You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबादजवळ 15 स्थलांतरीत कामगारांना मालगाडीनं चिरडल
जालन्यातून भूसावळकडे रेल्वे रुळावरून पायी निघालेल्या 15 कामगारांचा मालगाडीखाली येऊन मृत्यू झाला आहे.
औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या करमाडजवळ शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली.
"हे कामगार जालन्याच्या एसआरजी नावाच्या कंपनीत कामाला होते. भूसावळमधून रेल्वे सोडण्यात येत असल्याचं कळल्यानंतर ते रेल्वे रुळाच्या मार्गे भूसावळकडे जात होते, अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे," असं मोक्षदा पाटील यांनी सांगितलं आहे.
"हे कामगार कंपनीतून निघाले होते की, जालन्यातील निवारागृहातून निघाले होते, याची माहिती आम्ही घेत आहोत. या घटनेत 15 मजूर ठार झाले असून एक जखमी आहे. चार जण या घटनेतून वाचले आहेत," असं त्या पुढे म्हणाल्या
करमाडचे स्थानिक बातमीदार संतोष शेळके यांनी माहिती दिली की, करमाड ते बदनापूर दरम्यान असलेल्या सटाणा रेल्वे स्टेशनच्या शिवारात ही घटना घडली आहे. करमाडच्या पूर्वेला दोन किलोमीटरवर ही घटना घडली आहे. हे कामगार मध्यप्रदेशचे असल्याचे कळतं.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन 21 एप्रिलला पहिल्यांदा आणि 3 मे रोजी दुसऱ्यांदा वाढवण्यात आला.
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसलेले अनेक परप्रांतातील कामगार आपापल्या घरी निघाले आहेत.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करमाडजवळ पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जालन्यातून मध्य प्रदेशमध्ये हे मजूर पायी परतत होते. रेल्वे रुळाच्या बाजूनं चालत असताना थकल्यानं ते सगळेजण रुळावर झोपले होते, असंही टाइम्स ऑफ इंडियान आपल्या वृत्तात म्हटलंय.
रेल्वे मंत्रालयाकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. रेल्वे मंत्रालयानं ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिलीय.
"औरंगाबादमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केलीय. पियुष गोयल या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ती सर्व मदत केली जाईल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून सांगितलं.
मृतांच्या नातेवाईकांना मध्य प्रदेश सरकारनं ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे.
या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयां मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.ट
परराज्यातील कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)