भारत-चीन सीमावादः परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिले राहुल गांधींना उत्तर

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

गलवान खोऱ्यामध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांकडे शस्त्रं होती परंतु जुन्या एका करारानुसार त्यांनी त्यांचा वापर केला नाही. शस्त्राविना भारतीय जवानांना चीनसमोर कसं पाठवलं होतं असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता.

त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करुन उत्तर दिले आहे. सीमेवर सर्व जवानांकडे शस्रं असतात. 15 जून रोजी गलवानमध्ये तैनात असणाऱ्या जवानांकडेही हत्यारं होती. मात्र 1996-2005 या काळातील करारानुसार अशा प्रसंगी बंदुकांचा वापर होत नाही.

15 आणि 16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात 20 भारतीय जवान मृत्युमुखी पडले. राहुल गांधी यांनी त्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. जयशंकर यांनी त्याला उत्तर दिले असले तरी त्यावर लोक संतुष्ट नसल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर लोक त्या उत्तरावर प्रतिक्रिया देत आहेत.

राहुल पंडिता यांनी, "या जवानांकडे जर शस्त्रं होती. तसेच कराराचं कारणही मी समजू शकतो. पण शस्त्रं असून त्याचा वापर करु शकत नाही याला काय अर्थ आहे. कमांडिंग ऑफिसरला काटेरी तारांनी मारलं जात असताना ती न वापरण्यात काय अर्थ आहे." असं ट्वीट केलं आहे.

पत्रकार आशुतोष यांनीही जयशंकर यांच्यावर टीका केली आहे. परराष्ट्रमंत्र्यांचे ट्वीट जितकी माहिती देतात त्याहून जास्त माहिती लपवतात. स्वरक्षणासाठी जवानांनी शस्त्रं का वापरली नाहीत याचं उत्तर मंत्र्यांनी द्यावं असं मत त्यांनी ट्वीटमध्ये व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)