सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष ते थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष; हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत? त्यांचीच नियुक्ती का झाली?

फोटो स्रोत, facebook/HarshvardhanSapkal
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर सपकाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.
नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कोल्हापूरचे सतेज पाटील, सांगलीचे विश्वजित कदम, लातूरचे अमित देशमुख आणि इतरही नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होते, पण आता अखेर सपकाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कारण, राज्याच्या राजकारणात चर्चेत नसलेल्या आणि कधीही कुणीही विचार न केलेल्या या काँग्रेस नेत्याची थेट राज्यातील पक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक पत्रक काढून हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याची माहिती दिली. यामध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभारही मानण्यात आले आहेत.
याशिवाय महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा देखील करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. मात्र, विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षाला उभारी देण्याच्या दृष्टीकोनातून काँग्रेसनं अखेर नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे.

फोटो स्रोत, https://x.com/INCIndia
काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा राजीनामा दिला होता.
दरम्यान, राज्यातील नेत्यांनी पटोले यांच्या एककल्ली कारभारामुळे पक्षाचं मोठं नुकसान झाल्याच्या तक्रारीदेखील काँग्रेस हायकमांडकडे केल्या होत्या.
त्यामुळे नाना पटोले यांना हटवलं जाणार, हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, त्यांच्या बदल्यात नियुक्ती कुणाची होणार, याबाबत बरेच दिवस तर्कवितर्क बांधले जात होते.

फोटो स्रोत, facebook/HarshvardhanSapkal
यामध्ये गेले काही दिवस पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अॅड. यशोमती ठाकूर, नितीन राऊत, विश्वजीत कदम, अमित देशमुख, सतेज पाटील अशा अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती.
मात्र, पक्ष श्रेष्ठींनी या चर्चेतल्या नावांपैकी कुणालाही संधी न देता, एका नव्याच चेहऱ्याला संधी देणं पसंत केल्याचं दिसून येतंय.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय तरुण वयात काँग्रेसच्या राजकारणाला सुरुवात केली होती. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केली आहे. शेती करत करत ते गेले अनेक वर्ष समाजकारण करत आहेत. ते काँग्रेसचे सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून प्रामुख्याने ओळखले जातात.
कॉलेजमध्ये असताना ते काँग्रेसच्या युवा संघटनेत सक्रिय होते. कबड्डी हा त्यांचा आवडीचा खेळ होता. त्यामुळे ते आपल्या तरुण वयात मैदानावरच असायचे.
याच काळात त्यांच्यावर समाजवादी विचारांचाही प्रभाव पडला होता. त्यांनी काही काळ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीसाठीही काम केलं आहे.

फोटो स्रोत, facebook/HarshvardhanSapkal
समकालीन प्रकाशनाच्या 'खरेखुरे आयडॉल्स' या पुस्तकात हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी नरेंद्र लांजेवर यांनी एक लेख लिहिला आहे.
यात म्हटलं आहे, "सामाजिक कृतज्ञता निधीला फंड गोळा करून देण्यासाठी सपकाळ डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे डॅडी देशमुख यांच्यासोबत 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाच्या प्रयोगांसाठी बुलडाणा, अकोला, अमरावतीच्या परिसरात फिरले."
"त्यामुळे कॉलेजचं शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना बाहेरचं जग दिसू लागलं. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत त्यांची ऊठबस सुरू झाली."
सपकाळ 1999 ते 2002 याकाळात बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. कमी वयातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्याकाळी ख्याती मिळवली होती. 2014 ते 2019 याकाळात ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत.
'खरेखुरे आयडॉल्स' या पुस्तकात त्यांच्याविषयी लिहिलं आहे की, "2014 च्या मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि चौरंगी लढत असतानाही हा 'भला माणूस' बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आला."

फोटो स्रोत, Facebook/Harshwardhan Sapkal
"भल्या भल्या मातब्बर उमेदवारांवर मात करत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पक्षालाच विश्वास नसलेली सीट अलगद निवडून आणली. सपकाळ यांची स्वच्छ प्रतिमा, रोखठोक कार्यशैली, विकासात्मक राजकारण, जातिधर्मांच्या पल्याड जाऊन सातत्याने घेतलेली सच्ची धर्मनिरपेक्षतेची भूमिका आणि ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतच्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव यामुळेच त्यांचा विजय पक्का झाला," असंही त्यामध्ये म्हटलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या आतापर्यंतच्या सामाजिक-राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत.
यामध्ये गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण करणे, सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे आयोजित करणे, ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान देणे, जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी करणे तसेच आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण करणे अशा काही महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश होतो.
काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी?
सपकाळ यांचा जन्म बुलडाणा शहरात 31 ऑगस्ट 1968 रोजी झाला. त्यांचे वडील वसंतराव सपकाळ हे ग्रामविकास विभागामध्ये, तर आई भानुमती सपकाळ या महिला व बालकल्याण विभागात पदाधिकारी होत्या.
घरात दोन बहिणींसोबत ते वाढले. घरचे लोक त्यांना लाडाने 'बंटी' असं म्हणतात. सपकाळ यांचं घरातलं 'बंटी' हेच नाव कॉलेजपर्यंत मित्रपरिवारात रूढ झालेलं आहे.
बुलढाण्याच्या जिजामाता महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. खेळ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पत्नी मृणालिनी आणि डॉ. गार्गी व यशोवर्धन या दोन मुलांचा समावेश आहे.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी?
कॉलेजमध्ये ते युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते. कॉलेज संपल्यावरही त्यांचा संघटनेशी आणि पक्षाशी जवळून संबंध होता. त्यातल्या त्यात खासदार मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचं घनिष्ठ नातं तयार झालं होतं. बुलढाणा हा मुकुल वासनिक यांचा खासदारकीचा बालेकिल्ला होता.
वासनिक यांच्या आग्रहापोटी सपकाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले, असं सांगितलं जातं.
या पहिल्याच निवडणुकीत ते निवडून आले. अवघ्या 28 व्या वर्षी म्हणजे 1996 मध्ये ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला.

फोटो स्रोत, Facebook/Harshwardhan Sapkal
त्यांची आई महिला काँग्रेसची सदस्य होती, पण ते वगळता काँग्रेसच्या राजकारणाशी कुटुंबाचा फारसा संबंध नव्हता. पण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सपकाळ यांना राजकारणाची गोडी लागली.
हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचे आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचीच नियुक्ती का?
हर्षवर्धन सपकाळ हे कमी चर्चेतलं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी का पुढे करण्यात आलं, असा साहजिक प्रश्न सध्या विचारला जात आहे.
भाजपकडूनही काँग्रेसने केलेल्या या नियुक्तीवर बोचरी टीका केली गेली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीवर म्हटलं, "मला एका काँग्रेस नेत्यांनी सांगितलं की, प्रदेशाध्यक्ष पद घेण्यासाठी काँग्रेसमधील एकही ज्येष्ठ नेता तयार नव्हता. त्यामुळे, कुणाला तरी बळीचा बकरा बनवण्यासाठी ही नियुक्ती झाली आहे. सध्या इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसवर आली आहे. हळूहळू आमचं सरकार जसंजसं पुढे जाईल, तसतसं काँग्रेसची आणखी गळती होईल. कारण, काँग्रेस आता थकली आहे."
प्रदेशाध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ यांचीच नियुक्ती का करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Facebook/Harshwardhan Sapkal
या नियुक्तीबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना यदू जोशी म्हणाले, "या नियुक्तीमागे अनेक कारणं आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर नाना पटोले यांना या पदावर ठेवलं जाणार नाही, हे निश्चित मानलं गेलं. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी एका नव्या चांगल्या चेहऱ्याच्या शोधात होते."
"ज्यांच्या शिक्षण संस्था व इतर संस्था आहेत किंवा व्यापार व्यवहार अधिक आहेत अशा संस्थानिक नेत्यांना या पदी न ठेवण्याचा विचार काँग्रेसने केल्याचं दिसून येत आहे. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि अगदी साधा कार्यकर्ता असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार राहुल गांधींनी केलेला असून तो काँग्रेसने मान्य केल्याचं दिसतंय."
सद्यस्थितीत हर्षवर्धन सपकाळ हा काँग्रेसला अपेक्षित असा चेहरा का वाटतो, या प्रश्नावर यदू जोशी म्हणाले, "हर्षवर्धन सपकाळ हे गेले 10-15 वर्षं राष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमातून काम करत आहेत. त्यामुळे हा चेहरा काँग्रेसला विश्वासार्ह वाटला असावा."
"सपकाळ हे अत्यंत साधे आणि सर्वांशी चांगला जनसंपर्क असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांची काँग्रेस विचारांवर गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठा आहे. काँग्रेसचे ते सच्चे कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली."
"गेल्या अनेक वर्षातील त्यांची राजकीय कार्यकीर्द कोणतेही डाग नसलेली अशी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेसने सपकाळ यांचा पर्याय पुढे आणावा, यात काहीही नवल नाही," असं मत यदू जोशी यांनी व्यक्त केलं.
'महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न'
राज्यातील अनेक काँगेस नेत्यांनी या नियुक्तीबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांनी सपकाळ यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "सपकाळ यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा प्रवास कौतुकास्पद आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी, त्यांच्या कष्टाला आणि निष्ठेचा योग्य सन्मान हा काँग्रेस पक्षच करू शकतो, हे पुन्हा सिद्ध झालं आहे."
"बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आपण केलेल्या विविध विकासकामांमुळे जनसामान्यांचं जीवन अधिक सुरळीत झालं."

फोटो स्रोत, Facebook/Harshwardhan Sapkal
राज्यात आणि दिल्लीत पत्रकारिता करणारे जेष्ठ पत्रकार विनोद राठोड यांनी या नियुक्तीसंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "काँग्रेसमधील जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची प्रदेशाध्यक्षपद घेण्याची तयारी नव्हती. अगदी काही नेते तयार होते. मात्र, त्यांना राज्यातील नेते आणि हाय कमांडचा देखील विरोध होता. त्यामुळे काँग्रेसने नवीन नेत्याला संधी देत हा प्रयोग केला आहे."
"हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे काम करत असताना राहुल गांधींसह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या जवळचे झाले होते. त्यामुळे सपकाळ यांची कार्यशैली राहुल गांधींसह काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाहिलेली आहे. म्हणूनच सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती देण्यास त्यांना हरकत वाटली नसावी."
"शिवाय, संस्थानिक पद्धतीच्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिल्याचा तोटा पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आला असावा. त्यामुळे, पुन्हा असा फटका बसू नये, याचा विचार कदाचित त्यांनी केलेला आहे. या माध्यमातून पक्षाला नव्याने उभारी देण्याचा तसेच उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे, असं मला वाटतं," असंही त्यांनी नमूद केलं.
काँग्रेसकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न?
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातून आलेले आहेत, तर विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त झालेले विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजाचे नेते आहेत.
या दोन्ही विदर्भातील नेत्यांची निवड करताना मराठा आणि ओबीसी हे जातीय समीकरण साधण्यात आलं आहे. तसेच, गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडी आणि राज्यातील विविधी जातसमुहांची पार्श्वभूमी पाहता या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला याचा फायदा होईल, अशी पक्षाची धारणा आहे, असंही राजकीय जाणकार सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























