भगतसिंह कोश्यारींची राज्याबाहेर जाण्याची इच्छा, पण अद्याप प्रक्रिया सुरू नाही

राज्यपाल
Published

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे राज्य सोडून आपल्या राज्यात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पण अद्याप त्याबाबतची कोणतीही प्रक्रिया सुरू झाले नसल्याचे राज्यपाल कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर विविध नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं पुण्यात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.

याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटलं होतं की,  “भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?

"महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच.”

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मग शिवाजी महाराजांचे नाव तरी कशाला घेता? - उदयनराजे

उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत भूमिका जाहीर केली.

शिवाजी महाराजांवर जे वक्तव्य केले गेले आहे ते निषेधार्ह आहे असं मत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून सुरुवात केली जाते. पण जर आज शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं करण्यात येत असतील आणि ती खपवून घेतली जाणार असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही असे उदयनराजे भोसले म्हणाले.

भाजपचे टगे महाराष्ट्राला शहाणपणा शिकवतात- संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की, “छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका ही लोकभावना आहे. राज्यपालांचे कार्यक्रम जिथे होतील ते उधळून लावू, ही लोकभावना आहे. महाराष्ट्रानं संयम दाखवला आहे. राज्यपालांचा बचाव केला जातोय. असं कधीच महाराष्ट्रात घडलं नव्हतं.

“भारतीय जनपा पक्षाचे टगे शिवाजी महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्रालाच शहाणपणा शिकवत आहेत.”

राज्यपालांना हटवण्याची मागणी

भगतसिंग कोश्यारी
फोटो कॅप्शन, भगतसिंग कोश्यारी

“मला असं वाटतं की तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे आदर्श कोण? किंवा तुमच्यासाठी हिरो कोण? तर तुम्हाला महाराष्ट्रातच ते भेटतील. बाहेर कुठे जायची गरज नाही. शिवाजी तर जुन्या युगातली गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत इथेच भेटतील,” असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.

राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.

अशी वक्तव्य करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी दोणं योग्य नाही. राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.

महाविकास आघाडीने तर त्यांना विरोध केलाच आहे. पण मनसे आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिंदे गटातील काही आमदारांनीही राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी भूमिका घेतलीय.  

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)