शेतकरी आंदोलन: अक्रोड, पिस्ते खाणारे आंदोलक पाहिले नाहीत - प्रवीण दरेकर

फोटो स्रोत, Twitter/@iPravinDarekar
वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर आलेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या.
1. अक्रोड, पिस्ते खाणारे आंदोलक पाहिले नाहीत - प्रवीण दरेकर
दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तोंडसुख घेतलं आहे. अक्रोड-पिस्ता खाणारे आणि मशीनने मसाज करून घेणारे आंदोलक देशाने कधी पाहिले नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे, ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, भांडवलदार आणि आडत्यांचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीत खरे शेतकरी किती आहेत, हे आता उघड झाले आहे, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.
याआधी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते की शेतकरी आंदोलन हे चीन आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यातून होत आहे.
2. मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे यांचा ठाकरे सरकारला इशारा
आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागला तर याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असं म्हणत भाजप खासदार संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे, असं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.
EWS (economically weaker section - आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाला आपला विरोध नाही. मात्र, SEBC वर्गाला (socially and economically backward classes - सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग) याचा धोका होणार नाही, याची हमी राज्य सरकार घेणार का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणावर 25 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

फोटो स्रोत, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati/facebook
दरम्यान, याच पत्रकार परिषदेत सारथी संस्था वाचवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करायला पाहिजे, असंही संभाजीराजे म्हणाले.
ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना भेटून सारथी संस्थेविषयी कल्पना दिली आहे. शरद पवारांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देतानाही त्यांना हा विषय सांगितला. आज मी त्यांना पुन्हा सांगू इच्छितो. शरद पवार साहेब छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचे पाईक आहेत. त्यामुळे सारथी संस्था वाचवायची असेल तर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे."
"उगाच शाहू महाराजांच्या नावे संस्था का उभी करायची? बुडीत काढायचीच असेल तर बंदच करून टाका. कशाला आपण शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं?", असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
3. मरू नका… लढा आणि मारा - शेतकऱ्यांना बच्चू कडू यांचं आवाहन
अनोखी निदर्शनं आणि लक्षवेधी वक्तव्यं करणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. आत्महत्या करून मरू नका. लढा, नाहीतर मारा आणि ते तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे, अशी बातमी ईटीव्ही भारतने दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातल्या धनेगाव इथल्या एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. संत्रा व्यापाऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे आणि पोलिसांनी मारहाण केल्याने नैराश्य येऊन या शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून आत्महत्या केली होती.
या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर बच्चू कडू बोलत होते.
4. मनसे-अॅमेझॉन वाद - न्यायालयाच्या नोटिशीनंतर मनसेचा गर्भित इशारा
मनसेच्या अॅमेझॉनविरोधातल्या मोहिमेनंतर अॅमेझॉननेही न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर मनसेने ट्वीटर हँडलवरून आपली अधिकृत भूमिका मांडली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरेंना ही नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES
यानंतर मनसेने ट्वीट करत लिहिलं आाहे, "व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काहींनी चालढकल केली त्यात सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला.
"पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल!"
5. मराठी सैनिकाचा आगीत होरपळून मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील एका जवानाचा कुलू-मनाली परिसरातील भारत-चीन सीमेजवळ आगीच्या एका दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला. कैलास कालू दहिकर (27, पिंपळखुटा, ता. अचलपूर) असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे, असं महाराष्ट्र टाइम्सने म्हटलं आहे.
कैलास दहिकर भारतीय सैन्याच्या '15 बिहार'मध्ये कार्यरत होते. 23 डिसेंबर रोजी ते कुलू-मनाली इथे कार्यरत होते. थंडीपासून बचावासाठी रात्री ड्युटी संपल्यानंतर त्यांनी केरोसीनवर चालणारं हिटर सुरू केलं होतं. ते झोपेत असताना हिटरने पेट घेतला आणि या आागीत कैलास यांचा मृत्यू झाला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























