मध्य प्रदेशात दलित शेतकरी जोडप्यानं विष घेईपर्यंत पोलिसांनी त्यांना का मारलं?

फोटो स्रोत, UGC
- Author, शुरैह नियाजी
- Role, भोपाळहून बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मध्य प्रदेशातल्या गुनामध्ये पोलिसांनी एका शेतकरी दलित जोडप्याला अमानुष मारहाण केली. या जोडप्याची शेती ज्या जमिनीवर होती, ती सरकारी जमीन होती आणि त्यांना इथून हटवण्यासाठी मारहाण करण्यात आल्यानंतर या जोडप्याने विष घेत जीव देण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या जोडप्यातल्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
मंगळवारी झालेल्या या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या जोडप्याची सात मुलं या संपूर्ण प्रसंगादरम्यान रडताना आणि किंचाळताना व्हीडिओत दिसतात. पण प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची दया आली नाही. मुलांचा आक्रोश सुरू असूनही पोलीस या जोडप्याला अमानुष मारहाण करत राहिले.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी रात्री उशीरा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून बडतर्फ केलं. जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन आणि एस.पी. तरूण नायक यांना पदावरून हटवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याची घोषणाही केली.
हे प्रकरण गुना शहरातल्या कँट पोलिस स्टेशनच्या हद्दीतलं आहे. शहराच्या उप-विभागीय मॅजिस्ट्रेटच्या नेतृत्त्वाखालची एक टीम अतिक्रमण हटवण्यासाठी इथे गेली होती.
ज्या जमिनीवरून वाद झाला त्यावर राजकुमार अहिरवार यांची शेती होती. पोलिसांच्या पथकाने जेसीबीने ही शेती हटवायला सुरुवात केली.
मध्य प्रदेश सरकारवर टीका
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेनंतर शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय, "हे शिवराज सरकार मध्य प्रदेशाला कुठे घेऊन जातंय? हे जंगलराज आहे का? गुनामध्ये कँट ठाण्याच्या हद्दीत दलित जोडप्यावर मोठ्या संख्येतल्या पोलिसांनी अमानुष लाठीमार केला."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते पुढे लिहितात, "जर या पीडित तरुणाच्या जमिनीविषयी एखादा शासकीय वाद असेल तर तो कायदेशीर रीतीने सोडवता येऊ शकतो. पण अशाप्रकारे कायदा हातात घेऊन त्याला, त्याच्या पत्नीला, आप्तांना आणि अगदी लहान मुलांनाही अमानुष मारहाण करणं, हा कोणता न्याय? हे सगळे दलित कुटुंबातले आहेत, गरीब शेतकरी आहेत म्हणून असं करण्यात आलं का?"
"अशी घटना सहन करणं शक्य नाही. यासाठी दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, नाहीतर काँग्रेस गप्प राहणार नाही."
या घटनेचा व्हीडिओ ट्वीट करत काँग्रेस नेते राहुल गांधींनी लिहीलंय, "आमची लढाई याच विचारसरणी आणि अन्यायाच्या विरुद्ध आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
तर बसपाच्या प्रमुख मायावतींनी सोशल मीडियावर लिहीलंय, "एकीकडे भाजप आणि त्याचं सरकार दलितांचं पुनर्वसन करण्याचं सांगते आणि दुसरीकडे दलितांना रस्त्यावर आणणाऱ्या घटना अगदी सर्रास घडत आहेत, अगदी तशाच जशा पूर्वी काँग्रेसच्या शासन काळात घडत होत्या. मग दोन्ही सरकारांमध्ये फरक काय? दलितांनीही विशेषतः याविषयी विचार करायला हवा."
काय आहे हे प्रकरण?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन आधीच आदर्श महाविद्यालयासाठी ताब्यात घेण्यात आली होती. तर या जमीनीवर एका माजी खासदाराचा ताबा असून त्यांनी ही जमीन राजकुमार अहिरवार यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कसायला दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
या जमिनीवर पेरणी करण्यासाठी राजकुमार यांनी सुमारे 2 लाख रुपये कर्जाने घेतल्याचंही स्थानिक सांगतात. या जमिनीवर उगवणारं पीक, हेच या कुटुंबाच्या जगण्याचा आधार होतं.
या नवरा-बायकोने विषप्राशन केल्यानंतरही पोलीस - प्रशासन भानावर आलं नाही. उलट या जोडप्याची मुलंच त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होती. राजकुमार यांचा भाऊ घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस पथकाने त्यालाही मारहाण केली.

फोटो स्रोत, Thinkstock
राजकुमार आणि त्यांची पत्नी सावित्री यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या इतर अनेक जणांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर सुरुवातीला या कुटुंबातल्या लोकांनीच महिला पोलिसांशी गैरवर्तन केलं आणि त्यानंतर त्यांना काहीशी कठोर वागणूक देण्यात आल्याचा आरोप घटनास्थळी गेलेले तहसीलदार निर्मल राठोड यांनी केलाय.
दिवसभर ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ शेअर करण्यात येत होता. यानंतर लोकांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























