणि मुंबईतला काही भाग पाण्याने व्यापला गेला आहे.
गेल्या सुरू असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
घरातच राहण्याचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सर्व नागरिकांना घरातच राहाण्याचं आवाहन केलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही ट्वीट करून मुंबईकरांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
"पावसामुळे जेएनपीटी बंदरावरील ३ क्रेन कोसळल्या आहेत. यात कोणालाही इजा झालेली नाही. तसंच वाऱ्यामुळे डी. वाय. पाटील स्टेडियमवरील पत्रे कोसळले आहेत," अशी माहिती नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी बीबीसीला दिली आहे.
जेजे रुग्णालयात पाणी
पावसामुळे मुंबईतल्या प्रसिद्ध सर जेजे रुग्णालयाच्या मेन पोर्चमध्येसुद्धा पाणी भरलं आहे.
मुंबई महापालिकेचे अधिकारी पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे.
कोल्हापुरात पंचगंगेला पूर
कोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर आल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने दवंडी पिटत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रयाग चिखली, आंबेवाडी, टाकवडे ,करवीर या गावातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या 24 तासात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
"मंगळवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांची गती वाढली आहे. म्हणूनच येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे," अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक कृष्णकांत होसाळीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान पावसामुळे मुंबईतली अंशतः सुरू असलेली रेल्वे वाहतूक काही स्थानकांदरम्यान बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक हर्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान सध्या बंद करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाल्याचं दिसून येतंय.
मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये कालपासून पाऊस चालूच आहे. शहराच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत.
नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
कोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कालपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शहरांत घुसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोकणात 7 ऑगस्टपर्यंत तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 6 ऑगस्टपर्यंत तर विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. 33 फुटांपर्यंत हे पाणी पोहोचलं असून इशारा पातळीपर्यंत म्हणजेच 29 फुटांपर्यंत हे पाणी येण्याची शक्यता आहे.
सध्या, कोल्हापूर शहरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
अजूनही पाऊस सुरूच राहिला तर गेल्यावर्षी सारखी परिस्थिती होईल. काही ठिकाणचे रस्ते एव्हाना पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 86 बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत.
कोयना धरणात फक्त 24 तासांत 6 TMC ने धरण भरेल इतका पाऊस झाला आहे. येत्या 7 तारखेपर्यंत अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरीत मुसळधार पाऊस
जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसमुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली आहे.
खेड मधील जगबुडी नदीही इशारा पातळीच्या वर वाहत आहे. येथे इशारा पातळी 6 मीटर असून धोक्याची पातळी 7 मीटर आहे. सध्या प्रवाह 6.75 मीटरवर आहे.
नगरपालिका प्रशासनाने पाचवेळा भोंगा वाजवून खेड शहरात हाय अलर्ट जाहीर केला आहे. बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सुशांत सिंह प्रकरणाची सुनावणी लांबणीवर
काल (मंगळवार) सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर हायकोर्टावर सुनावणी होणार होती पण पावसामुळे मुंबई हायकोर्टाने काम तहकूब केलं होतं.
मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई तसंच उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
समुद्रात दुपारी 12.47 वाजता भरती येणार आहे. यावेळी 4.45 मीटर लांबीच्या लाटा उसळू शकतात. समुद्रकिनारे तसंच पाणी भरणाऱ्या ठिकाणांपासून लांब राहण्याची सूचना बृहन्मुंबई महानगर पालिकेनं केली आहे.
मुंबईत आतापर्यंत 230 मीमी पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. गेल्या दहा तासांपासून मुंबईत पाऊस सुरू आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
रात्रभर सातत्याने पाऊस पडल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे काही बसेचचा मार्ग बदलण्यात आला आहे तर काही रद्द करण्यात आल्या आहेत असं बेस्ट प्रशासनाने सूचित केलं आहे.
हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलोनी येथे पाणी साचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सायन, कुर्ला, दादर, प्रतीक्षा नगर, किंग्ज सर्कल या भागात पाणी साठल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याचं बृहन्मुंबई महानगर पालिकेनं म्हटलं आहे.
अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसमोर अडचणी
रेल्वे रुळावर पावसाचे पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते चर्चगेट दरम्यान लोकल सेवा बंद झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरही लोकल वाहतूक मंदगतीने सुरू आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. पावसामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागू शकतं.
संततधार पावसामुळे कांदिवलीतील घरांमध्ये पाणी शिरले
गेल्या 10 तासांपासून पाऊस सुरू असल्यामुळे कांदिवलीमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
मुंबईतील सांताक्रूझ भागात पाणी साचले आहे. पावसामुळे हायकोर्टाची कामं तहकूब करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)