IPL 2020 : खेळाडूंसमोर कोरोनापेक्षाही मोठी अडचण कोणती?

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

इंडियन प्रीमिअर लीडच्या 13 व्या हंगामाची सुरुवात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याद्वारे अबु धाबी येथे होणार आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे IPL साठी खबरदारीचे सर्व उपाय लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये खेळाडूंना सुरक्षित अशा बायो-बबलमध्ये ठेवण्यापासून इतर प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश आहे.

कोव्हिड-19 संकटादरम्यान खेळाडूंसमोर इतर अनेक अडचणी असणार आहेत.

अबु धाबी, शारजा आणि दुबई या तीन शहरांमधलं उष्ण व दमट वातावरण खेळाडूंसाठी अडचणीचं ठरणार आहे. खेळाडूंना या भागात अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सियसपेक्षाही जास्त तापमानात खेळावं लागणार आहे.

IPL 2020

फोटो स्रोत, NURPHOTO/GETTY IMAGES

या अडचणींचा उल्लेख रॉयल चॅलेंजर्सचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हीडिओत केला आहे.

डिव्हिलियर्स म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचं तर या प्रकारच्या परिस्थितीत खेळण्याचा मला अनुभव नाही. इथं प्रचंड ऊन आहे. या वातावरणामुळे मला जुलै महिन्यात खेळलेल्या एका कसोटी सामन्याची आठवण येत आहे. त्या सामन्यात विरेंद्र सेहवागने आमच्याविरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं. आयुष्यात त्यापेक्षा जास्त उष्णतेचा अनुभव आम्हाला कधीच आला नव्हता."

संयुक्त अरब अमिरातीमध्ये बऱ्याच काळापासून एका स्पोर्ट्स चॅनलमध्ये काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार नीरज झा तिथल्या अडचणींबाबत सांगतात, "इथं तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त असतं. सोबतच स्टेडियमबाहेरील वाळूच्या मैदानांमुळे जास्त अडचण होते. वाळूतील उष्णतेमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णताही प्रचंड वाढते. या परिस्थितीशी जुळवून घेणं, खेळाडूंसाठी मोठं आव्हान असणार आहे.

उष्णतेसोबतच समुद्रकिनाऱ्यावर ही शहरं असल्यामुळे याठिकाणी आर्द्रतेची पातळीही जास्त असते.

तिन्ही शहरांमध्ये आर्द्रतेची पातळी 70 टक्के असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या परिस्थितीत खेळाडूंना डिहाड्रेशन होण्याचा धोका आहे.

भारतीय खेळाडूंवर परिणाम नाही

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांच्या मते संयुक्त अरब अमिरातीमधील या परिस्थितीचा भारतीय खेळाडूंवर कोणताच परिणाम होणार नाही.

IPL 2020

फोटो स्रोत, KARIM SAHIB/GETTY IMAGES

ते सांगतात, "IPL चं आयोजन भारतात एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात केलं जातं. अशीच स्थिती दुबईमध्येही असेल. शिवाय आर्द्रतेचा विचार केल्यास भारतात मुंबई, कोलकाता किंवा चेन्नई या शहरांमध्ये अशीच परिस्थिती असते."

संयुक्त अरब अमिरातीचे स्टेडियम गेल्या दहा-बारा वर्षांपासून पाकिस्तानी क्रिकेट संघाचं घरचं मैदान म्हणून वापरण्यात आले आहेत.

2009 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हलल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी क्रिकेट बोल्ड परदेशी संघाच्या दौऱ्याचं यजमानपद इथल्या स्टेडियमवर भूषवतं.

पाकिस्तानचे खेळाडू सातत्याने या परिस्थितीत खेळतात. पण पाकिस्तानचा कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत नाही.

आयपीएल 2020 दरम्यान काय होईल?

नीरज झा यांनी UAE मध्ये झालेल्या बहुतांश सामन्यांचं प्रसारण जवळून पाहिलं आहे. त्यांच्या मते, "भारतीय उपखंडातील खेळाडूंना इथं खेळण्यास विशेष अडचणी येणार नाहीत. पण परदेशी खेळाडूंना अशा वातावरणाचा नेहमी त्रास होतो."

IPL 2020

फोटो स्रोत, ROBERT CIANFLONE

आयपीएल 2020 दरम्यान सगळ्या टीममध्ये मिळून एकूण 50 परदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल.

या परिस्थितीतून सहीसलामत वाचण्यासाठी इतर काही मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

शोएब अख्तर त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण ठरू शकतो. शोएब अख्तर UAE मधील मैदानांवर खेळताना गळ्यात एक आईस कॉलर वापरत होता. यामुळे शरीरात थंडावा आणि पाण्याचा अंश कायम राहण्यासाठी मदत व्हायची.

एबी डिव्हिलयर्सने ट्विटरवरील व्हीडिओत आर्द्रतेबाबतही सांगितलं आहे.

तो म्हणतो, रात्रीचे दहा वाजले तरी इथली आर्द्रता कायम असते. गेल्या काही दिवसांत वातावरण थोडंस सहनीय बनलं आहे. पण शरीरातील ऊर्जा अखेरपर्यंत वाचवून ठेवण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे.

विजय लोकापल्ली यांच्या मते, भारतीय खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांदरम्यान अशा स्थितीचा सामना करावा लागतो. ते मानसिकरित्या यासाठी तयार असतात. कोणत्याही स्थितीत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरतात.

समाधानाची बाब काय?

यंदाचे आयपीएल सामने आठऐवजी साडेसातवाजता सुरू होणार आहेत. त्यावेळी दुबई, अबु धाबी आणि शारजाह परिसरात संध्याकाळ असेल. यावेळी तिथं तापमान थोडंसं कमी व्हायला सुरू होतं.

खेळाडूंसाठी ही समाधानाची बाब असणार आहे. याशिवाय ट्वेंटी-20 म्हणजेच तीन-साडेतान तासाचा खेळ असल्यामुळे सामने लवकर संपू शकतात.

याठिकाणी एकदिवसीय सामनेही मोठ्या प्रमाणात खेळवण्यात आलेले आहेत.

IPL 2020

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "याच मैदानांवर कसोटी सामने आयोजित झाले आहेत. एकदिवसीय सामने इथं नेहमीच खेळवण्यात येतात. साधारणपणे सकाळी दहा वाजता सामने सुरू होतात.

12 च्या कडक उन्हातही खेळाडू मैदानावर असतात. इथं मार्च ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत लोक घराबाहेर बिलकुल पडत नाहीत. हे पाहता खेळाडूंना थोडा वेळ सहन करत हे आव्हान स्वीकारावं लागणार आहे."

सचिन तेंडुलकरचं 'डेझर्ट स्ट्रॉम'

आयपीएलमधील निम्म्याहून अधिक सामने ऑक्टोबरमध्येच खेळवले जातील. हे यासाठी महत्त्वाचं आहे की, संयुक्त अरब अमिरातीमध्ये सप्टेंबरनंतर तापमान कमी होतं. या कमी होणाऱ्या तापमानामुळे खेळाडूंना दिलासा मिळेल.

आयपीएलच्या सातव्या हंगामातील काही सामने एप्रिल महिन्याच्या दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले होते. यावेळी बऱ्याच सामन्यांदरम्यान प्रचंड उष्णता होती. उष्णतेसोबत आणखी एक गोष्ट इथे त्रासदायक ठरते, ती म्हणजे वाळूचं वादळ.

सचिन तेंडुलकर

फोटो स्रोत, Getty Images

शारजाशी भारतीय क्रिकेट रसिकांच्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. 1998 साली याच मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन अजरामर शतकं झळकावली होती.

ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फिरकीपटू शेन वॉर्नच्या बॉलिंगच्या ठिकऱ्या उडवत सचिनने जोरदार वर्चस्व गाजवलं होतं.

तत्कालीन ऑस्ट्रेलियन संघ अजिंक्य समजला जात असे. दमदार अशा आक्रमणावर हल्लाबोल करत सचिनने श्रेष्ठ कोण हे दाखवून दिलं होतं. सचिनला दोन्ही शतकी खेळींसाठी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

सचिनच्या खेळीदरम्यान सँडस्टॉर्म अर्थात वाळूचं वादळ आलं होतं. मात्र सचिन त्यानेही विचलित झाला नाही. वाळूच्या वादळामुळे सर्व खेळाडूंनी मैदानावर लोळण घेतली होती.

सचिन तेंडुलकर

फोटो स्रोत, Getty Images

संयुक्त अरब अमिरातच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही वाळूचं वादळ येऊ शकतं.

वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या मते, कोरनाच्या काळात खेळाडूंना कुठेही खेळी करता आली नाहीय. आता आयपीएलमुळे संधी मिळतेय. त्यामुळे इतर कुठलाही अडथळा खेळाडूंना चांगली खेळी करण्यापासून रोखू शकणार नाही.

"कोरोनामुळे बरीच खबरदारी घेण्यात आलीय. खेळाडूंना सामन्यानंतर कुठे बागडताही येणार नाही, पार्ट्याही नसतील. प्रेक्षकांचा आवाज नसेल. फक्त क्रिकेट एके क्रिकेट असेल," असं विजय लोकपल्ली सांगतात.

लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी अडकून पडलेल्या लोकांना आयपीएलमध्ये मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटचा अनुभव घेता येणार आहे. यंदा आयपीएलला सर्वाधिक व्ह्यूअरशिप मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

IPL 2020

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)