कोरोना व्हायरस : जास्त चाचण्या घेतल्या असत्या, तर तबलीगी प्रकरण वेळेत समोर आलं असतं?

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळपर्यंत देशातील कोव्हिड-19 ग्रस्तांची संख्या 2000 पर्यंत गेली होती. देशातील एकूण रुग्णांपैकी 378 रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमात गेले होते किंवा कार्यक्रमात गेलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले होते.

ही आकडेवारी पाहता भारतातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 20 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित असल्याचं दिसून येतं.

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (1 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना व्हायरसग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्यामागे तबलीगी जमात असल्याचं मंत्रालयाने सांगितलं.

मार्च महिन्यात या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या लोकांची वेगवेगळ्या राज्यांतील संख्या तसंच त्यांची ओळखही अद्याप पटलेली नसताना ही परिस्थिती आहे. अजूनही सुमारे 20 राज्यांतील अशा व्यक्तींचा शोध सुरुच आहे.

अशा स्थितीत तबलीगी प्रकरणामुळे देशातील कोरोना व्हायरसग्रस्तांच्या संख्येचा आलेख वाढणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आलेख

भारतातल्या कोरोना व्हायरसच्या आलेखावर ब्रुकिंग्स इंडिया लक्ष ठेवून आहे.

तबलीगी प्रकरणाने कोरोना व्हायरसविरुद्ध सुरू असलेल्या देशाच्या लढाईला मागे ढकलल्याचं मत ब्रुकिंग्स इंडियाच्या संशोधन संचालिका शमिका रवि यांनी व्यक्त केलं.

ब्रुकिंग्स इंडियाच्या ताज्या संशोधनानुसा

  • भारतात कोरोनाची प्रकरणं 23 मार्चपूर्वी प्रत्येकी तीन दिवसांत दुपटीने वाढत होती.
  • ही वाढ 23 मार्च ते 29 मार्चदरम्यान पाच दिवसांत दुप्पट अशी झाली.
  • तर 29 मार्चनंतर कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या चार दिवसांत दुप्पट अशी वाढली आहे.

शमिका आणि त्यांचे सहकारी मोहित गेल्या काही दिवसांत भारतातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कशी वाढली, याचा अभ्यास करत आहेत.

शमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य होत्या.

संशोधनातील आकडेवारीच्या मागचं कारणही शमिका सांगतात. 23 मार्च ते 29 मार्चदरम्यान कोरोना व्हायरसच्या प्रकरणांचा वेग मंदावला होता. केंद्र आणि राज्य सरकारांनी उचललेल्या पावलांमुळे हे शक्य झाल्याचं शमिका यांनी बीबीसीला सांगितलं.

केंद्र आणि राज्य सरकारने 5 ते 15 मार्चनंतर ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात केली होती.

  • शाळा बंद करणं
  • प्रवासावर निर्बंध
  • संसर्गजन्य रोगांचा कायदा लागू करणं
  • लोकांच्या एकत्रित येण्यावर निर्बंध
  • अंतर ठेवून होळी साजरी करण्याचा सल्ला
  • वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला
  • सोशल डिस्टन्सिंग राखण्याची सूचना

या उपायांचा त्यामध्ये समावेश होता.

या सूचनांचं पालन झाल्यामुळे 23 मार्चनंतर कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग मंदावला होता. त्यावेळी भारत चढता आलेख थांबवण्याच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं शमिका यांनी सांगितलं होतं.

हे सोप्या भाषेत समजावून सांगताना शमिका यांनी सांगितलं, की जर तुम्ही कोरोना व्हायरसला एखाद्या हायवेवर जात असलेला ट्रक मानलं, तर हा ट्रक पूर्वी 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने तुमच्या दिशेने येत होता. 23 मार्च ते 29 मार्चदरम्यान हा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका झाला होता.

म्हणजेच कोरोना व्हायरसचा ट्रक थांबलेला नाही. तो तयारीला वेळ देत होता.

पण तीन दिवसांपूर्वीच्या या प्रकरणामुळे कोरोना व्हायरसच्या ट्रकचा वेग 70 किलोमीटर प्रतितास झाला आहे.

पुढे हा वेग किती वाढेल, हे येणारा काळच सांगू शकतो.

निझामुद्दीन प्रकरण आणि सुपरस्प्रेडिंग

सरकारकडून जी काही पावलं उचलली जातात, त्याचा परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी 10 दिवसांचा कालावधी लागतो.

निझामुद्दीन मरकज प्रकरणाचा परिणाम आता समोर येत आहे.

राज्य सरकारांनी लोकांचा शोध घेण्यात लक्ष केंद्रीत केलं आहे. आरोग्य विभाग गृह विभागासोबत मिळून तबलीगी जमातशी संबंधित परदेशी कार्यकर्त्यांचा शोध घेत आहे. यातील अनेकांची ओळख पटली आहे.

सरकारने त्यांना घरांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केलं आहे.

आतापर्यंत मरकजमध्ये सहभागी लोकांची संख्या 3 ते 4 हजार इतकी सांगण्यात येत होती.

पण हे लोक पुढे किती जणांच्या संपर्कात आले, त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शमिका याची व्याख्या 'सुपर स्प्रेडिंग' शब्दाने करतात. त्या सांगतात, की आता फक्त तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात याची आकडेवारी समोर येईल.

लॉकडाऊनचा परिणाम

भारताच्या कोरोना व्हायरसच्या आलेखामुळे शमिका खूपच निराश नाहीत.

त्यांच्या मते कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे. अजूनही ती वाढेल. पण लॉकडाऊनमुळे याचा परिणाम कमी होऊ शकतो.

भारतात लॉकडाऊन 24 आणि 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून सुरू झाला होता. याचा परिणाम 5 एप्रिलनंतर पाहायला मिळेल.

भारताने ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन केलं तसं जगातील कोणत्याच देशात झालं नाही.

त्यामुळे लोकांनी योग्य प्रकारे याचं पालन केलं तर कोरोना व्हायरसरुपी ट्रकचा वेग पुन्हा मंदावेल, असा विश्वास शमिका यांना आहे.

चाचणी घेण्याच्या पद्धतीत बदल

कोरोना व्हायरसा चढता आलेख पाहता लॉकडाऊन वाढवणं हा पर्याय असू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर शमिका यांनी दिलं.

त्या म्हणाल्या, "याबाबत काहीही सांगणं सध्यातरी घाईचं ठरेल. कमीत कमी 10 दिवस वाट पाहा. सुरुवातीला आपल्याला लॉकडाऊनचे परिणाम मिळायला हवेत."

केंद्र सरकारने लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

पण शमिका याबाबत आणखी काही गोष्टी स्पष्ट करतात.

त्यांच्या मते, आपण सध्या घेत असलेल्या चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात यावी.

बुधवारपर्यंत देशात सुमारे 47 हजार जणांची चाचणी घेण्यात आली आहे. ही भारताच्या चाचणी घेण्याच्या क्षमतेच्या केवळ 38 टक्के इतकी आहे.

टेस्टिंगची संख्या

बीबीसीशी बोलताना शमिका यांनी सांगितलं, की सुरुवातीलाच आपण जास्त चाचण्या घेतल्या असत्या तर निझामुद्दीन प्रकरण आधीच समोर आलं असतं. लोकांना त्याची लक्षणं दिसली तेव्हा आपल्याला ते सापडलं.

तेलंगणामध्ये पहिला मृत्यू झाल्यानंतरच जर चाचण्या झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. आता आपण लोकांच्या शोधात आहोत. लोक घाबरलेले आहेत. समाजाकडून त्यांना कशी वागणूक मिळेल, यामुळे ते भयभीत आहेत.

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आपण चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, असं त्या सांगतात.

कोरोना व्हायरसचा प्रसार थोपवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)