उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत सहानुभूतीची लाट दिसतेय : छगन भुजबळ

सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक घडामोडी घडत आहे. या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात संशयित कुकी कट्टरतावाद्यांच्या एका हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.
  • पंजाब किंग्सनं केकेआरच्या विरोधात ऐतिहासिक कामगिरी करत टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम रचला.
  • लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक 78.53 टक्के मतदान झालं.
  • युक्रेन विरोधातील हल्ल्यात रशियाची मदत करण्याचा आरोप करत, अमेरिकेनं चीनला कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
  • केंद्र सरकारची 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी, कांदा उत्पादकांना दिलासा.

लाईव्ह कव्हरेज

नामदेव काटकर आणि आशय येडगे

  1. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत सहानुभूतीची लाट दिसतेय : छगन भुजबळ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी NDTV या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "विरोधी पक्ष (संविधान संपवण्याबाबत) जो प्रचार करत आहेत, तो जोरात चालला आहे हे तर मान्यच करावं लागेल. लोकांना असं वाटतंय की हे लोक चारसौ पार ची घोषणा देत आहेत ती संविधान बदलण्यासाठीच आहे.

    "कर्नाटकातील एका भाजपच्या नेत्यानेही याबाबत विधान केलं आहे. मोदींनी हे अनेकवेळा सांगितलं आहे की आपलं संविधान मजबूत आहे आणि स्वतः आंबेडकर जरी आले तरी ते बदलणं अशक्य आहे. पण लोकांमध्ये हा प्रचार होत आहे."

    छगन भुजबळ

    फोटो स्रोत, Getty Images

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार एनडीएला किती नुकसान करू शकतात? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर भुजबळ म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांना जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून त्यांना मिळणारी सहानुभूती दिसत आहे.

    "पक्ष फुटल्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आहे. पण असं असलं तरी लोकांचा विश्वास मोदींवर आहे आणि मोदी सरकार बनवतील असं त्यांना वाटतं."

  2. मोदींच्या विधानावर टीका करणाऱ्या भाजपच्या उस्मान गनी यांना अटक

    भारतीय जनता पक्षाचे बिकानेर अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उस्मान गनी यांना पोलिसांनी शनिवारी (27 एप्रिल) सकाळी अटक केली आहे.

    बिकानेरच्या मुक्ता प्रसाद पोलिस स्टेशनचे प्रभारी धीरेंद्र सिंह यांनी फोनवर बीबीसी हिंदीला सांगितलं की, "दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे एक वाहन त्यांच्या घराजवळ गेले होते तेव्हा ते दिल्लीत होते. शनिवारी ते पोलिस ठाण्यात आले आणि बॅरिकेडिंग करणाऱ्या पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर उस्मान गनी यांना सीआरपीसीच्या कलम 151 (शांतता भंग) अंतर्गत अटक करण्यात आली आहे."

    मात्र, दोन दिवसांपूर्वी पोलिसांची गाडी उस्मान यांच्या घराजवळ नेमकी कशासाठी गेली होते हे मात्र धीरेंद्र सिंह यांनी सांगितलं नाही.

    उस्मान गनी

    फोटो स्रोत, USMAN GANI/SOCIAL MEDIA

    उस्मान गनी हे भाजपचे बिकानेर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष होते.

    तीन दिवसांपूर्वी दिल्लीत एका टीव्ही चॅनलशी संवाद साधत त्यांनी नरेंद्र मोदींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. उस्मान गनी यांचे वक्तव्य प्रसारित झाल्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

    एका टीव्ही चॅनलशी बोलताना उस्मान गनी म्हणाले होते की, "आम्ही तीन-चार जागा गमावत आहोत."

    पंतप्रधान मोदी यांनी बांसवाडा येथील सभेत मुस्लिम समुदायाबाबत केलेल्या वक्तव्यावर उस्मान गनी म्हणाले होते की, "मला त्यांचे (मोदींचे) विधान आवडले नाही. हा एकट्या नरेंद्र मोदींचा पक्ष नाही, शेकडो मुस्लिम भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत."

    या चॅनलशी बोलताना उस्मान गनी पुढे म्हणाले होते की, “मी त्यांना (नरेंद्र मोदी) ईमेलही लिहणार आहे की, त्यांनी अशी फालतू विधानं केली नाहीत तर बरं होईल."

    पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर उस्मान गनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, 'उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है, जो ज़िन्दा हो तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है.' म्हणजेच 'तुमच्या तत्वांशी तडजोड होत असेल तर विरोध करणं गरजेचं आहे, तुम्ही जिवंत असाल तर ते दाखवून देणंही गरजेचं आहे.'

    "ज्या विधानाच्या आधारे पक्षातील जबाबदार लोकांनी माझी बाजू न ऐकता, कसलीही नोटीस न देता मला 6 वर्षांसाठी बाहेर काढले, त्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही," असं गनी यांनी लिहिलं होतं.

  3. उज्ज्वल निकम मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार

    उज्ज्वल निकम

    उत्तर-मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

    भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं असून, त्यांच्या जागी उज्वल निकम यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

    उज्वल निकम यांची लढत आता काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी होईल.

    काँग्रेसनं दोनच दिवसांपूर्वी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय.

    घोषणा

    फोटो स्रोत, bjp

    उज्ज्वल निकम टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. मला कल्पना आहे की राजकारण हे माझ्यासाठी नवीन क्षेत्र आहे. या देशातील कायदा सक्षम व्हावा आणि देशद्रोह्यांविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी यासाठी मी काम करणार आहे.

    "माझा जन्म हा हनुमान जयंतीला झाला आहे त्यामुळे मी आत्तापर्यंत देशाच्या सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अनेक खटले चालवले. त्यामुळे मी कुठलंही आव्हान पेलवू शकतो."

    उज्वल निकम

    फोटो स्रोत, Getty Images

    या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये विलेपार्ले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचे पराग अळवणी करतात. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलिप लांडे, कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचेच संजय पोतनिस विजयी झाले होते.

    वांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशीष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. यामुळे एक अपवाद वगळता विधानसभा निवडणुकांत या मतदारसंघांवर महायुतीचं प्राबल्य दिसून येतं.

  4. कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा जुनी की नवी? शेतकऱ्यांचा सवाल

    कांदा उत्पादक शेतकरी

    फोटो स्रोत, Getty Images

    मागच्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी कांदा निर्यातबंदी अखेर काही प्रमाणात उठवण्यात आली आहे.

    आता अखेर केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा शेजारी देशांना 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

    मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 मध्ये खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन कमी झाल्यामुळे देशांतर्गत साठा पुरेसा रहावा यासाठी कांद्यावर निर्यातबंदी लावल्याचं सरकारने सांगितलं होतं.

    निवडणुकीच्या काळात कांदा निर्यातबंदीचा विषय शेतकऱ्यांकडून मांडला जात होता आणि आज अखेर कांद्यावरील निर्यातबंदी काही प्रमाणात का होईना उठवण्यात आलेली आहे.

    यासोबतच सरकारने मध्य-पूर्वेतील काही देश आणि काही युरोपीय देशांच्या बाजारपेठेसाठी खास पिकवलेला 2000 मेट्रिक टन 'पांढरा कांदा' निर्यात करण्यासही परवानगी दिली होती.

    पांढऱ्या कांद्याबाबत घेतलेल्या या निर्णयाने मुख्यतः गुजरातमधील शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचं मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलं होतं. कारण महाराष्ट्रात निर्यातीस योग्य असणाऱ्या पांढऱ्या कांद्याचं उत्पादन फारसं होत नाही.

    कांदा उत्पादक शेतकरी

    फोटो स्रोत, Getty Images

    हा तर आकडेवारीचा खेळ - कांदा उत्पादक संघटना

    निर्यातबंदी उठवल्याच्या या बातमीबाबत नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शंका व्यक्त केली असून. या संघटनेचं असं म्हणणं आहे की, "आज कांदा निर्यातीच्या परवानगीचे कोणतेही नवीन परिपत्रक निघालेले नाही परंतु अनेक वृत्तवाहिन्यांवर ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत याआधीच वेगवेगळ्या देशांना जो कांदा निर्यात होणार होता त्याचीच आकडेवारी एकत्रित करून 99 हजार टन कांदा निर्यात होणार अशा आजच्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या जात आहे."

    सरकारच्या या निर्णयाबाबत बोलताना बळीराजा शेतकरी गटाचे अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर म्हणाले की, "सध्या कांद्याचं वातावरण तापलं असला कारणाने जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत ज्या काही बातम्या चालत आहे याच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे कारण वातावरण थंड करण्यासाठी कोणी काय आवषध शोधून काढलतील.सांगता येत नाही आणि म्हणून काही ऑर्डर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणे अवघड आहे."

    कांदा व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाचा कांदा निर्यातदारांना फायदा नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

    याबाबत बोलताना कांदा निर्यातदार संदीप लुनावत म्हणाले की, "ही बातमी जुनीच आहे, शिळ्या कढीला उत आणला आहे. एनसीईएलच निर्यात करणार आहे, व्यापारी करू शकत नाही. हे आता का सांगत आहेत ते कळत नाही, यात नवीन काही नाही. त्यामुळे हा निर्यात बंदी उठवली असे नाही, व्यापाऱ्यांच्या वखारी रिकाम्या आहेत, आम्हाला किती फटका बसला हे सांगू शकत नाही."

    सरकारने मध्य-पूर्वेतील काही देश आणि काही युरोपीय देशांच्या बाजारपेठेसाठी खास पिकवलेला 2000 मेट्रिक टन 'पांढरा कांदा' निर्यात करण्यासही परवानगी दिली होती. पांढऱ्या कांद्याबाबत घेतलेल्या या निर्णयाने मुख्यतः गुजरातमधील शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचं मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलं होतं. कारण महाराष्ट्रात निर्यातीस योग्य असणाऱ्या पांढऱ्या कांद्याचं उत्पादन फारसं होत नाही.

  5. 'देवालाही दगा देण्याचा प्रयत्न..', स्मृती इराणींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

    स्मृती इराणी

    फोटो स्रोत, ANI

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

    उत्तर प्रदेशच्या अमेठीतील सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, "वायनाडमध्ये मतदान झालं आहे. आता काँग्रेसचे उमेदवार येतील, पण आधी ते राम मंदिरला जातील."

    "आधी आमंत्रण नाकारले आणि आता ते मंदिरात जातील. कारण मंदिरात गेल्यानं त्यांना मते मिळतील असं त्यांना वाटत आहेत. म्हणजे देवालाही दगा देण्याचा प्रयत्न ते करतील. पण जो खऱ्या मनानं रामाचा नसेल तो आपव्या कामाचा नाही," असं त्यांनी म्हटलं.

    राहुल गांधींचं नाव न घेता स्मृती इराणी यांनी म्हटलं की, "आधी याद्यांची कारणं देत ते वायनाडला गेले. तिथं जाऊन वायनाड हेच आपलं कुटुंब असल्याचं त्यांनी म्हटलं."

    "लोकांना रंग बदलताना पाहिलं आहे, पण कुटुंब बदलताना पहिल्यांदाच पाहिलं," अशी टीका त्यांनी केली.

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा अमेठीमधून पराभव केला होता.

    काँग्रेसनं अद्याप अमेठीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. पण राहुल गांधी अमेठीमधूनही निवडणूक लढवू शकतात, असं म्हटलं जात आहे.

  6. मणिपूरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, दोन जवानांचा मृत्यू

    प्रतिकात्मक छायाचित्र

    फोटो स्रोत, DILIP KUMAR SHARMA

    मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात संशयित कुकी कट्टरतावाद्यांच्या एका हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.

    या हल्ल्यात सीआरपीआफचे दोन जवान जखमीही झाले आहेत. मोइरांग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मैतेई बहुल नारायणसेना गावात शनिवारी पहाटे 1 च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

    हल्ल्यात मृत्यू झालेले जवान नारायणसेना परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या 128व्या बटालियनचे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    बिष्णूपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रवी कुमार यांनीही हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "हल्ल्याची ही घटना रात्री 12:45 दरम्यानची आहे. संशयित कट्टरतावाद्यांनी डोंगरावरून नारायणसेना गावात अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्याठिकाणी सीआरपीएफची छावणी असल्याचं माहिती असल्यानं त्यांनी बॉम्बही फेकले."

    हल्ल्यादरम्यान एका बॉम्बचा सीआरपीएफच्या 128व्या बटालियनच्या चौकीत स्फोट झाला. त्यात दोन जवानांचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले.

    पोलीसांनी मृत सीआरपीएफ जवानांची ओळख पटवली असून त्यात उपनिरीक्षक एन सरकार आणि हेड कॉन्सटेबल अरुप सैनी यांचा समावेश आहे.

    यापूर्वी 24 एप्रिलला राष्ट्रीय महामार्ग-2 (इंफाळ ते दीमापूर) वर एक आयईडी स्फोट झाला होता. त्यात एका पुलाचं नुकसान झालं होतं.

    मणिपूरमध्ये गेल्यावर्षी मेपासून मैतेई आणि कुकी यांच्या जातीय हिंसाचार सुरू असून त्यात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 हजारांवर लोक बेघर झाले आहेत.

  7. तिरंदाजी विश्वचषक : भारताच्या महिला संघाने मिळवले सुवर्णपदक

    संग्रहित छायाचित्र ज्योती सुरेखा

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन, ज्योती सुरेखा (संग्रहित छायाचित्र)

    शांघायमध्ये सुरू असलेल्या क्रीडा तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये भारताच्या महिला कंपाऊंड टीमनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

    भारताच्या ज्योती सुरेखा, आदिती स्वामी आणि परनित कौर यांनी अव्वल मानांकन मिळवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती.

    भारतीय टीमनं अंतिम फेरीत सहाव्या मानांकित इटलीच्या महिला कंपाऊंड टीमच्या विरोधात खेळताना 178-171 नं आघाडी घेतली आणि सात पॉइंट्सनं सुवर्णपदक जिंकलं.

    ज्योती, आदिती आणि परनित यांची कामगिरी एवढी उत्तम होती की, फक्त दोन वेळा परफेक्ट 10 चं लक्ष्य त्यांनी मिस केलं.

  8. "औरंगजेब आणि बाबराशी माझा काय संबंध..", असे का म्हणाले ओवेसी

    असदुद्दीन ओवेसी

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर पलटवार केला आहे.

    "त्यांचे एक मंत्री हैदराबादेत येऊन म्हणाले की, औरंगजेबाशी ओवेसींचा संबंध आहे. त्यांचे मंत्री दिल्लीत देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला.. असंही म्हटले होते," असं ओवेसींनी म्हटलं.

    "औरंगजेबाशी माझा काय संबंध, बाबराशी माझा काय संबंध. बादशाहांशी माझा काय संबंध आहे."

    ओवेसी म्हणाले की, "हा देश कुणाचा आहे? सर्वात आधी इथं कोण आले? आदिवासी आणि नंतर द्रविड. उच्च वर्गातील लोक आर्य वंशाचे आहेत. ते कुठून आले? इराणमधून, सध्याच्या रशियामधून ते आले आहेत.

    "हा द्रविडांचा आणि आदिवासींचा देश आहे. तुम्ही कुठून आले. स्वातंत्र्य लढ्यातही आरएसएसचं काही योगदान नाही."

    अनुराग ठाकूर बुधवारी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी हैदराबादेत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी ओवेसींवर निशाणा साधत, त्यांनी धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवल्याची टीका केली होती.

    राहुल गांधी आणि ओवेसी 'औरंगजेब युनिव्हर्सिटी'तून शिकले आहेत, असंही ठाकूर म्हणाले होते.

  9. अमेरिकेने चीनला काय इशारा दिला आणि त्यामागचे कारण काय?

    अँटनी ब्लिंकन

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    युक्रेनच्या विरोधातील हल्ल्यात रशियाची मदत केल्याचा आरोप करत अमेरिकेनं चीनला कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

    रशिया युक्रेनवर हल्ला करण्यासाठी ज्या साहित्याचा वापर करत आहे, ते पुरवणं चीननं बंद केलं नाही तर वॉशिंग्टनकडून कठोर पावलं उचलली जातील, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले.

    शीत युद्धानंतर युरोपच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका असून चीन त्याच्या विरोधात पावलं उचलत आहे, असं ब्लिंकन यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं.

    अमेरिका नेमकी कशाप्रकारची कारवाई करणार, याबाबत मात्र ब्लिंकन यांनी काहीही म्हटलं नाही.

    पण, अमेरिका याबाबत काही पावलं पुढं गेला असल्याचे संकेत त्यांनी दिले.

    ब्लिंकन 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते.

    चीनच्या बाबतीत अमेरिकेनं सीमा ओलांडू नये, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना म्हटलं होतं.

  10. सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक घडामोडी घडत आहे. या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

    काल दिवसभरातील अपडेट्स तुम्हालाया ठिकाणी वाचायला मिळतील.