You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जंतर-मंतरचे आंदोलन ते मोदींच्या घराबाहेरील ठिय्या, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; 10 फोटोंतून पाहा दिल्लीत नक्की काय घडतंय
दिल्लीत आज (21 जुलै) सकाळपासूनच बऱ्याच घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत.
एकीकडे 20 जुलैच्या संसद मार्चमधील धुमश्चक्रीनंतरही जंतर-मंतरवर पुन्हा मोठ्या संख्येनं आंदोलक जमले आहेत.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.
कॉक्रोच जनता पार्टी'च्या समर्थकांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला ठिकठिकाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले.
सोमवारी (20 जुलै) दिवसभर चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून कारवाई केल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांकडून जंतरमंतर येथील आंदोलनस्थळाची नासधूसही करण्यात आली होती.
राहुल गांधी यांनी फेसबुकवर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या धरणे आंदोलनात सामील होण्याचं आवाहन लोकांना केलं होतं. त्यांनी आपले हातदेखील बांधून घेतले होते.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीनं महत्त्वाची घोषणा केली आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रांका आणि समर्थक दीपक बलिया रात्री 8 वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.
त्यांनी म्हटलं, "दिल्ली पोलिसांनी अत्यंत हिंसक आणि जीवघेणा ठरू शकेल अशा बळाचा वापर करून शेकडो शांततापूर्ण निदर्शकांना ताब्यात घेतले आहे. आता ते वकिलांना त्यांना भेटू देत नाहीत आणि ताब्यात घेतलेल्यांची संपूर्ण यादीही आम्हाला देत नाहीत."
"जर 8 वाजण्याच्या आधी ताब्यात घेतलेल्यांच्या या घटनात्मक अधिकाराचं पालन करण्यात आलं नाही, तर आशुतोष रांका आणि दीपक बलिया आणि मी आज (21 जुलै) रात्री 8 वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण धरणे आंदोलन करू!"
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर दिलेल्या ठिय्या आंदोलनात गोंधळ पहायला मिळाला.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या धुमश्चक्रीदरम्यान त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं छायाचित्रातून दिसून येत आहे.
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी जंतर-मंतर याठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेतली.
अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाठिंबा दिल्याचं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीच्या रस्त्यांवर 20 जुलैला झालेला प्रकार हुकूमशाहीलाही लाजवणारा होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह तरुणांचं हे आंदोलन चिरडून टाकू शकणार नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.
मंगळवारी (21 जुलै) कॉक्रोच जनता पार्टीनं एक महत्त्वाची घोषणा करत प्रवक्ते विजेता दहियाला प्रवक्ते पदावरून हटवलं आहे.
सीजेपीने आपल्या निवेदनात म्हटलं, "आमचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्या अत्यंत असंवेदनशील वर्तनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. शांततापूर्ण निदर्शक आणि आमची टीम पोलिसांच्या क्रूर हिंसाचाराचा सामना करत असताना त्यांचे व्हीडिओ समोर आले."
"असे वर्तन अस्वीकार्य आहे. त्यातून योग्य-अयोग्यतेची समज नसल्याचे दिसून येते आणि ते आमच्या चळवळीची मूल्ये व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे."
"या पार्श्वभूमीवर, आम्ही विजेता दहिया यांना 'कॉकरोच जनता पार्टी'च्या प्रवक्तेपदावरून दूर करत आहोत आणि त्यांना सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांतून मुक्त करत आहोत," असंही सांगण्यात आलं.
नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आरएमएल (RML) रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेतली.
सीजेपीच्या निषेध मोर्चादरम्यान पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आंदोलकांनी दिल्लीतील काही भिंतींवर सरकारविरोधातील घोषणा रंगवल्या आहेत. आंदोलक अद्यापही दिल्लीत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)