You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: राहुल गांधी म्हणतात 'देशातील सर्व नागरिकांना लस द्या' #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. देशातील सर्व नागरिकांना लस द्या- राहुल गांधी
लसीकरणाबद्दल देशभरातील विविध पक्षांचे नेते केंद्र सरकारकडे मागण्या नोंदवत आहेत. त्याचप्रमाणे अनेक राज्य सरकारांनीही आपापल्या मागण्या केंद्राकडे नोंदवल्या आहेत.
कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आता लसीकरणाच्या चर्चेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही प्रवेश केला आहे.
गरज आणि मागण्यांवर वाद घालणे चुकीचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटची काल दिवसभर चर्चा सुरू होती. हे वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.
2. राज्यात सुरू असलेलं राजकारण हे करमणुकीचा भाग- उदयनराजे
"राज्याचं राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे," असं मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ताने उदयनराजे यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादाची बातमी प्रसिद्ध केली आहे.
"गो करोना गो करोना असे म्हणून कोरोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.
"राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्त्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत.
"जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न घाबरता संसर्गाचा सामना करावा," असं उदयनराजे यांनी मत मांडल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
3. स्वयंपाक्याला कानाखाली मारून बच्चू कडू नव्या वादात
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आता नव्या मारहाणीमुळे वादात सापडले आहेत. बच्चू कडू यांनी अकोल्यातील जिल्हा शासकीय महाविद्यालयातील कॅन्टिनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारली आहे. या कृत्यामुळे त्यांच्यावर आता टीका होत आहे. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
स्वयंपाक्याला कानाखाली मारणं सोपं आहे, त्यापेक्षा व्यवस्थेच्या कानाखाली मारुन दाखवा असं आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीनं त्यांना दिलं आहे. याआधीही बच्चू कडू अशा प्रसंगांमुळे चर्चेत आलेले आहेत.
4. मुकेश, अनिल, नीता, टीना अंबानी यांना 25 कोटींचा दंड
सेबीने 21 वर्षं जुन्या एका प्रकरणात मुकेश, अनिल हे अंबानी बंधू आणि नीता व टिना यांना 25 कोटींचा दंड ठोठावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सच्या ठरलेल्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स घेतल्यावर त्याची माहिती सेबीला न दिल्याचे हे प्रकरण आहे. बिझनेस स्टँडर्डने ही बातमी दिली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिजच्या प्रवर्तकांनी कंपनीतील आपल्या समभागाची योग्य माहिती आपल्याला दिली नाही असं सेबीनं दिलेल्या 85 पानी निर्णयात म्हटलं आहे.
त्यामुळेच अनिल, मुकेश, टीना, नीता यांना हा दंड द्यावा लागणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या प्रवर्तकांनी 2000 या वर्षी घेतलेल्या 6.83 टक्के समभागांची माहिती सेबीला दिली नाही, नियमांनुसार त्यांनी 5 टक्क्यांपेक्षा जास्त समभाग घेतल्यावर माहिती देणं आवश्यक होतं असं सेबीनं म्हटलं आहे.
5. भाजपा प्रदेशाध्यक्षांवर विटा आणि बॉम्बचा हल्ला
पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या विटा आणि बॉम्ब फेकण्याची घटना काल कुचबिहार येथे घडली. ही बातमी इंडिया टुडेने प्रसिद्ध केली आहे.
दिलीप घोष कुचबिहारमधी शितलकुची भागातील प्रचारसभा आटोपून परतत असताना ही घटना घडली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार दिलीप घोष यांच्या गाडीचे नुकसान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले.
दिलीप घोष यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत त्यांच्या एकाबाजूची काच फुटल्याचे दिसून येते. दिलीप घोष यांनी आपल्याला एक वीट लागल्याचंही सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)