You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

करकरेंसंदर्भातील विधानाप्रकरणी भाजपची वडेट्टीवारांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

आजच्या ताज्या बातम्या तुम्हाला या ठिकाणी वाचता येतील.

थोडक्यात

  • 'केजरीवालांनी खलिस्तान समर्थक संघटनांकडून निधी घेतल्याच्या आरोपांची चौकशी व्हावी', नायब राज्यपालांची शिफारस
  • हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या व्यक्तव्याप्रकरणी भाजप नेत्यांची विजय वडेट्टीवारांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
  • जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 2 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर
  • अमेठी आणि रायबरेलीसाठी निरीक्षक म्हणून काँग्रेसनी केली दोन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती
  • म्यानमारमधील उत्तर भागात ताबा मिळवल्याचा विद्रोही गटाचा दावा
  • केरेम शेलोम तळावर झालेल्या हल्ल्यात तीन सैनिक मृत पावल्याचा इस्रायलचा दावा

लाईव्ह कव्हरेज

तुषार आणि नितीन

  1. न्यूजक्लिकः माफीचे साक्षीदार बनलेल्या अमित चक्रवर्तींना मुक्त करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश

    दिल्ली हायकोर्टानं न्यूजक्लिकचे एचआरप्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या सुटकेचा आदेश दिला आहे. युएपीए प्रकरणात अमित चक्रवर्ती साक्षीदार बनले होते.

    न्यूजक्लिक या न्यूज वेबसाईटवर चीनकडून पैसे घेऊन भारतात चीनच्या समर्थनातील प्रपोगंडा चालवण्याचा आरोप झाल्यानंतर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    अमित चक्रवर्ती यांनी यूएपीए प्रकरणातून सुटकेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांच्या पीठानं ही याचिका मंजूर करत अमित चक्रवर्ती यांच्या सुटकेचा आदेश दिला आहे.

    अमित चक्रवर्ती यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चीनमधील कंपन्यांकडून विदेशी पैसा घेऊन भारताला नुकसान पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

    चक्रवर्ती यांच्या वकिलानं ते या प्रकरणात माफीचे साक्षीदार बनल्यानं त्यांच्या सुटकेची मागणी केल होती. तर ईडीनंही त्यांना जामीन मिळण्याबाबत काही आक्षेप नसल्याचं म्हटलं होतं.

  2. 'केजरीवालांनी खलिस्तान समर्थक संघटनांकडून निधी घेतल्याच्या आरोपांची चौकशी व्हावी', नायब राज्यपालांची शिफारस

    दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या NIA चौकशीची शिफारस केली आहे. खलिस्तान समर्थक संघटनांकडून निधी मिळाल्याच्या आरोपांप्रकरणी त्यांची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

    राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गृह मंत्रालयाला त्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी 1 एप्रिल 2024 रोजी वर्ल्ड हिंदू फेडरेशन इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आशु मोंगिया यांच्याकडून आलेल्या तक्रारीचा उल्लेख केला आहे.

    आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असलेले डॉ. मनीष कुमार रायजादा यांच्या 'एक्स' वरील पोस्टचा उल्लेखही केला आहे.

    राज्यपालांच्या पत्रानुसार, तक्रारदाराने एका व्हिडिओचा संदर्भ दिला आहे. त्यामध्ये शीख फॉर जस्टीसचे नेते गुरपतवंत सिंग पन्नू दिसत असल्याचं म्हटलं आहे. शीख फॉर जस्टिस ही भारतातील प्रतिबंधित संघटना आहे. गुरपतवंत सिंग पन्नू यांनी शीखांसाठी वेगळ्या खलिस्तानची मागणी केली आहे.

    व्हीडिओमध्ये गुरपतवंत सिंह पन्नू यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 2014 ते 2022 या काळात खलिस्तान समर्थकांकडून 1.60 दशलक्ष डॉलर्स निधी म्हणून घेतल्याचा आरोप केला आहे.

  3. करकरेंसंदर्भातील विधानाप्रकरणी भाजपची वडेट्टिवारांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपनं निवडणूक अधिकाऱ्यांकडं तक्रार केली आहे. वडेट्टीवारांचं वक्तव्य देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनातील असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

    त्यांचं वक्तव्य आणि आचारसंहिता उल्लंघन याबाबत चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी भाजपनं पत्राद्वारे केली आहे.

    आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्यांनी नव्हे तर आरएसएस समर्थित पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या घातल्या असल्याचं, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य मतदारांची दिशाभूल करून अशांतता निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.

    विजय वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य देशद्रोही आणि पूर्णपणे चुकीचे असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचंही भाजपनं म्हटलं आहे.

    विजय वडेट्टीवारांनी रविवारी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत करकरेंच्या मृत्यूसंदर्भात हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी एका पुस्तकाचा दाखला देत, त्याआधारे ते वक्तव्य केल्याचं म्हटलं होतं.

  4. चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाच्या पाकिस्तानात जाण्याच्या प्रश्नावर काय म्हणाले बीसीसीआय उपाध्यक्ष

    चॅम्पियन्स ट्रॉफी पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणार आहे. याबाबत सरकार जे सांगेल त्यानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

    "भारत सरकार आम्हाला परवानगी देतं, त्यानंतरच आम्ही संघाला खेळण्यासाठी पाठवत असतो. त्यामुळं यासंबंधीही आम्ही सरकारच्या निर्णयानुसारच पावलं उचलू," असं शुक्ला म्हणाले.

    भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा क्रिकेटवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

    तसं असलं तरीही, गेल्या वर्षी भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानात यांच्यात सामनाही झाला होता. भारतानं या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.

    भारतीय संघानं यापूर्वी 2008 मध्ये आशिया चषकात पाकिस्तानात अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिकाही झालेली नाही.

    आता, 9 जून रोजी टी20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे संघ आमने-सामने येणार आहेत.

  5. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 2 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर

    मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणानं दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

    त्यांना मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयानं सप्टेंबर 2023 मध्ये अटक केली होती.

    3 मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

    नरेश गोयल यांच्यावर कॅनडा बँकेबरोबर सुमारे 500 कोटींच्कया फसवणुकीचा आरोप आहे.

  6. अमित शाहांनी केला राम मंदिराचा उल्लेख, म्हणाले-'ममता दीदींना त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटते'

    भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमानमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्होट बँकेच्या भीतीनं अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाल्या नाही, असं शाह म्हणाले.

    "प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा ममता दीदींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या पुतण्यालाही पाठवलं होतं. पण ते लोक गेलेच नाहीत. ते का गेले नाहीत हे तुम्हाला माहिती आहे का? मी सांगतो. कारण ते त्यांच्या व्होट बँकेला घाबरतात. त्यांची व्होट बँक कोणती आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हे जे घुसखोरी करण्यासाठी आले आहेत, ही त्यांची व्होटबँक आहे. ममता दीदी त्यांना घाबरतात," असं अमित शाह म्हणाले.

    "व्होट बँकेला घाबरून त्यांना रामावर बहिष्कार टाकला. दुर्गापूरमधील लोक आता त्यांना मतदान करू शकतात का?" असंही त्यांनी म्हटलं.

  7. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने नियुक्त केले निरीक्षक

    उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षानं निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

    छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना रायबरेली मतदारसंघाच्या तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अमेठी मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत.

    अमेठीमधून काँग्रेसनं गांधी कुटुंबाचे नीकटवर्तीय किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

    राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीमधून निवडणूक लढवत आहेत. 1999 नंतर पहिल्यांदाच अमेठीमधून गांधी कुटुंबाचा सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरलेला नाही.