मी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही - मोदी
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा धर्मावर आधारित दहशतवाद, संपत्तीचं वाटप, माओवाद, दहशतवाद आणि पाकिस्तानच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
पुण्यातील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, "पुणे ही महात्मा फुलेंची भूमी आहे. पुणे जेवढं प्राचीन आहे तेवढं ते आधुनिक शहर आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्रातील उत्तम लोक उपलब्ध आहेत. म्हणून तर म्हणतात 'पुणे तिथे काय उणे?' काँग्रेसने सुमारे 60 वर्षे राज्य केलं पण या साठ वर्षांमध्ये देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या. आम्हाला फक्त दहा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली.
या दहा वर्षांमध्ये मूलभूत सोयीसुविधा तर आम्ही दिल्याचं पण प्रत्येक वर्गातील लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. चांगले रस्ते आणि आधुनिक पायाभूत सोयीसुविधा बघून प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं. तुम्ही पुणे मेट्रो बघा, पुणे विमानतळाचे नवीन रूप बघा, पालखी मार्ग बघा, वंदे भारत ट्रेन बघा ही सगळे आधुनिक होऊ पाहणाऱ्या भारताचे प्रतीक आहेत.
"पुणेकरांनी लिहून घ्या ही मोदींची गॅरंटी आहे. तो दिवसही जवळ आहे जेंव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करू शकाल. काँग्रेसने दहा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सोयीसुविधांवर जेवढा खर्च केला तेवढा आम्ही एका वर्षात करतो. उद्या वर्तमानपत्रांमध्ये हे छापलं जाणार नाही. ते कुणालातरी फोन करून विचारतील की काय छापायचं आहे?
"भारत आता तरुणांवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करतो आहे. फक्त दहा वर्षांमध्ये भारताच्या तरुणांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहेत. आम्ही जे बदल आणले आहेत त्याचे परिणाम मॅपिंगमध्ये दिसून येतोय. आम्ही इंग्रजांचे कायदे उखडून फेकून दिले."

फोटो स्रोत, facebook
शरद पवारांचं नाव न घेता, त्यांच्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "45 वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने राजकीय अस्थिरतेचा हा खेळ सुरु केला आणि तेंव्हापासून महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आहे. यामुळे महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.
"2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा अपमान केला. भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवलं पाहिजे. देशात एक मजबूत आणि स्थिर सरकार दिलं पाहिजे. काँग्रेसच्या राजकुमाराला या देशाला लुटायचं आहे."
मोदी म्हणाले, "संविधान सभेने अनेक महिने चर्चा करून हा निर्णय घेतला की भारतात कधीही धर्मावर आधारित आरक्षण दिलं जाणार नाही. पण या काँग्रेसने व्होट बँकेसाठी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील जातींमध्ये मुस्लिमांचा समावेश केला. या देशातला दलित आरक्षण सोडून मुसलमानांना देईल का? आदिवासी आरक्षण सोडून मुसलमानांना देईल का? त्यांनी कर्नाटक मॉडेल तयार केलं आहे.
"सुप्रीम कोर्टाने त्यांना नकार दिला की धर्मावर आधारित आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. कर्नाटकात एका रात्रीत एक फतवा काढून मुसलमानांना ओबीसी बनवलं गेलं आणि सकाळी ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणावर डाका टाकून मुसलमान अर्ध्याहून अधिक आरक्षण घेऊन गेले.
"इंडी आघाडीने कान उघडून ऐकावं की 'मोदी अभी जिंदा है,' जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ देणार नाही. आणि ज्यांची तशी इच्छा असेल त्यांना हा देश राजकीय नकाशावरून कायमचं नष्ट करून टाकेल. काँग्रेसची आणखीन एक ओळख आहे की ते दहशतवाद्यांना मोकळीक द्यायचे."







