कंगना राणावत म्हणते, 'चंदिगढ विमानतळावर महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने थोबाडीत मारली'

आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स, लोकसभा निवडणूक निकालानंतरच्या घडामोडी, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या बातम्या तुम्ही इथे वाचू शकता.

थोडक्यात

  • गाझामध्ये शेकडो विस्थापितांना आश्रय दिलेल्या एका शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 20 हून अधिक लोक ठार झाले आहेत.
  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
  • जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी अग्निवीर योजनेवर पुनर्विचार व्हायला हवा असं म्हणलं आहे.
  • 6 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन जस्टिन ट्रूडो यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे.

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने, ओंकार करंबेळकर

  1. संसद भवन परिसरातून कोणत्याही महापुरुषांचे पुतळे हटवले नाही, लोकसभा सचिवालयाचे स्पष्टीकरण

    संसदेची नवीन इमारत

    फोटो स्रोत, Getty Images

    कांग्रेस नेते जयराम रमेश यांनी संसद भवनासमोरचे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि बाबासाहेब अंबेडकर या महापुरुषांचे पुतळे हटवल्याचा आरोप केला होता. त्याबाबत लोकसभा सचिवालयनं स्पष्टीकरण दिलं आहे.

    संसद भवन परिसरातून कोणत्याही महापुरुषाचे पुतळे हटवण्यात आले नसल्याचं लोकसभा सचिवालयानं म्हटलं आहे. उलट हे पुतळे संसद भवन परिसरात सन्मानानं बसवले जात असल्याचं सचिवालयानं म्हटलं आहे.

    "संसदेच्या नव्या इमारतीच्या निर्मितीनंतर संसद परिसरात लँडस्केपिंग आणि सौंदर्यीकरणाची योजना आखण्यात आली. संसद परिसरात देशातील महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे विविध ठिकाणी बसवण्यात आले होते," असं स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

    "संसद भवन परिसर लोकसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात येतो. परिसराच्या आत आधीही माननीय लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीनं पुतळ्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

    गुरुवारी दुपारी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही फोटो पोस्ट केले. "संसद भवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ठरावीक ठिकाणाहून हटवण्यात आले आहेत. हे अत्यंत अपमानास्पद आहे," असं त्यांनी त्यात म्हटलं आहे.

  2. राहुल गांधी म्हणाले- 'पीएम मोदींच्या दाव्यांमुळे शेअर मार्केटमध्ये घोटाळा', चौकशीची मागणी

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, Getty Images

    काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेअर बाजाराबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

    राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी आणि अमित शाहांनी शेअर बाजाराबाबत केलेल्या दाव्यांमुळं 30 लाख कोटींचं नुकसान झालं असून त्याची चौकशी व्हायला हवी.

    राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी शेअर मार्केटबाबत बोलल्याचं आम्ही पहिल्यांदाच पाहिलं आहे. शेअर बाजार वधारेल, असं ते म्हणाले."

    "12 मे रोजी अमित शाह म्हणतात की, 4 जूनपूर्वी शेअर खरेदी करायला हवे. पीएम मोदी 19 मे रोजी म्हणाले की, शेयर मार्केट आणखी वधारेल."

    "31 मे रोजी मोठी स्टॉक अॅक्टिव्हिटी झाली. 3 जूनला स्टॉक मार्केटचे सगळे विक्रम मोडले गेले. त्यानंतर चार जूनला स्टॉक मार्केट कोसळले."

    राहुल गांधी म्हणाले की, "काही लोकांना हा घोटाळा होत असल्याचं माहिती होतं. पण जे दावे करण्यात आले, त्यामुळं 30 लाख कोटी रुपयांचं रिटेल इनव्हेस्टर्स नुकसान सहन करावं लागलं आहे."

    "याबाबत आपण प्रश्न विचारायला हवे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांनी 5 कोटी लोकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला?भाजपचं याच्याशी काय कनेक्शन आहे? आमची जेपीसीची मागणी आहे. हा घोटाळा असून याची चौकशी व्यहायला हवी."

    "हे दोन्ही इंटरव्ह्यू अदानींच्या चॅनलवर होते. अदानींची सेबीकडून चौकशी होत आहे. भाजप आणि फेक एक्झिट पोल यांच्यात काही नातं आहे का? यामागचं सत्य समजायला हवं."

    निवडणुकीच्या निकालांच्या पूर्वी एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा करण्यात आला होता. पण भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला 293 जागांवरच विजय मिळवता आला.

  3. कंगना राणावत म्हणते, 'चंदिगढ विमानतळावर महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने थप्पड मारली'

    कंगना राणावत म्हणते, 'चंदिगढ विमानतळावर महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने थप्पड मारली'

    फोटो स्रोत, Getty Images

    अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतने आपल्याला चंदिगढ विमानतळावर मारहाण झाली अशी माहिती एका व्हीडिओद्वारे दिली आहे.

    या व्हीडिओत कंगनाने, आपण चंदिगढ विमानतळावर सुरक्षा तपासणी पूर्ण करुन येत असताना एका सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याने आपल्या चेहऱ्यावर मारलं आणि ढकललं अशी माहिती दिली आहे. असं का केलं असं विचारताच महिला कर्मचाऱ्याने आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याबद्दल हे कृत्य केलं असं सांगितलं.

    कंगनाने यावर हे सगळं ठीक आहे पण पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि कट्टरवाद वाढत आहे, त्याचं काय असा प्रश्न विचारला आहे.

  4. पंतप्रधान मोदींनी स्वीकारले तैवानच्या राष्ट्रपतींचे अभिनंदन, चीनने व्यक्त केला विरोध

    लाइ चिंग

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    पीएम नरेंद्र मोदींनी तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांच्या अभिनंदनाच्या संदेशावर आभार मानत प्रतिक्रिया दिली आहे. पण चीननं पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर विरोध व्यक्त केला आहे.

    चीनची वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, "तैवानच्या नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाबाबत चीन विरोध व्यक्त करत आहे. ज्या देशांचे चीनबरोबर राजकीय संबंध आहेत, त्यांच्या नेत्यांच्या तैवानच्या नेत्यांसी अधिकृत संवादाचा चीननं कायम विरोध केला आहे."

    "जगात फक्त एकच चीन आहे. भारतानं वन-चायना संदर्भात गांभिर्यानं राजकीय कटिबद्धता दर्शवली आहे. त्यांनी तैवानच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय धोरणांबाबत सतर्क राहायला हवं आणि वन चायना धोरणाचं उल्लंघन होणाऱ्या कोणत्याही बाबीपासून दूर राहायला हवं."

    तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निवडणुकीतील विजयाबाबत अभिनंदन. आम्ही तैवान आणि भारतातील संबंध वाढवण्यासाठी तत्पर आहोत. आम्ही व्यापार, औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठीही तयार आहे. "

    पीएम मोदींनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद लाइ चिंग. मी आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भागिदारीच्या संदर्भात काम करण्याची आशा करतो."

  5. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना सहभागी होणार आहेत

    शेख हसिना

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन, शेख हसिना

    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

    शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेख हसिना शुक्रवारी ढाक्याहून नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.

    शेख हसिना यांच्यासाठी भाषण लिहिणारे एम नजरुल इस्लाम यांनी BSS या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. "पंतप्रधान शेख हसिना शुक्रवारी दुपारी 4 वाजता ढाक्याहून नवी दिल्लीला रवाना होतील. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्या 9 जूनला बांगलादेशला परततील," असं ते म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना फोन करून शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं होतं. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं.

    लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला बहुमत मिळालं आहे. एनडीए आघाडीनं 543 पैकी 293 जागा जिंकल्या आहेत.

  6. अग्निवीर, जातनिहाय जनगणना आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा याबाबत जेडीयूनं काय म्हटलं?

    के.सी.त्यागी (फाइल फोटो)

    फोटो स्रोत, Getty Images

    जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी अग्निवीर योजनेवर पुनर्विचार व्हायला हवा असं म्हणलं आहे.

    तसंच देशात जातनिहाय जनगणना करावी आणि बिहारला विशेष दर्जाही द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

    केसी त्यागी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "अग्निवीर योजनेबाबत काही मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. जनतेनं प्रश्न उपस्थित केल्यामुळं या योजनेच्या कमकुवत बाजूवर सविस्तर चर्चा व्हायला हवी,"असंही ते म्हणाले.

    "जातनिहाय जनगणनेला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. पंतप्रधान मोदींनीही ते नाकारलेलं नाही. जातनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे."

    त्यागी म्हणाले की, "आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा. राज्य विभाजनानंतर बिहारची जी अवस्था झाली आहे, ती दूर करण्यासाठी बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यायला हवा."

    भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्यात यावेळी यश आलेलं नाही. पण भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीला 290 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

    पण जेडीयू 12 आणि टीडीपी 16 जागा जिंकत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. सध्या हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटकपक्ष आहेत.

  7. मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये कोकणात आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात आगमन

    महाराष्ट्रात कोकणात आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात मान्सूनचं आगमन

    फोटो स्रोत, Getty Images

    महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. 6 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिण भागांत मान्सूनचं आगमन झालं आहे.

    मान्सूनची उत्तरेकडील सीमा आता महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी ते सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरापासून इस्लामपूरपर्यंत (पश्चिम बंगालमधील) जात असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढ्या तीन चार दिवसांत मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल होईल अशी अपेक्षा असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात सध्या नंदुरबारचा अपवाद वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे.

    महाराष्ट्रात कोकणात आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात मान्सूनचं आगमन

    फोटो स्रोत, IMD

    अनेक ठिकाणी गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील प्रदेशात 8 जूनपासून मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.

    आठ आणि नऊ तारखेसाठी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. मुंबई परिसरातही गुरवारी सहा जून रोजी पावसाच्या सरी बरसल्या. महाराष्ट्रात ब्रह्मपुरी इथे 43.2°C हे सर्वाधिक कमाल तापमान होतं तर जेऊर येथे 22.5°C हे सर्वात कमी किमान तापमान होते. तर उत्तर भारतात उष्णतेसाठी ऑरेंज अलर्ट आहे.

    वायव्य भारतात राजस्थान आणि पंजाबमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाट आणि धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

  8. नीतिश-नायडूंच्या इंडिया आघाडी प्रवेशावर काय म्हणाले संजय राऊत?

    संजय राऊत

    फोटो स्रोत, ANI

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींकडं तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी पुरेसं संख्याबळ असल्याचं म्हटलं आहे.

    इंडिया आघाडी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासाठी पंतप्रधान पदावरचा दावा सोडणार का? असा प्रश्न नितीश कुमार यांना विचारण्यात आला होता.

    त्यावर एएनआय या वृत्तसंस्थेला उत्तर देताना राऊत म्हणाले की,"आमच्या आघाडीतील नेत्यांमध्ये अशी काहाही चर्चा झाली नाही. आम्ही आधीच म्हटलं आहे की, मोदींकडं बहुमत नसलं तरी त्यांचा आकडा मोठा आहे. त्यांच्याकडं 240 चा आकडा आहे. त्यामुळं आम्ही त्यांनाच आधी संधी दिली आहे."

    "त्यांची (पंतप्रधान मोदींची) इच्छा तिसऱ्यांदा शपथ घेण्याची आहे. त्यांना तिसऱ्यांदा शपथ घेऊ द्या. नंतर चौथ्या शपथीबाबत आम्ही पाहून घेऊ," असं ते म्हणाले.

    भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीकडं 290 पेक्षा जास्त खासदारांचं संख्याबळ आहे. तर इंडिया आघाडीला 234 जागांवर विजय मिळाला आहे.

    चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला 16 आणि जेडीयूला 12 खासदार निवडून आणण्यात यश आलं आहे. त्यामुळं सध्या ते किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. पण सध्या या दोन्ही पक्षांनी पंतप्रधान बनण्यासाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे.

  9. रविंद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर : निवडणुकीच्या निकालाला आव्हान देता येतं का? यापूर्वी असं झालं होतं?

    रविंद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर : निवडणुकीच्या निकालाला आव्हान देता येतं का? यापूर्वी असं झालं होतं?

    लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये चुरशीच्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये लढत होती ती शिवसेना नेते रविंद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्यात.

    मतमोजणी, पुनर्मोजणी यांनंतर रविंद्र वायकर 48 मतांनी जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या निकालाला आव्हान देईल असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

    निवडणुकीच्या निकालाला असं आव्हान देता येतं का? कधी देता येतं? यापूर्वी असं झालं होतं का?

  10. इंडिया आघाडी सरकार बनवणार का? या प्रश्नावर समाजवादीचे रामगोपाल यादव म्हणाले...

    तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी अखिलेश यादव यांची दिल्लीत भेट घेतली.

    याबाबत पत्रकारांनी सपाचे सरचिटणीस प्राध्यापक राम गोपाल यादव यांना विचारलं की, "इंडिया ब्लॉक सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार का?"

    यावर ते म्हणाले की, "आमचे अध्यक्ष (अखिलेश यादव) आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात चर्चा झाली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय अद्याप खुले आहेत."

    गुरुवारी(6 जून) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, "आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू."

    रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव

    फोटो स्रोत, Getty Images

    लोकसभेच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला 37 जागा मिळाल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 29 जागा मिळाल्या आहेत.

    असं असलं तरी इंडिया आघाडीला मात्र बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. इंडिया आघाडीकडे 234 जागा आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 293 जागांसह बहुमत मिळाले आहे.

  11. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा पर्याय - पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

    व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा पर्याय - पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

    देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. पराभवाची जबाबदारी घेत मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.

    काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत काय वाटतं? राज्यात राष्ट्रपती राजवट लावून लवकर निवडणुका घेण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात?

    प्राजक्ता पोळ यांनी घेतलेली मुलाखत.

  12. रविंद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर : निवडणुकीच्या निकालाला आव्हान देता येतं का? यापूर्वी असं झालं होतं?

    लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये चुरशीच्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये लढत होती ती शिवसेना नेते रविंद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्यात.

    मतमोजणी, पुनर्मोजणी यांनंतर रविंद्र वायकर 48 मतांनी जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या निकालाला आव्हान देईल असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

    निवडणुकीच्या निकालाला असं आव्हान देता येतं का? कधी देता येतं? यापूर्वी असं झालं होतं का?

    रवींद्र वायकर
  13. सुप्रिया सुळेंचा विजय अजित पवारांसाठी किती मोठा धडा?

    व्हीडिओ कॅप्शन, सुप्रिया सुळे यांचा विजय शरद पवार यांची ताकद दाखवणारा की अजित पवार यांना धडा शिकवणारा?
  14. मोदींना शुभेच्छा देताना कॅनडाच्या पंतप्रधानांकडून मानवाधिकार आणि विविधतेचा उल्लेख

    नरेंद्र मोदी, जस्टिन ट्रूडो

    फोटो स्रोत, Getty Images

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन जस्टिन ट्रूडो यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे.

    कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना त्यांनी लिहिलं की, "निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. मानवाधिकार, विविधता आणि कायद्याचं राज्य या मूलभूत तत्वांवर आधारलेले दोन्ही देशांसह संबंध अधिक मजबूत होण्यासाठी आम्ही मोदी सरकारसोबत काम करण्यास तयार आहोत."

    या निवेदनात कॅनडाने म्हटलं आहे की, “भारतातील लोकशाही प्रक्रियेचे प्रमाण आणि व्याप्ती ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. काही आठवड्यांच्या कालावधीत, लाखो लोकांनी मतदान केलं, इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत एवढं मतदान होणं हा एक विक्रम आहे. कॅनडामध्ये 13 लाख हिंदू राहतात."

    कॅनडात हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. कॅनडाने निज्जरच्या हत्येमागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. हा आरोप भारताने फेटाळून लावला होता.

  15. महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे 'खलनायक' देवेंद्र फडणवीस - संजय राऊत

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.

    फडणवीसांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राजकारणात अशी नाटकं होत राहतात. मोदी देखील अशा पद्धतीची नाटकं करत असतात. मोदी कधी रडतात, कधी हसतात, कधी पळतात, तर कधी खाली बसतात. हे सगळे नेते त्यांचेच 'चेले' आहेत. महाराष्ट्राने फडणवीसांचं नेतृत्व नाकारलं आहे."

    संजय राऊत

    फोटो स्रोत, ANI

    संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचे खलनायक जर कुणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांमुळेच महाराष्ट्रात भाजपला वाईट दिवस आले आहेत.

    महाराष्ट्र हा त्याच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जात होता पण देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने बदल्याचं राजकारण केलं, कुटील डाव रचले. महाराष्ट्राच्या राजकारणात विष कालवण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि त्याचीच फळं त्यांना मिळत आहेत."

  16. काँग्रेसने महाराष्ट्रात कशी उभारी घेतली? ही आहेत 5 कारणं

    व्हीडिओ कॅप्शन, लोकसभा निवडणूक निकाल: काँग्रेसने महाराष्ट्रात कशी उभारी घेतली? ही आहेत 5 कारणं
  17. स्मृती इराणी यांच्यासह मोदींच्या 22 केंद्रीय मंत्र्यांचा पराभव, जाणून घ्या कोण कोण पराभूत झालं?

    भाजप यंदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. माध्यमांमध्ये सध्या याची चर्चा सध्या जोरात आहे.

    इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार, 'भाजपने या निवडणुकीत बऱ्याच चुका केल्या. दलित मतदारांच्या मनात संविधान बदलण्याचा मुद्दा चांगलाच रुजला होता, नरेंद्र मोदींनी अनेकवेळा याबाबत स्पष्टीकरण देऊनही दलित मतदारांना भाजपच्या विरोधात मतदान केल्याचं या बातमीत सांगितलं गेलंय.'

    यासोबतच बऱ्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करण्यात भाजपकडून चूक झाली असंही इकॉनॉमिक टाइम्सच्या या बातमीत म्हटलं गेलंय.

    स्मृती इराणी

    फोटो स्रोत, Getty Images

    2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक खासदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं पाहायला मिळालं. पण निकालानंतर केंद्र सरकारचे 22 मंत्री निवडणुकीत हरल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

    ज्या मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यामध्ये स्मृती इराणी, अर्जुन मुंडा, महेंद्रनाथ पांडे, आरके सिंग, राजीव चंद्रशेखर, अजय टेनी,कौशल किशोर, निरंजन ज्योती, संजीव बालियान, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार, कैलास चौधरी, वी. मुरलीधरन, लोगनाथन मुरुगन, निशित प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांच्या नावाचा समावेश आहे.

    इकॉनॉमिक टाइम्सने म्हटलं आहे की, 'भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीत निरुत्साह दिसून आला,कारण मागच्या काही निवडणुकांमध्ये भाजपने सतत विजय मिळवल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत कष्ट घेतले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांना ही निवडणूक सोपी वाटली आणि त्यामुळेच भाजप बहुमताचा आकडा गाठू शकला नाही.'

  18. गाझामधल्या संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर इस्रायलचा हल्ला, किमान 20जणांचा मृत्यू

    गाझामध्ये शेकडो विस्थापितांना आश्रय दिलेल्या एका शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला आहे.

    स्थानिक रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 20 हून अधिक लोक ठार झाले आहेत. ही शाळा संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे चालवली जात होती. इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, या शाळेत हमासचा एक तळ होता.

    हमासच्या माध्यम विभागाने म्हटलं आहे या हल्ल्यात किमान 27 लोक मारले गेले आहेत आणि इस्रायलने 'भयानक नरसंहार' केल्याचा आरोप हमासने केला आहे. स्थानिक पत्रकारांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने या शाळेतील दोन मजल्यांवर दोन क्षेपणास्त्र डागली.

    नुसरत निर्वासित छावणीवर इस्रायलने विमानांच्या मदतीने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यातील जखमींना मदत करण्यासाठी रुग्णवाहिका हजर झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

    गाझा

    फोटो स्रोत, EPA

  19. मोदींच्या आघाडी सरकारबद्दल अमेरिकेने नेमकं काय म्हटलं?

    भारतातील लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (4 जून)आले आणि यासोबतच देशातील आगामी सरकार हे आघाडीचे सरकार असेल हेही स्पष्ट झालं आहे.

    नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणारा भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही.

    भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत.

    निवडणूक विश्लेषक आणि एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरवत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने 234 जागा जिंकल्या आहेत.

    संपूर्ण जगाचं भारताच्या निवडणुकीवर लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचा निकाल आता लागला असून जगभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

    मॅथ्यू मिलर

    फोटो स्रोत, Getty Images

    बुधवारी (5 जून) अमेरिकेच्या सरकारचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी भारतातील निवडणूक निकालांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सांगितलं की, “आम्ही भारतीय मतदारांच्या इच्छेचा आदर करतो, पंतप्रधान आणि त्यांच्या युतीने बनलेलं सरकार हे लोकांच्या निवडीने बनलेलं सरकार असेल. बायडन प्रशासन मोदींसोबत काम करत आलं आहे आणि त्यात बदल होणार नाही. भविष्यातही आम्ही असंच काम करू.”

    लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत संसदेत पुनरागमन केलं आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप '370 जागा' जिंकेल असं भाकीत वर्तवलं होतं.

    निकाल मात्र वेगळा लागला. भाजपला स्वबळावर बहुमत मिळू शकलं नाही आणि एनडीए देखील 300 चा आकडा गाठू शकली नाही.

  20. अयोध्येत भाजपचं 'पानिपत' करणारे अवधेश प्रसाद म्हणतात...

    अवधेश प्रसाद आणि अखिलेश यादव

    फोटो स्रोत, ANI

    अयोध्या.. मागच्या काही वर्षात हे नाव भारतातील प्रत्येकाने ऐकलं असेल. 22 जानेवारी 2024ला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला राम मंदिराचा मुद्दा मदत करणार हे स्पष्ट झालं होतं. पण लोकसभेच्या निकालात हा मुद्दा महत्त्वाचा ठरल्याचं जाणवलं नाही.

    ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिर बांधलं गेलं त्याच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. एवढंच काय ज्या जिल्ह्यात हे राम मंदिर आहे त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांचा मोठा पराभव झाला आहे.

    भाजपला जागांच्या बाबतीत मोठं नुकसान झालं असून यावर्षी केवळ 33 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. समाजवादी पक्षाला 37 जागा मिळाल्या आणि अखिलेश यादवांचा हा पक्ष देशात तिसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे.

    राम मंदिर

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, राम मंदिर

    अयोध्या ज्या मतदारसंघात आहे त्या फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंग यांचा 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

    भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रचाराला अवधेश कुमार यांनी हरवलं असल्याचं आता बोललं जातंय.

    हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अवधेश प्रसाद म्हणाले की, "मी भाजपच्या विरोधात लढत नव्हतो तर लोकच भाजपच्या विरोधात लढत होते. दलितांनी मला सगळ्यात जास्त समर्थन दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बनलेल्या राम मंदिराचं श्रेय भाजप घेऊ पाहत होती. त्यांना मंदिराचा राजकीय फायदा उठवायचा होता. बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांपासून भाजपला ही निवडणूक दूर घेऊन जायची होती."

    अवधेश प्रसाद म्हणाले की, "मी भाजपच्या विरोधात लढत नव्हतो, भाजपच्या विरोधात लढणारे लोक होते. भाजपच्या धोरणांचे खरे बळी ठरलेल्या दलित बांधवांकडून आम्हाला सर्वात मोठा पाठिंबा मिळाला, दलितांसोबतच आम्हाला ओबीसी आणि अल्पसंख्याकांचाही पाठिंबा मिळाला. आम्हाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि शेतकऱ्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मला मतदान केलं. भटक्या जनावरांमुळे शेतकरी त्रस्त होते."