तृणमूलचे बंडखोर खासदार ज्या 'नॅशनॅलिस्ट सिटिझन पार्टी'त विलीन झाले, त्या पक्षाबद्दल जाणून घ्या

काकोली घोष दस्तीदार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, काकोली घोष दस्तीदार (उजवीकडून दुसऱ्या ) आणि त्यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातील खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीनीकरणावर चर्चा केली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे लोकसभा खासदारांमध्ये पडलेल्या फुटीच्या संदर्भातल्या बातम्या सध्या सर्वाधिक चर्चेमध्ये आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत पक्षाचे 20 खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्यांच्या गटाच्या खासदारांना सभागृहात स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था असावी अशी मागणी केली आहे.

रविवारी (14 जून) दिल्लीत पोहोचल्यानंतर तृणमूलचे काही खासदार काकोली घोष आणि शताब्दी रॉय यांच्यासह लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटले. त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा असल्याचा दावा करणारे पक्षाचे खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनीही ओम बिर्ला यांच्या घरी जाऊन त्यांना एक पत्र सादर केलं. पक्षातील फूट संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नाही, असं कीर्ती आझाद यांनी म्हटलं आहे.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनीही ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. सभागृहात केवळ तृणमूल काँग्रेसलाच पक्ष समजावं आणि इतर कोणत्याही गटाला मान्यता दिली जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

काकोली घोष

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर काकोली घोष यांनी त्यांच्या गटासोबत पक्षाचे दोन तृतीयांश खासदार असल्याचं सांगितलं आहे.

लोकसभेत टीएमसीचे 28 खासदार आहेत. पक्षाच्या 13 राज्यसभा खासदारांपैकी चौघांनी राजीनामा देऊन पक्ष सोडला आहे.

"आम्ही अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे (एआयटीसी) निवडून आलेले खासदार होतो. आम्ही एआयटीसीबद्दलची आमची नाराजी लोकसभा अध्यक्षांना सांगितली," असं काकोली घोष दस्तीदार यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

ग्राफिक्स

'नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी' कोणता पक्ष आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी हा त्रिपुरामधील एक नोंदणीकृत, परंतु मान्यता नसलेला राजकीय पक्ष आहे.

नॅशनलिस्ट सिटिझन पार्टीबद्दल बोलताना काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या की, "आम्ही संसदेत स्वतंत्रपणे बसण्याची मागणी केली आहे. तसंच नॅशनलिस्ट सिटिझन पार्टीमध्ये विलिन होत असल्याचंही सांगितलं आहे. आमच्यासोबत 20 खासदार आहेत. ते तृणमूल काँग्रेसच्या 28 खासदारांपैकी दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहेत. आम्ही एआयटीसीमधून बाहेर पडून एनडीएसोबत काम करू," असंही काकोली म्हणाल्या.

तसंच, तृणमूलचे बंडखोर खासदार सुदीप बंडोपाध्याय म्हणाले, "आम्ही नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीन झालो आहोत. हा एक राजकीय पक्ष असून मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे. खरी तृणमूल काँग्रेस कोणती, याचा निर्णय न्यायालयात होईल."

तर, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष हे अद्याप ममता बॅनर्जी यांच्यासोबतच आहेत.

कुणाल घोष म्हणाले, "ते कोणत्या पक्षात जात आहेत किंवा कोणाशी हातमिळवणी करत आहेत, हे आम्हाला माहीत नाही. पण इथले हे सर्वजण ममतादीदींचे उमेदवार होते आणि भाजपविरोधी मतांवर निवडून आले होते. दिल्लीत संसदेत पाठवणाऱ्या मतदारांनी त्यांना भाजपच्या विरोधात मतदान केले होते. म्हणूनच, जर ते आता भाजपच्या गोटात सामील होत असतील, तर तो पूर्णपणे विश्वासघात ठरेल. याचा ममतादीदी किंवा तृणमूल काँग्रेसशी काहीही संबंध नाही. हा प्रत्येक मतदाराशी केलेला विश्वासघात आहे."

कीर्ती आझाद यांनी बंडखोर खासदारांविषयी काय म्हटले?

दुसरीकडे, टीएमसीचे खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनीही ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.

कीर्ती आझाद म्हणाले की, "आम्ही ओम बिर्लांना पत्र दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आणि 10 व्या अनुसूचीच्या कलम 4 नुसार, पक्षात स्वतंत्र गट किंवा फुटीसाठी कोणतीही तरतूद नाही. असं पाऊल घटनाबाह्य आहे."

तर सागरिका घोष म्हणाल्या की, "ममता बॅनर्जी आणि पक्षाच्या चिन्हाच्या जोरावर निवडणुका जिंकणारे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते पराभवानंतर पक्ष सोडून जात आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमची तत्त्वं विचारसरणी कुठे आहे?"

कीर्ति आज़ाद

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी असलेले कीर्ती आझाद यांनी बंडखोर संविधानाच्या विरोधी काम करत असल्याचं म्हटलं आहे.

"संपूर्ण निवडणूक प्रचारात तुम्ही भाजपवर टीका केली आणि आता सत्तेसाठी त्यांच्याच मागे लागला आहात. भाजपने पैसा आणि बळ वापरून राजकीय पक्ष फोडले आहेत, पण खरी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे अनेक लोकप्रतिनिधींसह टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये सामील होण्यासाठी आपल्या मूल्यांशी तडजोड केली. जनता हे सर्व पाहत आहे. ते सर्व काही लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर प्रत्युत्तर देतील," असंही त्यांनी म्हटलं.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील गटाला वेगळे बसू देऊ नये, तर त्यांना सभागृहात एकच राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी असं म्हटलं आहे.

"तृणमूल काँग्रेसकडे सध्या सर्व कायदेशीर अधिकार आहेत. संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) योग्य ती कारवाई करण्याच्या अधिकाराचा समावेश त्यात आहे. कोणत्याही खासदाराचं वर्तन या तरतुदींचं उल्लंघन करणारं आढळलं, तर पक्ष त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू शकतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसमधील फुटीची मालिका

तृणमूल काँग्रेसच्या 80 आमदारांपैकी 60 आमदार आधीच ऋतब्रता बॅनर्जी यांच्यासोबत गेले आहेत. हा गट ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना विरोध करत आहे.

पक्षाच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी 28 पैकी 20 खासदार त्यांच्यासोबत आहेत, असा दावा केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षे जुन्या डाव्या आघाडी सरकारला सत्तेवरून हटवून सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडे 15 वर्षे राज्याची सत्ता होती.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे.

ऋतब्रत बनर्जी

फोटो स्रोत, Samir Jana/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, तृणमूलच्या 80 आमदारांपैकी 60 आधीच ऋतब्रत बॅनर्जी यांच्याबरोबर गेले आहेत.

पक्षाचे नेते एका पाठोपाठ पक्ष सोडत आहेत. आधी ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांनी विधानसभेत बंड केलं. त्यानंतर राष्ट्रीय नेत्यांच्या राजीनाम्यांची मालिका सुरू झाली.

कोलकाताचे महापौर आणि ममता बॅनर्जी यांचे आणखी एक जवळचे विश्वासू फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वैयक्तिकरित्या आपला राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला.

पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून राज्यसभा सदस्यत्वही सोडलं आहे. सुष्मिता देव यांच्यापूर्वी टीएमसीचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर राय यांनीही राज्यसभेचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पक्षात झालेल्या मोठ्या बंडानंतर, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे हा पक्ष त्यांचे निवडणूक चिन्ह वाचवू शकेल का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)