संसद भवन परिसरातून कोणत्याही महापुरुषांचे पुतळे हटवले नाही, लोकसभा सचिवालयाचे स्पष्टीकरण

फोटो स्रोत, Getty Images
कांग्रेस नेते जयराम रमेश यांनी संसद भवनासमोरचे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि बाबासाहेब अंबेडकर या महापुरुषांचे पुतळे हटवल्याचा आरोप केला होता. त्याबाबत लोकसभा सचिवालयनं स्पष्टीकरण दिलं आहे.
संसद भवन परिसरातून कोणत्याही महापुरुषाचे पुतळे हटवण्यात आले नसल्याचं लोकसभा सचिवालयानं म्हटलं आहे. उलट हे पुतळे संसद भवन परिसरात सन्मानानं बसवले जात असल्याचं सचिवालयानं म्हटलं आहे.
"संसदेच्या नव्या इमारतीच्या निर्मितीनंतर संसद परिसरात लँडस्केपिंग आणि सौंदर्यीकरणाची योजना आखण्यात आली. संसद परिसरात देशातील महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे विविध ठिकाणी बसवण्यात आले होते," असं स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
"संसद भवन परिसर लोकसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात येतो. परिसराच्या आत आधीही माननीय लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीनं पुतळ्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
गुरुवारी दुपारी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही फोटो पोस्ट केले. "संसद भवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ठरावीक ठिकाणाहून हटवण्यात आले आहेत. हे अत्यंत अपमानास्पद आहे," असं त्यांनी त्यात म्हटलं आहे.


















