आर्यन खान प्रकरणात अनेक त्रुटी, NCB च्या अहवालात उल्लेख

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गेल्या वर्षी मुंबई येथे कॉर्डेलिया जहाजावरील अंमली पदार्थाच्या प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचा उल्लेख नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केला आहे. पण या प्रकरणात जबरदस्तीने वसुली करण्यात आल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.

या प्रकरणातच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र अनेक महिन्यानंतरही आर्यनविरोधात सबळ पुरावे जमा करण्यात NCB ला अपयश आल्याने त्याला क्लिन चिट देण्यात आली होती.

या प्रकरणात अनेक त्रुटी असल्याचं आढळून आल्यानंतर NCB कडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती.

आर्यन खानला त्यावेळी टाकलेल्या धाडीत अटक करण्यात आली होती. पण तीन आठवड्यानंतर त्याला जामीन मिळाला. NCB ने आर्यनविरोधात लावण्यात आलेले आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत.

PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, NCB अधिकाऱ्यांनी सांगितलं की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका विशेष समितीने काही आठवड्यांपूर्वी आपला अहवाल संस्थेकडे सादर केला.

यादरम्यान एकूण 65 जणांचा जबाब नोंदवण्यात आला. क्रूझ-ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं यामध्ये निदर्शनास आलं. तसंच सात ते आठ NCB अधिकाऱ्यांची भूमिकाही यामध्ये संशयास्पद होती.

शिवाय, अनेक व्यक्तींनी या प्रकरणात आपला जबाब वारंवार बदलला, असंही दिसून आलं आहे.

म्हणजे, NCB अधिकाऱ्यांनी काही आरोपींना सोडण्यासाठी त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात येत होता. मात्र, या प्रकरणात जबरदस्तीने वसुली करण्यात आली आल्याचे पुरावे सापडले नाहीत, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी हे प्रकरण समोर आलं तेव्हा भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे मुंबईचे विभागीय संचालक होते.

काय आहे प्रकरण?

2 ऑक्टोबर 2021 ला रात्री एनसीबीनं मुंबईजवळ एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी कारवाई केली आणि काही जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये एक नाव होतं अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान.

मुंबईहून गोवा जाणाऱ्या क्रूजवरून आर्यन खानला 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ने (NCB) ऑक्टोबर 2021 मध्ये अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी केला होता.

या प्रकरणात आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता. या प्रकरणात नंतर आर्यन खानला एनसीबीनं क्लिन चीट दिली.

या कारवाईसोबतच ती करणाऱ्या अधिकाऱ्याची, समीर वानखेडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असणारी विविध माणसं समोर येत गेली.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गेले काही दिवस सतत आरोप केले. त्या आरोपांना वानखेडेंकडून प्रत्युत्तरंही देण्यात आली. या प्रकरणाने राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)