समीर वानखेडेः आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी NCBच्या कारवाईवर प्रश्न का उपस्थित होत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राघवेंद्र राव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
एखाद्या हाय प्रोफाईल सेलिब्रिटी केसमध्ये तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या व्यक्तीबरोबर सेल्फी घेऊन ती सोशल मीडियावर पोस्ट करणं किंवा छापा टाकल्यानंतर राजकीय कार्यकर्ता सेलिब्रिटी आरोपीला घेऊन येताना दिसणं, असे प्रकार शक्यतो घडत नाहीत.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एका क्रूझवर झालेल्या तथाकथित रेव्ह पार्टीत अटक केल्यानंतर, असंच काहीसं घडलं. त्यामुळंच अंमली पदार्थांची तस्करी रोखणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या संस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आर्यन खानचा अटकेनंतरचा जो फोटो व्हायरल झाला, तो केपी गोसावी नावाच्या व्यक्तीनं काढला होता, असा आरोप महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. गोसावी हे खासगी गुप्तहेर असून त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
गोसावी यांनी एनसीबीच्या ताब्यात असेलल्या आर्यन खानबरोबर घेतलेला सेल्फी व्हायरल झाल्यानंतर, एनसीबीनं या व्यक्तीशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र नंतर ते साक्षीदार असल्याचं सांगण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्याचबरोबर या प्रकरणाशी संबधित एका व्हीडिओमध्ये जो व्यक्ती आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटबरोबर दिसत आहे, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मनीष भानुशाली असल्याचंही मलिक म्हणाले आहेत. त्यांच्या फेसबूक प्रोफाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांबरोबरचे फोटोही आहेत.
या व्हीडिओमध्ये भानुशाली मर्चंटचा हात पकडून त्यांना घेऊन जाताना दिसत आहेत.
या आरोपांच्या आधारे नवाब मलिक यांनी आर्यन खानच्या अटकेशी संबंधित संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचं म्हटलं आहे. हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी भाजपचं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'काही जण स्वतंत्र साक्षीदार होते'
एनसीबीनं नवाब मलिक यांचे आरोप फेटाळले आहेत.
एनसीबीचे उप-महासंचालक ज्ञानेंद्र सिंह यांनी या प्रकरणाशी संबंधित पंचनामे कायदेशीर पद्धतीनं तयार केले असल्याचं म्हटलं आहे. तसंच या कारवाईमध्ये काही जण स्वतंत्र साक्षीदार म्हणून सहभागी झाले होते. कायद्यानुसार स्वतंत्र साक्षीदारांचा समावेश करण्याची तरतूद असल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
ज्ञानेंद्र सिंह यांनी सहा ऑक्टोबरला माध्यमांशी बोलताना 10 जणांची नाव घेत ते स्वतंत्र साक्षीदार असल्याचं सांगितलं. त्यात किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या नावांचा सामावेश आहे.
गोसावी आणि भानुशाली यांच्याबाबत होत असलेले आरोप निराधार आहेत आणि यापूर्वी काही जणांवर केलेल्या कारवायांमुळं असे आरोप केले गेले असल्याची शक्यताही ज्ञानेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
एनसीबीची कारवाई ही नियमानुसार आणि कायदेशीर दृष्टीनं पारदर्शक आणि निःपक्ष होती आणि पुढंही राहील, असंही ज्ञानेंद्र सिंह म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
ज्ञानेंद्र सिंह यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्यांनी यापूर्वीच्या कारवाईचा उल्लेख केला. जानेवारी महिन्यात ड्रग्जच्या एका प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर शब्बीर यांची अटक झाली होती. या प्रकरणाशी ज्ञानेंद्र यांच्या वक्तव्याचा संबंध जोडला जात आहे.
'निष्पक्ष लोकांना साक्षीदार बनवायला हवं होतं'
कोणत्याही चौकशीमध्ये विश्वासार्हता आणि सत्यनिष्ठा असावी असं मत, उत्तर प्रदेश पोलिसांचे माजी पोलिस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले.
"खासगी हेर आणि राजकीय संबंध असलेल्या लोकांच्या उपस्थितीमुळं चौकशीच्या प्रमाणिकपणा आणि विश्वासार्हतेवर परिणाम होतो. 36 वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही, अशाप्रकारे हेर किंवा राजकीय लोकांचा हस्तक्षेप किंवा उपस्थिती यासाठी परवानगी दिली नाही," असं ते म्हणाले.
एक जबाबदार नागरिक म्हणून या प्रकरणाची माहिती एनसीबीला दिली होती, असं मनीष भानुशाली यांनी म्हटलं आहे.
"एखादा हेर किंवा राजकीय कार्यकर्ता तुम्हाला माहिती देत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत व्हायला हवं. मात्र, अशा लोकांना कधीही तपासात सहभागी करता कामा नये. हितसबंध असलेल्या किंवा काही स्वार्थ असलेल्यांशी तुम्ही संलग्न असाल तर तपास निःपक्षपणे आणि कायदेशीर पद्धतीनं होईल, यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही," असं विक्रम सिंह म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
या चौकशीत वैयक्तिक स्वार्थ किंवा इतर हितसंबंध असलेले लोक सहभागी होणार नाही, याची एनसीबीनं काळजी घ्यायला हवी होती, असंही विक्रम सिंह म्हणाले. "त्यांनी इतर सामान्य लोकांना साक्षीदार बनवायला हवं होतं."
'सामान्य लोक घाबरतात'
एकिकडं विक्रम सिंह यांनी चौकशीत खासगी हेर किंवा राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश केल्यास, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ शकतं असं म्हटलं आहे. मात्र तर, माजी आयपीएस अधिकारी विभूती नारायण राय यांच्या मते, अनेकदा सामान्य नागरिक साक्षीदान बनायला घाबरतात, कारण त्यांना न्यायालयात चकरा मारायच्या नसतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
ते लोक त्यांना माहिती देणारे होते, हे एनसीबीचं म्हणणं खरं असू शकतं, असं राय म्हणाले.
"एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या मुलाच्या विरोधात साक्ष द्यायला सहजासहजी कोणी भेटत नाही, त्यामुळं एनसीबीनं त्यांना सोबत नेलं असेल हे खरं असेल. जे लोक यात दिसत आहेत, त्यांचा उदरनिर्वाहच यावर चालतो," असंही ते म्हणाले.
एनसीबी चर्चेत
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबी गेल्या काही काळापासून चर्चेत राहिलं आहे. गेल्यावर्षी बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका तथाकथित ड्रग्ज रॅकेटचा खुलासा करत, तपासादरम्यान एनसीबीनं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची चौकशी केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीनं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अटकही केली होती. याच तथाकथित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही चौकशी करण्यात आली होती.
चित्रपट आणि टिव्ही क्षेत्राशी संबंधित अनेक बड्या हस्तींना एनसीबीनं चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. अनेक दिवस दररोज एनसीबी कार्यालयात या सेलिब्रिटींची चौकशी सुरू होती, मात्र हळू हळू प्रकरण थंड पडत गेलं. गेल्यावर्षी 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयानं जामीनावर सोडलं होतं.
दरम्यान, या क्रूझवर टाकण्यात आलेला छापा हा, गुजरातच्या मुंद्रा बेटावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप, काँग्रेसनं केला आहे.
16 सप्टेंबरला महसूल संचलनालय (डीआरआय) नं गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात अदानी समुहाच्या मुंद्रा पोर्टवर दोन कंटेनरमधून तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. जागतिक बाजारात याचे मूल्य सुमारे 21 हजार कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
ड्रग्जच्या व्यवसायातील या मोठ्या माशांना सोडून लहान-सहान प्रकरणावर एनसीबी लक्ष केंद्रीत करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, गृह मंत्रालयानं हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सहा ऑक्टोबरला मुंद्रा पोर्टमधील ड्रग्ज जप्ती प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) नं त्यांच्या हातात घेतली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 4
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























