You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पालघर साधू हत्या प्रकरणातील 11 आरोपींना कोरोनाची लागण #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. पालघर प्रकरणातील 11 आरोपींना कोरोनाचा संसर्ग
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील अकरा आरोपींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागल्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनासमोरचं आव्हान वाढलं आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
वाडा पोलीस ठाण्याच्या कैदेत असलेल्या 17 आरोपींपैकी 11 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सहा जणांचे अहवाल येणं बाकी आहे. न्यायालयाच्या परवानगीने त्यांना क्वारंटीन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यानंतर पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून, या आरोपींच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाकडून चाचणी घेण्यात येणार आहे. वाडा पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालय दोन दिवसांसाठी सील करण्यात येणार असल्याची माहिती वाडाचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लॉकडाऊन – 5 : महाराष्ट्र अनलॉक होतोय, जून महिन्यात काय सुरू काय बंद?
- वाचा - मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा -लॉकडाऊन – 5 : महाराष्ट्र अनलॉक होतोय, जून महिन्यात काय सुरू काय बंद?
- वाचा - महाराष्ट्र लॉकडाऊन : गावी जायला ई-पास कसा मिळवायचा?
- वाचा - दहावी,बारावीचा निकाल कधी लागणार?
2. कोरोनाच्या प्रसाराला मोदी कारणीभूत - आंबेडकर
देशात कोरोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
देशात योग्यवेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांना चाचणी करून प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला नसता. त्यामुळे देशात कोरोना संसर्गाकरता मोदीच जबाबदार आहेत असा आरोप आंबेडकर यांनी केला. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
"लॉकडाऊनमुळे पंधरा कोटी लोकांचे हाल झाले. कोरोनाची भीती सरकारने आणली. तुम्ही मरणारच आहे, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात आले. 30 जूनपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच लाखापर्यंत जाईल. रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात जात असताना लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार अनाकलनीय आहे," अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
3. आजच्या घडीला मुंबईत यायची माझी ताकद नाही - गडकरी
सध्याच्या परिस्थितीत मुंबईत यायची माझी ताकद नाही असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ही परिस्थिती नक्कीच बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुस्तान टाईम्सने ही बातमी दिली आहे.
बँकांशी संबंधित प्रश्न, मागणी आणि पुरवठ्यासह रोख रकमेसंदर्भात समस्या आहेत. हातात पैसा उपलब्ध होणं आवश्यक आहे. त्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकत नाही. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून, त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असं त्यांनी सांगितलं.
इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल काउंसिलच्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
4. मी असताना कुणीही आरक्षण हटवू शकत नाही- आठवले
मी असताना कुणीही आरक्षण हटवू शकत नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आरक्षण हटवलं जाणार असल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. देशाच्या संविधानाने दिलेलं आरक्षण मी असताना कोणीही हटवू शकत नाही. आरक्षण कायम सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण हटवलं जाणार असल्याचा खोटा प्रचार सोशल मीडियातून करणारे लोक आरक्षणविरोधी आहेत असं आठवले म्हणाले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
तामिळनाडूतील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
5. हरिभाऊ जावळे यांचं निधन
भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं कोरोनामुळे निधन झालं. उपचारांसाठी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
हरिभाऊ दोनवेळा जळगावमधून खासदार म्हणून निवडून आले होते. दोनवेळा आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. लोकमत न्यूज18ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)